आत्महत्या प्रतिबंधक लसीकरण शक्य आहे..!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2021 12:51 PM2021-02-27T12:51:59+5:302021-02-27T12:52:24+5:30

आत्महत्या करण्यापूर्वीच्या काही आठवड्यात बहुतांश लोक हे आपल्या जवळच्या व्यक्तीकडे थेट किंवा अप्रत्यक्षपणे हा विचार बोलून दाखवत असतात....

Suicide vaccination is possible ..! | आत्महत्या प्रतिबंधक लसीकरण शक्य आहे..!

आत्महत्या प्रतिबंधक लसीकरण शक्य आहे..!

Next

डॉ. हमीद दाभोलकर; मनोविकार तज्ञ...

गेल्या दोन आठवड्यांमध्ये पूजा चव्हाणच्या आत्महत्येच्या संदर्भात महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्याच दरम्यान समीर गायकवाड ह्या टिकटॉक‘ स्टारने आत्महत्या केल्याची बातमी समोर आली. गेल्या वर्षभरात सुशांत सिंगच्या आत्महत्येनंतर याविषयी समाजात हळूहळू चर्चा सुरु झाली आहे. गेल्या काही वर्षे जशी एखादी संसर्गजन्य आजाराची साथ पसरावी त्याप्रमाणे आत्महत्यांची एक सुप्तसाथ आज आपल्या देशात पसरली आहे. भारतात दरवर्षी दोन लाखांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू आत्महत्याने होतात. त्यामधील निम्म्या म्हणजे साधारण एक लाख आत्महत्या ह्या १५ ते ३५ या वयोगटातील म्हणजे तरुणाईच्या असतात. आपण थोडे हळहळतो आणि काही दिवसांनी हे विसरून देखील जातो. हा विषय किती गंभीर आहे याची जाणीव वाढत्या आत्महत्यांच्या घटनांमधून झाल्याशिवाय राहणार नाही. 

'युवाल नोवा हरारी' हा आजच्या जगाचा एक महत्वाचा भाष्यकार असे म्हणतो की ,युद्ध आणि दहशतवाद ह्यापेक्षा 'आत्महत्या' हा आजच्या जगासाठी खूप अधिक महत्वाचा प्रश्न आहे. कोरोनाच्या साथीमुळे जे आर्थिक आणि सामाजिक परिणाम होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर समाजातील मानसिक ताणतणाव मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. बातम्यांमध्ये आपण रोज बेरोजगारीने कोणी तरी जीवन संपवून घेतल्याचे वाचतो. समाज म्हणून वरच्या प्राधान्य क्रमाने आपण हाताळायला पाहिजे असा हा प्रश्न आहे. कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी ज्याप्रमाणे मास्क, शारीरिक अंतर राखणे आणि निर्जंतुकीकरण ह्याचा वापर आपण करत आहोत आणि आता लसीकरणाच्या माध्यमातून त्याच्याशी लढत आहोत .तसेच आत्महत्यांच्या वाढत्या घटनांविरोधी आपल्या सर्वांच्या मनाचे देखील प्रतिबंधक लसीकरण करणे आवश्यक होते आहे असे म्हणणे अनेकांना आश्चर्यकारक वाटू शकते पण लसीकरण ह्याचा अर्थ त्या आजाराविषयी प्रतिकार क्षमता निर्माण करणारी गोष्ट अशा व्यापक पातळीवर आपण अर्थ घेतला तर ह्या विचाराचे महत्व आपल्या लक्षात येईल.

सगळ्यात मोठी अडचण जर कोणती असेल तर ती म्हणजे मानसिक आरोग्य आणि आजार ह्या विषयी आपल्या समाजात असलेले प्रचंड अज्ञान आणि गैरसमज. शरीराचा आजार आपण जितक्या सहजपणे स्वीकरतो तसा मनाचा आजार अजिबात स्वीकारत नाही.मनाचे आजारपण हे अजून ही आपल्या समाजात लपवून ठेवण्याची गोष्ट समजली जाते. मनाचा आजार हा काहीतरी कलंक आहे अशा भावनेतून समाजात त्याकडे बघितले जाते. स्वाभाविकपणे मानसिक आजाराचा उपचार घेण्यापेक्षा लोक तो लपवण्याचा प्रयत्न करतात. ह्यामधून जर कोणी उपचारापर्यंत पोहचला तर मानसिक उपचारांविषयी असलेल्या प्रचंड गैरसमजांमुळे पूर्ण उपचार घेतला जात नाही.मानसोपचारतज्ञ फक्त झोपेच्या गोळ्या देतात, त्यांच्या औषधांची सवय लागते! अशा अनेक गैरसमजांना बळी पडून लोक उपचार पूर्ण करत नाहीत. 

