Join us  

राज्यात ५१ हजार १११ रुग्ण उपचाराधीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2021 4:17 AM

मुंबई : राज्यात दिवसभरात ३ हजार ३५० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, राज्यात आतापर्यंत १८ लाख ५६ हजार ...

मुंबई : राज्यात दिवसभरात ३ हजार ३५० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, राज्यात आतापर्यंत १८ लाख ५६ हजार १०९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.७८ टक्क्यांवर गेले असून सध्या ५१ हजार १११ रुग्ण उपचाराधीन आहेत.

राज्यात गुरुवारी ३ हजार ७२९ रुग्ण आणि ७२ मृत्यूंची नोंद झाली आहे. परिणामी, कोरोनाबाधितांची एकूण संख्या १९ लाख ५८ हजार २८२ झाली असून मृतांचा आकडा ४९ हजार ८९७ झाला आहे. दिवसभरात नोंद झालेल्या ७२ मृत्यूंपैकी ३८ मृत्यू हे मागील ४८ तासांतील, तर १४ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित २० मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक काळापूर्वीचे आहेत. सध्या राज्यात २.५५ टक्के मृत्युदर आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ३१ लाख ९९ हजार २०१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १४.८४ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ७० हजार २१७ व्यक्ती घरगुती अलगीकऱणात असून २ हजार ८२४ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत.