ज्ञानेशकन्या प्रज्ञाचक्षु संत गुलाबराव महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 04:05 PM2019-09-07T16:05:24+5:302019-09-07T16:06:13+5:30

संत परंपरेतील एक देदीप्यमान व्यक्तिमत्त्व म्हणजे अमरावती जिल्ह्यातील माधानचे प्रज्ञाचक्षु संत गुलाबराव महाराज!

Gyaneshkanya Pragyachakshu Sant Gulabrao Maharaj | ज्ञानेशकन्या प्रज्ञाचक्षु संत गुलाबराव महाराज

ज्ञानेशकन्या प्रज्ञाचक्षु संत गुलाबराव महाराज

googlenewsNext

पवित्र ते कुळ पावन तो देश
जेथे हरीचे दास जन्म घेती -संत तुकाराम
महाराष्ट्र ही संतांची भूमी संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत तुकारामापासून ते कर्मयोगी संत गाडगे बाबा ज्यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक, अध्यात्मिक व साहित्य क्षेत्रामध्ये आपले अमूल्य योगदान दिले, अशी मोठी परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. या संत परंपरेतील एक देदीप्यमान व्यक्तिमत्त्व म्हणजे अमरावती जिल्ह्यातील माधानचे प्रज्ञाचक्षु संत गुलाबराव महाराज! संत गुलाबराव महाराज यांचा जन्म आषाढ शुद्ध दशमी ६ जुन १८८१ रोजी श्री. गोंदुजी व अलोकाबाई मोहोड या दाम्पत्याच्या पोटी लोणी टाकली जि. अमरावती येथे झाला. संत गुलाबराव महाराज याचं संपूर्ण जीवन विलक्षण अलौकिक होते. महाराज ९ महिन्याचे असताना त्यांचे डोळे आले व जंतुसंसर्ग झाला, त्यावर उपाय म्हणून त्यांच्या शेजारच्या एका म्हाताऱ्या स्त्रीने त्यांच्या आईला आयुर्वेदाचे औषध सुचविले. या औषधाने डोळे बरे होण्याएवजी त्यांना कायमचे अंधत्व आले. अनेक उपचार करूनही काहीही फायदा झाला नाही, त्यांचे चर्मचक्षु कायमचे निकामी झाले. बालपणीच अंधत्व आल्यामुळे त्यांचा सांभाळ त्यांच्या आईने मोठ्या कष्टाने केला. यातच दु:खाची भर म्हणून की काय काळाने त्यांचे मातृसुख हिरावून घेतले. केवळ चार वर्षाचे असताना ते मातृसुखाला पोरके झाले. सांभाळ करणारी मायच गेल्यामुळे त्यांचा सांभाळ कोणी करावा, हा प्रश्न निर्माण झाला. यावेळी त्यांच्या आईची आई आजी सावित्रीबाई यांनी त्यांना सांभाळण्याची जबाबदारी स्वीकारली. लहानपणीच दु:खाचे अनुभव आल्यामुळे त्यांची वृत्ती विरक्त झाली. एकांतात महादेवाच्या देवळात हरीचिंतन व ध्यान यातच स्वत:ला सातत्याने मग्न ठेवले. ते चिंतन करताना स्वत:ला हरवून जात, या ध्यानाचा परिणाम असा झाला की, त्यांची प्रज्ञा जागृत झाली आणि हा छोटा गुलाब प्रज्ञाचक्षु झाला. गावातील स्त्रिया जेव्हा नदीवर पाणी भरण्यासाठी जात तेव्हा हा छोटा गुलाब डोळे नसतानाही त्यांच्या बांगड्यांच्या आवाजावरून त्यांना त्यांच्या नावाने संबोधून हाक मारीत असे. आजीच्या मायेखाली बालपण सुखात जात असतानाच नियतीने पुन्हा त्यांच्यावर संकट टाकले. वय वर्ष १० असताना त्यांची आजी सावित्रीबाई इहलोक सोडून गेली. त्यांच्यावर पुन्हा आभाळ कोसळलं. पुन्हा त्याच्या सांभाळण्याचा प्रश्न निर्माण झाला. यातच त्यांच्या वडिलांनी दुसरे लग्न केले होते. वडिलांनी पुन्हा त्यांना माधानला परत आणले. आपल्या मुलाला औपचारिक शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी गावातील शिक्षक रामराव देशपांडे यांच्याकडे पाठवले. त्यांनी त्यांना संस्कृत, गणित, गीता व इतर शास्त्राचे शिक्षण दिले. त्यांचे वेदांत व योग ज्ञान पाहून रामराव देशपांडे भारावून गेले. हा मुलगा सामान्य नाही यांची त्यांना जाणीव झाली. अशातच वयाच्या १६ व्या वर्षी मानिकर्निका यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला. स्वत:च इतरांवर आश्रित त्यातच पत्नीची भर पडली. काही दिवसातच सावत्र आईचा त्रास सुरु झाला. पती, पत्नी दोघांनाही काहीही कष्ट न करता यांना संपतीचा वाटासुद्धा द्यावा लागेल, यामुळे त्रासात जास्तच भर पडली. या विवादामध्ये ते अनेक वेळा उपाशी राहत. शेवटी या जाचाला कंटाळून त्यांनी गृहत्याग करण्याचे ठरवलं आणि ते महादेवाच्या मंदिरात राहायला गेले. यातून त्यांचे मन विषन्न झाले. त्यांनी स्वत:ला ईश्वर भक्तीत झोकून दिले. संसारात सुख नाही याची त्यांना अनुभूती आली होती.
संत तुकाराम महाराजाप्रमाणे
तुका म्हणे त्याचा संग नव्हे बरा
शोधीत विठ्ठला जाऊ आता
त्यांनी परमात्मा तत्वाचा शोध घेण्यात स्वत:ला झोकून दिले. त्यांनी महादेवाच्या मंदिरात आश्रय घेतला याची बातमी त्यांचे शिक्षक व शिष्य रामराव देशपांडे व त्यांच्या पत्नी रंगुबाई यांना कळली त्यानी त्यांना आपल्या घरी राहावयास नेले. महाराजांच्या दिव्य ज्ञानाची त्यांना प्रचीती आली होती. त्यांनी महाराजांना आपले गुरु म्हणून स्वीकार केला.


