मुंबई : दहावीची परीक्षा खूपच महत्त्वाची आहे, असे मुलांच्या मनावर वर्षाच्या सुरुवातीपासून बिंबवले जाते. त्यामुळे वर्षभर अभ्यास केला असला तरीही ही महत्त्वाची परीक्षा आहे, असे त्यांना सतत सांगितल्याने सुमारे ४० टक्के मुलांना परीक्षेदरम्यान तणाव येत असल्याचे मानसोपचारतज्ज्ञांचे म्हणणे आहे. शालेय जीवनातील दहावीची महत्त्वाची परीक्षा आहे, हे खरे आहे. पण दहावी - बारावीची परीक्षा देणाऱ्या मुलांवर सीए किंवा आयआयटीची परीक्षा देताना जेवढा ताण असतो, तेवढा ताण ही मुले घेतात, हे अयोग्य आहे. पालकांनी मुलांना जास्त ताणापासून रोखायला हवे. परीक्षेदरम्यान मुलांवरचा ताण वाढल्यास त्यांच्या शरीरावर त्याचा परिणाम दिसून येतो. पोटात दुखणे, नॉशिया येणे, हृदयाची धडधड वाढणे, जास्त घाम येणे असे शारीरिक त्रास जाणवू लागतात. काही जणांना केलेला अभ्यास न आठवणे, परीक्षेच्या आदल्या दिवशी अभ्यास करताना लक्ष न लागणे, नापास होण्याची भीती वाटणे, इतरांचा अभ्यास चांगला झाला आहे, आपला नाही ही भीती वाढणे असेही विद्यार्थ्यांना वाटायला लागते, असे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. जालपा भुता यांनी सांगितले. (प्रतिनिधी)च्परीक्षेदरम्यान पालकांनी मुलांना मानसिक आधार देण्याची गरज असते. त्याचबरोबरीने मुलांचा आत्मविश्वास वाढवला पाहिजे, यासाठी मुलांना वेळ द्या, त्यांच्या भावना जाणून घ्या. च्दहावीची परीक्षा म्हणजे जीवन-मरणाचा प्रश्न आहे, असे मुलांना भासवू नका. इतर मुलांशी त्यांची तुलना करू नका. मुलांवर अभ्यासाचे ओझे होईल असे वागू नका़ ते कोणत्या गोष्टी चांगल्या प्रकारे करू शकतात, हे जाणून घ्या.
४० टक्के विद्यार्थी असतात तणावग्रस्त
By admin | Updated: March 7, 2015 01:38 IST