Join us  

मुंबईत ४०, ठाणे जिल्ह्यात १२, पालघरमध्ये १ अर्ज बाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 6:08 AM

अर्ज छाननीनंतरची स्थिती : १२ एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत

मुंबई / ठाणे / पालघर: नामनिर्देशपत्रांच्या छाननीनंतर बुधवारी मुंबईत ४०, ठाणे जिल्ह्यात १२, पालघरमध्ये १ अर्ज बाद झाले आहेत.मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांसाठी दाखल झालेल्या १५६ अर्जांपैकी २७ अर्ज बाद झाले आहेत. दक्षिण मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबई मतदारसंघासाठी एकूण ४४ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. या अर्जांच्या छाननीअंती १२ नामनिर्देशन पत्र अवैध ठरले असून, ३२ नामनिर्देशन पत्र वैध ठरल्याची माहिती मुंबई शहर जिल्हा निवडणूक कार्यालयाने दिली. मुंबई उपनगर जिल्ह्यातील ४ लोकसभा मतदारसंघांतून दाखल झालेल्या ११० पैकी १३ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे अवैध ठरली, तर ९७ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध ठरली आहेत. यामध्ये उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून २५, उत्तर पश्चिम मुंबई २२, उत्तर पूर्व मुंबई २८ आणि उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून २२ उमेदवारांच्या नामनिर्देशनपत्रांचा समावेश आहे. वैध ठरलेल्या उमेदवारांना त्यांचे अर्ज १२ एप्रिलपर्यंत मागे घेता येणार असल्याची माहिती, मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्याच्या प्रसार माध्यम कक्षाद्वारे देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील लोकसभेच्या ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तिन्ही मतदारसंघांतील ८७ उमेदवारांच्या ११४ नामनिर्देशनपत्रांपैकी १२ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले. यात सर्वाधिक अपक्ष उमेदवार कल्याण मतदारसंघात आहेत. ठाणे लोकसभा मतदारसंघातील दत्तात्रेय सावळे, राहुल कांबळे, प्रमोद कांबळी, मुकेश तिवारी या चार उमेदवारांचे अर्ज अवैध ठरल्याचे ठाणे लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यामुळे आता या मतदारसंघात २५ उमेदवार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रमाणेच कल्याण मतदारसंघातील चार जणांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरविलेले आहेत. कल्याणला ३६ उमेदवार होते. आता या मतदारसंघात सध्या ३२ उमेदवार शिल्लक आहेत, तर भिवंडी मतदारसंघातील २२ उमेदवारांपैकी चार जण अवैध ठरले. आता या मतदारसंघात १८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या तिन्ही मतदारसंघांमध्ये आता ७५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

टॅग्स :लोकसभा निवडणूक