संत ज्ञानदेवांचा साक्षात्कार
१९०१ मध्ये आपली पत्नी मनिकर्निका व इतर शिष्यासह ज्ञानेश्वर माऊलीच्या दर्शनासाठी त्यांनी आळंदीला प्रस्थान केले. ही त्यांची पहिली आळंदी भेट होती. माऊलीच्या समाधी मंदिरात प्रवेश करताच त्यांच्या डोळ्यातून घडघडा अश्रू वाहायला लागले. त्यांच्या तोंडातून शब्दसुद्धा फुटत नव्हते. महाराज समाधीसामोरच पद्मासन घालून ध्यानस्थ बसले. एकाच ध्यान अवस्थेत चार दिवस लोटून गेले तरी महाराज ध्यानातून उठले नाहीत. माऊलीने त्यांना साक्षात समोर येऊन अनुग्रह द्यावा ही त्यांची मागणी होती. चार दिवस काही न खाता पिता त्याच अवस्थेत माऊलीने प्रगट होऊन त्यांना स्वहस्ते अनुग्रह दिला. नाममंत्र दिला त्या दिवसापासून ते स्वत:ला ज्ञानेश कन्या म्हणून संबोधू लागले. संत ज्ञानेश्वरांनी प्रत्यक्ष दर्शन दिल्यामुळे संत ज्ञानेश्वरांचे फेटा बांधलेले पहिले छायाचित्र महाराजांच्या निर्देशाप्रमाणे अकोला येथील कलाकाराने काढले हेच एकमेव छायाचित्र आज उपलब्ध आहे. ज्ञानदेवांच्या दिव्यवानुभूतीमुळे त्यांची प्रज्ञा जागृत झाली. संप्रदाय सुरतरु या ग्रंथात त्यांनी या महादिक्षेचा उलेख केला आहे.
माझा सद््गुरू करुणाघन
आळंदी पती कल्याणनिधान
जेणे आपुलिया नामाचा मंत्र देऊन
कृथार्थ केले मजलागी
या साच करावयास नीजवचना
न देखोनी मम पात्रापन
अंगी घेवोनी खुणा
सांगितल्या स्वनामाच्या
महाराजांचे प्रज्ञाचक्षु जागृत झाल्यामुळे ते हिंदी, इंग्रजी, जपानी, जर्मन, बंगाली, तेलगु, कन्नड आदी भाषेतील साहित्य ते वाचू व समजू शकत. त्यांची प्रतिभा प्रगल्भ होती एखाद्या पुस्तकातील कुठल्या पानावर काय लिहिले आहे हे सुद्धा सांगत.


कात्यायनी व्रत
महाराजांनी १९०५ मध्ये वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी अमरावती जिल्ह्यातील शुक्लेश्वर वाठोडा येथ श्रीमद् भागवतातील दशम स्कंधात सांगितल्याप्रमाणे कात्यायनी व्रताची दीक्षा त्यांनी घेतली. श्रीकृष्ण पत्नीत्वाचा अधिकार मिळवण्यासाठी त्यांनी ३३ दिवस हे व्रत केले. तेव्हापासून त्यांनी स्त्रीवेष धारण करायला सुरुवात केली. मंगळसूत्र, भाळी कुंकू, वेणी, बांगड्या आदी स्त्री शृंगार त्यांनी परिधान करायला सुरुवात केली.


संत गुलाबराव महाराजांची ग्रंथ संपदा
महाराजांना अवघे ३४ वर्षाचे लौकीक आयुष्य लाभले. या अल्प जीवनात महाराजांनी १३४ पुस्तके लिहिली. ज्याची एकंदर पृष्ठ संख्या ६००० च्या वर आहे. त्यांनी डार्विन व स्पेन्सर यांच्या सिद्धांतावर भाष्य केले. ज्ञानयोग, भक्तियोग, वेदांत, उपनिषदे, मानसशास्त्र, आयुर्वेद, ब्र:म्हसुत्रे आदी विषयांवर लेखन केले. हे अनाकलनीय आणि सामान्य माणसाच्या विचारपलिकडचे आहे कि एक अंध व्यक्ती कुठलेही औपचारिक शिक्षण न घेता एवढे लिखाण कसे काय करू शकतो.शास्त्राच्या वाद्संवादामध्ये त्यांनी अनेक पंडितांना आणि बुद्धिवंतांना पराजित केले.गुलाबराव महाराजांचा आवडता ग्रंथ होतो भावार्थ दीपिका ते रोज या ग्रंथाचे वाचन करीत.सांख्य व योगादी षड्दर्शने परस्पर विरोधी नसून परस्पर पूरक असल्याचे ते प्रतिपादन करीत.नानाविध धर्म जसे हिंदू ,बौद्ध,जैन, मुस्लीम हे सर्व वैदिक धर्माच्या एकेका अंशावर स्थित आहेत असे विचार त्यांनी मांडले.त्यांना डार्विन चा उत्क्रांती सिद्धांत व स्पेन्सर चे तत्वज्ञान मान्य नव्हते .प्राचीन ग्रंथातील रेडियन ,ध्वनी ,इथर ,इलेक्ट्रोन ,उर्जा प्रकाश ,विमानविद्या ,अणुविद्या इ.विषयाचे मौलिक संदर्भ त्यांनी जगाला दाखविले.
थिआॅसोफिकॅल सोसायटीशी संबंध
१९०५ च्या दशकात थिआॅसाफीमधील डूू४’३ रू्रील्लूी हा विषय लोकांच्या कुतूहलाचा आणि आवडीचा होता. खास करून शिक्षित लोक थिआॅसाफीच्या अभ्यासाकडे वळलेले होते. महाराजांनी सुद्धा थिआॅसाफीच्या ग्रंथाचा अभ्यास करून सभासद होण्याचे ठरविले. त्याकरिता महाराजांना अकोला येथील श्री. नसरवानजी पारसी जे अकोला थिआॅसोफिकॅल सोसायटीचे सभासद होते, त्यांनी महाराजांना मदत केली. महाराज वासुदेव मुळे त्यांच्याकडे अकोला येथे थिआॅसोफिच्या अभ्यासासाठी आले. अनेक ग्रंथांचा अभ्यास करून अकोला थिआॅसोफिकॅल सोसायटीचे सभासद झाले. त्यांना इंडिअन सेक्शन वाराणसीकडून डिप्लोमासुद्धा प्राप्त झाला. थिआॅसोफिकॅल साहित्यामध्ये असणारे ज्ञान हे आपल्या वेद, उपनिषदे यामध्ये असल्याचे त्यांच्या लक्षात आले. अमरावती जिल्ह्यातील एकनाथ बारब्दे हे योग शास्त्राचा प्रचंड अभ्यास असणारे आणि थिआॅसोफिचे गाढे अभ्यासक होते, त्यांच्याकडे महाराज योगावर चर्चा करण्यासाठी जात, महाराज स्वत:च दिव्य योगी असल्याचे त्यांच्या लक्षात आले, त्यानंतर ते महाराजांचे शिष्य झाले.
परलोकगमन
महाराजांना सततचे उपवास व जेवणाकडे झालेले दुर्लक्ष यामुळे अवघ्या ३४ व्या वर्षी क्षयरोगाची व्याधी जडली. अनेक आयुर्वेदिक उपचार करूनही तब्येतीत फरक पडत नव्हता. मला माझा देह माझ्या गुरुचरणी ठेवायचा आहे म्हणून त्यांनी आपल्या शिष्यांना आळंदीला घेऊन जाण्याचा आग्रह केला. आळंदीला संत ज्ञानेश्वराचे दर्शन घेऊन पुण्यातच त्यांच्यावर उपचार सुरु झाले परंतु त्याचा फायदा झाला नाही. शेवटी महाराज हा इहलोक सोडून गेले. एक प्रतिभावंत संत, साहित्यिक, समाजसुधारक म्हणून त्यांनी केलेले कार्य अतुलनीय आहे. संत तुकाराम महाराजांच्या उक्ती प्रमाणे-
संत जेणे व्हावे
जग बोलणे सोसावे
त्यांना आपल्या जीवनात याचा प्रत्यय आला. महाराजांचे जीवन म्हणजे असिधारा व्रत होते. त्याच्या आयुष्याचे सिंहावलोकन करताना जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पुढील अभंग आठवतो.

 नाही संतपण मिळत हे हाटी 
हिंडता कपाटी राणी वाणी 
नये मोल देता धनाचिया राशी
नाही ते आकाशी पाताळीं ते
तुका म्हणे संत ओळखावे कैसे 
आपण व्हावे तैसे तेव्हा कळे 

 


-डॉ. ए. एस. सोनोने, अकोला. 

 

Web Title: Gyaneshkanya Pragyachakshu Sant Gulabrao Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.