‘डोन्ट फरगेट 2004’; काँग्रेस जिंकली त्याची गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2022 01:26 PM2022-04-17T13:26:57+5:302022-04-17T13:27:37+5:30

‘निवडणुकीत काहीही होऊ शकते, जर ठरवले तर!’ असा विश्वास हे पुस्तक देते. निवडणुकीच्या राजकारणात रस असलेल्या प्रत्येकाने वाचायलाच हवे असे हे पुस्तक आहे.

Don’t Forget 2004 The story of Congress victory | ‘डोन्ट फरगेट 2004’; काँग्रेस जिंकली त्याची गोष्ट

‘डोन्ट फरगेट 2004’; काँग्रेस जिंकली त्याची गोष्ट

googlenewsNext

राजू इनामदार, वरिष्ठ बातमीदार, पुणे -

काँग्रेस जिंकणे शक्यच नाही.’ २०२४च्या लोकसभा निवडणुकीच्या दोन वर्ष आधीच, या निवडणुकीचा अंदाज भारतातील एखादा नुकताच वयात आलेला नवमतदारही वर्तवतो आहे. २००४ची लोकसभा निवडणूकही अगदी अशीच होती. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींची लोकप्रियता ऐन भरात होती. १९९९च्या निवडणुकीत स्वतंत्र १८२ आणि आघाडी करून (राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीए) २९८ जागा जिंकून भारतीय जनता पक्ष केंद्रात सत्तेवर आला होता. काँग्रेसला १९९९मध्ये मिळाल्या होत्या ११२ जागा आणि आघाडी करून (संयुक्त लोकशाही आघाडी अर्थात यूपीए) १३५! त्याआधीपासूनच काँग्रेसला घरघर लागली होती. केंद्रातील सत्तेबरोबरच राज्यांमध्येही सत्तेतून पायउतार व्हावे लागत होते.

१९९९ ते २००४ या मधल्या पाच वर्षांत सत्ताधारी भाजपने काँग्रेसच्या विरोधात देशभर रान उठवत ‘इंडिया शायनिंग’ म्हणत जोरदार मुसंडी मारली होती. त्यामुळेच २००४च्या निवडणुकीत काँग्रेसला स्वतंत्रपणे देशभरात फार तर ७५ जागा मिळतील आणि त्यांच्या आघाडीला फार तर १२० वगैरे. भाजप आघाडीच सत्तेवर येणार आणि काँग्रेसला परत एकदा दारूण पराभवाचा सामना करावा लागणार, असेच बोलले जात होते.

या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे काम एका जाहिरात संस्थेला मिळाले. फक्त ७ ते १५ दिवस त्यांनी काँग्रेसची प्रचार मोहीम राबवली. ‘इंडिया शायनिंग’च्या विरोधात त्यांनी ‘काँग्रेस का हात सबके साथ’ अशी एकदम साधी भूमिका घेतली. सर्वसाधारण माणूस, आम आदमी हा त्यांनी केंद्रबिंदू ठरवला आणि त्यावरच सगळा भर दिला.
त्या निवडणुकीचे निकाल समोर आले त्यावेळी निवडणुकीत एखादी प्रचार मोहीम काय करू शकते, याचे दर्शन सगळ्या जगाला घडले. काँग्रेस स्वतंत्रपणे ११२ जागांवरून १४५ जागांवर आली तर त्यांची आघाडी १३५वरून २२० वर. त्याचवेळी भाजपची पूर्वीच्या १८२ जागांवरून थेट १३७ जागांवर गच्छंती झाली होती तर त्यांच्या आघाडीला २९८वरून १८५ वर आणले होते.

हे सगळे कसे झाले, याची गोष्ट म्हणजे ‘डोन्ट फरगेट २००४, ॲडव्हर्टायझिंग सिक्रेट्स ऑफ ॲन इम्पाॅसिबल इलेक्शन हिस्टरी’ हे इंग्रजी पुस्तक. ते लिहिले आहे त्या मोहिमेत प्रत्यक्ष अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावलेल्या जयश्री एम. सुंदर यांनी. भारतीय निवडणुकांमधील अनेक लहान-मोठ्या गमती या पुस्तकात आहेत. शिवाय कोणत्याही निवडणुकीत कोणालाही कमी समजू नये हा धडाही! भारतीय जनमानस फार विलक्षण आहे. यांना काय कळतं, असे सर्वांनाच वाटत असताना सामूहिकपणे अशी काही भूमिका मतपेटीतून व्यक्त होते की, भल्याभल्यांना त्याचा धसका बसावा. इंदिरा गांधी यांचा आणीबाणीनंतरचा पराभव व जनता पार्टीच्या पतनानंतरचे त्यांचे दिमाखदार पुनरागमन याच भारतीय जनमानसाने घडवून आणले होते. जयश्री सुंदर यांनी पुस्तकात याचाही बारकाईने विचार केला आहे. त्यावेळच्या काँग्रेसच्या निवडणूक जाहिराती या करायच्या म्हणून केलेल्या नव्हत्या तर हा असा बारीकसारीक विचार करून प्रसारित करण्यात आल्या होत्या.



पुस्तकाचे लिखाणही केवळ एक गोष्ट सांगावी अशा गमतीने झालेले नाही. गंभीरपणे ते लिहिले गेले आहे. ‘डोन्ट फरगेट २००४’ या शीर्षकातूनच हा गंभीरपणा दिसतो. निवडणूक कॅम्पेनशिवाय आणखीही बरेच काही त्यात आहे. लहान-लहान प्रकरणे करून जयश्री यांनी आशय अधिक सुलभ करून वाचकांसमोर आणला आहे. समजणे सोपे व्हावे म्हणून पुस्तकात छायाचित्रेही दिली आहेत. 

निवडणूक कॅम्पेन नव्हे -
पुस्तकाचे लिखाणही केवळ एक गोष्ट सांगावी अशा गमतीने झालेले नाही. गंभीरपणे ते लिहिले गेले आहे. ‘डोन्ट फरगेट २००४’ या शीर्षकातूनच हा गंभीरपणा दिसतो. निवडणूक कॅम्पेनशिवाय आणखीही बरेच काही त्यात आहे. 
 

Web Title: Don’t Forget 2004 The story of Congress victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.