आत्महत्येचे विचार बोलून दाखवणाऱ्या व्यक्तींच्या बद्दल देखील खोलवर रुजलेले गैरसमज आपल्या समाजात आहेत. ह्यआत्महत्येचा विचार बोलून दाखवणारे लोक हे नाटक करत असतातह्ण अथवा ह्यजो गरजते है वो बरसते नाहीह्ण असा आपल्याकडे मोठा गैरसमज आहे.प्रत्यक्षात जेव्हा एखादी व्यक्ती आत्महत्येचे विचार बोलून दाखवते तेव्हा ती,माझे मन माझ्या ताब्यात राहत नाही आहे आणि मला मदतीची गरज आहे, असे सांगत असते .त्याकडे आपण खूप संवेदनशीलतेने बघणे आवश्यक आहे.

मानसशास्त्रातील अनेक अभ्यास असे सांगतात की, आत्महत्या करण्यापूर्वीच्या काही आठवड्यात बहुतांश लोक हे आपल्या जवळच्या व्यक्तीकडे थेट किंवा अप्रत्यक्षपणे हा विचार बोलून दाखवत असतात. अत्यंत ताणाच्या प्रसंगी स्वत:ला इजा करून घेण्याचे विचार हे ५०% पेक्षा अधिक लोकांच्या मनात येत असतात. या पार्श्वभूमीवर आपण आपल्या जवळच्या व्यक्तीची भावनिक अस्वस्थता ऐकण्यासाठी उपलब्ध आहोत ही मोठी गोष्ट आहे. एखाद्या व्यक्तीचे आत्महत्येचे विचार शांतपणे ऐकून घेणे आणि त्याला योग्यप्रकारे मार्गदर्शन करणे ही आव्हानात्मक गोष्ट आहे. यामध्ये आपण जर भावनिक प्रथमोपचार कसे द्यावेत याचे छोटे प्रशिक्षण घेतले असेल तर आपण अधिक प्रभावीपणे हे काम करू शकतो. 

परिवर्तन संस्था आणि अंनिसच्यामार्फत भावनिक प्रथमोपचार देवू शकतील अशा दोनशेपेक्षा अधिक मानसमित्र आणि मैत्रिणींना मोफत प्रशिक्षण दिले. याचा त्यांना स्वत:ला आणि त्यांच्या कुटुंबाना जवळच्या लोकांना मोठा फायदा झाला.अशा उपक्रमांच्या माध्यमातून आपण समाजात चांगले ऐकणारे मानस मित्र /मैत्रिणी  तयार करू शकतो.केवळ भावनिक प्रथमोपचार देखील सर्व काही करू शकतील असे समजणे बरोबर नाही.आत्महत्या रोखण्याच्या प्रयत्नातील ती केवळ पहिली पण अत्यंत महत्वाची कडी आहे.त्याच्या पुढच्या टप्प्यावर अशा प्रत्येक मानस मित्र /मैत्रिणीनी तज्ञ मानसोपचार तज्ञासोबत जोडलेले असणे आवश्यक आहे.त्यामुळे आत्महत्येच्या विचारांचे गांभीर्य आणि तीव्रता ओळखायला शिकणे आणि मानसोपचार तज्ञाच्या देखरेखीखाली हे करणे अत्यंत आवश्यक आहे. जगभरात आत्महत्या रोखण्यासाठीच्या प्रयत्नात अशा गेट कीपर/भावनिक मदत देणारा द्वार रक्षकाचे महत्व दिसून आले आहे.काही वेळा मनात आत्महत्येचे विचार येणे हे तीव्र स्वरूपाच्या मानसिक आजाराचे देखील लक्षण असते. या मध्ये व्यक्तीला भास आणि भ्रम होत असतात.अशा वेळी उपचार हे तज्ञाच्या थेट निगराणी खालीच होणे आवश्यक असते हे पण आपण ध्यानात घ्यायला पाहिजे. 

आत्महत्या करणे हे कमकुवतपणाचे लक्षण आहे असे आपल्या कडे खोलवर रुजलेला आणखी एक गैरसमज आहे. सोशलमीडियावर अनेक लोक असे विचार व्यक्त करताना दिसतात .आपण हे समजून घेतले पाहिजे की आत्महत्येचे विचार मनात येणे हे टोकाच्या भावनिक अस्वस्थतेचे लक्षण आहे. ही अस्वस्थता कोणालाही अनुभवला येवू शकते. त्याच्यामागे जैवि-मनो-सामाजिक अशी तीन प्रकारची कारणे असू शकतात. जैविक पातळीवर मेंदूतील सिरोटोनीन द्रव्य आणि काही जनुके याच्याशी निगडीत असल्याचे अनेक अभ्यास आता झाले आहेत.मानसिक पातळीवर स्वभाव दोष ,टोकाचा उतावीळपणा हि करणे आहेत तर सामाजिक पातळीवर आर्थिक विषमता ,व्यसनाधीनता अशा स्वरुपाची करणे दिसून येतात.या तिन्ही गोष्टींच्या मिश्रणातून हे विचार जन्म घेतात हे आपण समजून घेतले पाहिजे.

स्वत:च्या आणि आपल्या कुटुंबाच्या पातळीवर ह्याविषयी आपण अनेक गोष्टी करू शकतो.सतत निराश वाटणे,झोप न येणे अथवा जास्त झोप येणे,भूक कमी होणे,सारखी चिडचिड होणे,अस्वस्थता राहणे,टोकाचे विचार येणे अशी लक्षणे आपल्याला स्वत:ला किवा आपल्या जवळच्या व्यक्तीमध्ये दिसून आल्यास आपण तज्ञांची मदत घेतली पाहिजे. तरूणाईच्या आयुष्यात सध्याच्या कालखंडात करियर आणि प्रेम /आकर्षण ह्यामधील गोंधळामधून निर्माण होणारे प्रश्न हे मानसिक अस्वास्थ्य आणि आत्महत्येशी खूप जवळून संबंधित असल्याचे आपल्याला दिसून येते. याविषयी कुटुंबात मोकळेपणाने बोलण्याचे वातावरण निर्माण करण्यातून अनेक प्रश्नांची तीव्रता कमी होऊ शकते. आयुष्यात अपयश आले म्हणजे आता आपण जगण्यास लायक राहिलो नाही हा विचार अनेक लोकांना आत्महत्येच्या कृतीकडे नेतो. अपयशाला सहजपणे सामोरे जाणारी मानसिकता घडवण्याचे महत्व देखील ह्या निमित्ताने अधोरेखित होते. शासनाच्या आरोग्य यंत्रणेमार्फत ज्या विविध स्वरूपाच्या सुविधा दिल्या जातात त्यामध्ये मानसिक आरोग्य आणि आत्महत्या प्रतिबंधक सुविधांचा मोठ्या प्रमाणावर समावेश करणे आवश्यक आहे. आत्महत्येविषयी वार्तांकन करताना अनेक वृत्तवाहिन्या ह्या पुरेशी संवेदनशीलता दाखवत नाही. त्यातून अनेकवेळा अनुकरणीय आत्महत्या वाढू शकतात. माध्यमांनी देखील आत्महत्या प्रकारात मार्गदर्शकतत्वांचे पालन करणे आवश्यक आहे.

आत्महत्या प्रतिबंधक हेल्प लाईन हे देखील आत्महत्या टाळण्यासाठी एक महत्वाची गोष्ट ठरू शकते .परिवर्तन संस्थेमार्फत चोवीस तास चालणारी आत्महत्या प्रतिबंधक हेल्पलाईन( 7412040300) चालवली जाते .नुकत्याच राज्य आणि केंद्र शासनाने देखील अशा हेल्पलाईन सुरु केल्या आहेत. त्यांचा मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार करणे आवश्यक आहे. ही मोफत हेल्पलाईन असून ह्यांवरची माहिती गोपनीय ठेवली जाते.  

आत्महत्यांची ही साथ रोखण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची गरज आहे. लेखात वरती बघितलेल्या उपायांच्या अनुषंगाने आपण सगळे,शासन आणि माध्यमे ह्यांनी एकत्र प्रयत्न केले तर समाज मनाचे आत्महत्याविरोधी लसीकरण आपण नक्कीच करू शकू आणि त्यामधून अनेक आत्महत्येमधून होणारे मृत्यू टाळू शकू असा विश्वास वाटतो. 

 

 (लेखक परिवर्तन संस्था, अंनिसच्या माध्यमातून समाजात कार्यरत आहे. )

Web Title: Suicide vaccination is possible ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे