क्रिकेटवेडय़ा देशांतले चाहते फक्त पराभवाने चिडलेत, की त्यात खेळापलिकडेही आणखी काही आहे?

By meghana.dhoke | Published: July 14, 2019 07:00 AM2019-07-14T07:00:00+5:302019-07-19T16:21:05+5:30

राजकीय नेतृत्वाकडून झालेला अपेक्षाभंग निदान खेळाडूंनी तरी करू नये आणि आपल्या देशाचा डंका वाजवावा अशी अनेकांची अतीव ‘भावुक’ अपेक्षा असते. म्हणून खेळाच्या आनंदाच्या पोटात ‘देश की इज्जत’ पणाला लावली जाते.

cricket & Indian sub continent, whats exactly wrong with cricket & fans emotional outburst? | क्रिकेटवेडय़ा देशांतले चाहते फक्त पराभवाने चिडलेत, की त्यात खेळापलिकडेही आणखी काही आहे?

क्रिकेटवेडय़ा देशांतले चाहते फक्त पराभवाने चिडलेत, की त्यात खेळापलिकडेही आणखी काही आहे?

Next
ठळक मुद्देभारत-पाकिस्तान-श्रीलंका-बांगलादेश आणि आता अफगाणिस्तान या भारतीय उपखंडात आहेत, तेवढे क्रिकेटवेडे आणखी कुठे असणार?एवढी प्रेक्षकसंख्या, इतका प्रचंड पैसा आणि स्पॉन्सर्स हे सगळं आहे; पण यातला एकही देश आजच्या फायनलमध्ये नाही.

मेघना ढोके

...हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा,  हुकला तो संपला...
या सुनील गावसकरनेच गायलेल्या गाण्याच्या ओळींचा साक्षात अनुभव त्याच्याच सत्तराव्या वाढदिवसाच्या दुसर्‍याच दिवशी भारतीय क्रिकेट प्रेक्षकांना यावा?- हा खरं तर योगायोगच म्हणायला हवा! दुर्दैवी योगायोग.
न्यूझीलंडने भारताला नमवत केवळ भारतीय संघाचंच नाही, तर संपूर्ण दक्षिण आशियाचंच विश्वचषकातलं आव्हान संपवलं. खरं तर आयसीसीनेच प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार क्रिकेटच्या एकूण प्रेक्षकसंख्येपैकी 90 टक्के प्रेक्षक हे भारतीय उपखंडात आहेत. म्हणजे भारत-पाकिस्तान-श्रीलंका-बांगलादेश आणि आता अफगाणिस्तान या देशातले क्रिकेटवेडे जिथं कुठं असतील तिथं वेडय़ासारखे बेभान होऊन सामने पाहतात. पदरमोड करून थेट स्टेडिअममध्ये पोहोचलेल्या भारतीय प्रेक्षकांची संख्या पाहून इंग्लंड आणि अन्य देशांचे प्रेक्षक दबून गेल्याचं आपण याही विश्वचषकात पाहिलंच. 
जिथं एवढी प्रेक्षकसंख्या, इतका प्रचंड पैसा, स्पॉन्सर्स त्या उपखंडातला एकही संघ फायनलर्पयत पोहोचला नाही. त्यानंतर या तमाम देशात दुर्‍ख आणि क्षोभ यांच्या लाटा उसळल्या. उपखंडातल्या प्रेक्षकांची वृत्ती, वर्तन आणि त्यांचे संघ यांच्यात एक अन्योन्य नातं दिसतं. उपखंडातलं सामाजिक-राजकीय अस्वस्थ वातावरण आणि क्रिकेट, सामान्य लोक आणि त्यांच्या अपेक्षा, क्रिकेटला आलेला अ‍ॅस्पिरेशनल प्रतीकात्मक चेहरा याची नाळ  परस्परांत गुंतलेली आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भारतासह या तमाम उपखंडीय देशांची आर्थिक स्थिती, जी जेमतेम आहे. गरीब-मध्यमवर्गीय-दोन वेळची तजवीज करण्यात अडकलेला वर्ग या देशांत मोठा. त्याच देशातल्या खेळाडूंना पंचतारांकित सुविधा मिळतात. प्रचंड पैसा मिळतो. एका अर्थानं हे खेळाडू ‘प्रिव्हिलेज्ड’ असतात. आणि त्यामुळेही तमाम प्रेक्षकांना असं वाटतं की, जे आपल्याला मिळत नाही ते यांना मिळत असेल तर देशाच्या अपेक्षा पूर्ण करणं हे खेळाडूंचं कर्तव्यच आहे. राजकीय नेतृत्वाकडून झालेला अपेक्षाभंग निदान खेळाडूंनी तरी करू नये आणि आपल्या देशाचा डंका वाजवावा अशी अनेकांची अतीव ‘भावुक’ अपेक्षा असते. म्हणून खेळाच्या आनंदाच्या पोटात ‘देश की इज्जत’ पणाला लावली जाते.
विश्वचषकातली हार या सार्‍याला सुरुंग लावते; यंदाही भारतीय उपखंडात तेच घडलं. 

भारत

‘व्हिलन’ नक्की कोण?

भारतीय संघ या विश्वचषक स्पर्धेत उत्तम दावेदारी सांगत होता, उत्तम खेळला, साखळी सामन्यात अव्वल राहिला हे वास्तव आहे. मात्र अगदी गावसकर-कपिल देव-तेंडुलकर-द्रविड ते धोनी-कोहली या किमान पाच दशकांच्या प्रवासात सर्व जबाबदारी एका स्टार खेळाडूवर आणि तो तंबूत परतला की संघाचं पानिपत हे चित्र कधीच बदललं नाही. जोवर संघ जिंकतो तोवर प्रेक्षकही गावसकर-तेंडुलकर-धोनी-कोहलीचा देव करतात. त्यांना डोक्यावर घेतात आणि संघ हरला की मात्र ‘व्हिलन’ कोण हे शोधतात. खेळाडूंचं दैवतीकरण हा सगळ्यात मोठा दोष भारतीय प्रेक्षक मानसिकतेचाही आहे. त्यामुळे संघबांधणी, व्यवस्थात्मक बदल याची चर्चाच होत नाही. 
विश्वचषकात पाकिस्तानला मात देणं हे प्रेक्षकांनाच इतकं महत्त्वाचं वाटतं की, मारलं ना पाकिस्तानला मग तोच आपला वर्ल्डकप. ‘लो एम इज अ क्राइम’ हेच भारतीय प्रेक्षक विसरतो आणि पाकिस्तानला नमवलं की खेळाडूंच्या आरत्या गातो.
बीसीसीआय आजच्या घडीला जगातलं सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. खेळाडूंना मेहनतानाही जबरदस्त मिळतो. विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमरा हे ए प्लस कॅटेगरीचे खेळाडू आहेत. त्यांचं बोर्डाशी वार्षिक कॉण्ट्रॅक्टच 7 कोटी रुपयांचं आहे. बाकी संघात खेळणार्‍या ( धोनीसह) अजून काही खेळाडूंना 5 कोटी, तर नवीन बी ग्रेड खेळाडूंना 3 कोटी रुपये वर्षाला मिळतात. याशिवाय मॅच फी आणि जाहिराती हे वेगळं. या विश्वचषकात तर ‘कॅप्टन म्हणेल ते’ अशी भूमिका बीसीसीआयने घेतली होती. त्यामुळे ‘यो यो टेस्ट’ सक्तीपासून संघात कोहली म्हणेल तो खेळाडू, तो म्हणेल ते आवडतं शेडय़ुल असं सगळं त्याला देण्यात आलं. ते पाहता कप्तान म्हणून कोहलीची कामगिरी सतत  निराशाजनकच आहे. मग प्रश्न येतो की कोहली-शास्त्री जोडीचं पुढं काय होणार?
तसंही पराभवानंतर कप्तान बदलण्याची मलमपट्टी करणं यापलीकडे इतिहासात आजवर ठोस काम बीसीसीआयने कधीही केलेलं नाही. आणि कुणातरी एकाला ‘हिरो’ करणं आणि भजणं यापलीकडे भारतीय मानसिकताही बदलत नाहीच, मग ते क्रिकेट असो, सिनेमा असो नाहीतर राजकारण!

