दीपक मोहिते, वसईस्वातंत्र्य मिळून ६७ वर्षे उलटली. आपण आज ६८ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला. स्वातंत्र्यानंतर शहरी आणि ग्रामीण भागातील विकासाला चालना मिळाली आणि परिसराचा काही प्रमाणात कायापालट होऊ शकला. विकासाचे अनेक प्रश्न मार्गी लागले असले तरी आजही अनेक महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित आहेत. शहरी भागाला न्याय मिळाला, परंतु ग्रामीण भाग आजही उपेक्षित आहे. कुपोषण, बालमृत्यू, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाची सतत वाढणारी संख्या व साक्षरतेचा महत्त्वाचा प्रश्न आजही सतावत आहे.जिल्ह्याच्या पश्चिम किनारपट्टीवरील वसई तालुका वगळता पालघर, डहाणू, विक्रमगड, वाडा, तलासरी व जव्हार, मोखाडा हे परिसर विकासाच्या दृष्टीने मागासलेले आहेत. वास्तविक मुंबईपासून ५० ते ७० कि.मी. अंतरावर हा परिसर आहे, परंतु योग्य नियोजनाअभावी या परिसराचा मागासलेपणा दूर होऊ शकला नाही. केंद्र व राज्य सरकारने विविध योजनांच्या माध्यमातून गेल्या ६७ वर्षात हजारो कोटी रु.चा निधी विकासकामी घेतला, परंतु ग्रामीण भागातील जनतेचे दरडोई उत्पन्न वाढू शकले नाही व परिसर विकासाला गती मिळू शकलेली नाही. जिल्ह्याच्या पश्चिम किनारपट्टीवरील तालुक्यात मासेमारी व शेती असे दोन प्रमुख व्यवसाय आहेत. यात भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध झाला व आजही काही प्रमाणात तो मिळतो, परंतु आता या व्यवसायात नशीब अजमावण्यास भूमीपुत्र तयार नाहीत. कारण या दोन्ही व्यवसायात निसर्गाचा लहरीपणा व्यवसायाला धोका देत आहे, त्यामुळे या भागातील भूमीपुत्रांची मुले आता रेती उत्खनन, वीटभट्टी व अन्य व्यवसायात स्थिरावू लागली आहेत.
स्वातंत्र्याच्या ६७ वर्षांनंतरही ग्रामीण भाग उपेक्षितच!
By admin | Updated: August 16, 2014 01:13 IST