पाकिस्तान

चीड आणि संताप


पाकिस्तान संघानं भारतासमोर सपशेल शरणागती पत्करली आणि आगडोंब उसळलेल्या पाकिस्तानात खेळाडूंना अक्षरशर्‍ तुडवलं गेलं. कप्तान सरफराजला मोटे-मोटे म्हणून चिडवणं, त्यांचं खाणं काढणं, त्याच्या जांभईवरून भयंकर आक्रोश करणं यासह पाकिस्तानी लोकांनी भरपूर आकांडतांडव केलं. त्यानंतर संघ जिंकायला लागला तसं परत संघाला डोक्यावर घेतलं. सार्‍या देशाला 92चं भूत बाधलं होतं, ते उतरलं. आणि आता तर इंझमाम-उल-हक या चीफ सिलेक्टरची गच्छंती झाली आहे. सरफराजही जाणं अटळ आहे. आणि लोक उघड बोलत आहेत की, ज्या देशात लोकांना खायला नाही, महागाई प्रचंड आहे, दूध 180 रुपये लिटर झालं आहे, टमाटे घेण्याची लोकांची ऐपत नाही, अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडलं आहे तिथं जर या खेळाडूंपायी इतका खर्च होणार असेल तर त्यांनी ‘वतन की शान’ राखलीच पाहिजे. ते झालं नाही म्हणून पाकिस्तानी प्रचंड चिडले.
हा राग खरं पाहता फक्त खेळाडूंवरचा नाही. नया पाकिस्तानचं स्वप्न दाखवणारा हॅण्डसम कप्तान इमरान खान देशाला गर्तेतून बाहेर काढू शकलेला नाही. उलट झोळी घेऊन मदत मागायला जगभरात जातोय. देशात लोकांनाच सांगतोय की थोडी कळ सोसा, त्यामुळे जे राजकीय नेतृत्वाला साधत नाही, ते खेळाडूंनी करावं अशीच सुप्त अपेक्षा. मात्र ती पूर्ण झाली नाही आणि पाकिस्तानात असंतोष उफाळून आला. 

श्रीलंका

मैदानावरही दुर्दैवच!


राजकीय अनिश्चितता, नेतृत्वातली अनबन आणि दहशतवादी हल्ल्यानंतर जणू मिटून गेलेला देश अशी श्रीलंकेची अवस्था आहे. आर्थिक संकट मोठं आहे. पर्यटन व्यवसाय बुडालेला आहे. त्यात बोर्डाकडे पैसा नाही अशीही चर्चा. एक आविष्कारा फरनांडो गवसला हीच काय ती त्यांची या वल्र्डकपची कमाई. आणि मलिंगा उत्तम खेळला हा आनंद. बाकी आता पुन्हा कोचची उचलबांगडी होते आहे. बॉलिंग कोच म्हणून चामिंडा वासला पाचारण केलं जातंय. विदेशी प्रशिक्षकाची शोधाशोध सुरू झाली आहे. 
 सनथ जयसूर्या भारत-श्रीलंका सामन्याच्या वेळी चक्क सामान्य प्रेक्षक स्टॅण्डमध्ये दिसला. एवढा मोठा खेळाडू स्टॅण्डमध्ये कसा, असा प्रश्न मनात आलाच असेल तर त्याचं उत्तर हेच की, आर्थिक घोळ केला म्हणून आयसीसीने त्याच्यावर दोन वर्षाची बंदी घातली आहे. तरी तो सामना पहायला आला आणि श्रीलंकन खेळाडूंशी संपर्क करतो म्हणून आयसीसीने नाराजी व्यक्त करत श्रीलंकन बोर्डाला तंबी दिली. एकेकाळचा महान खेळाडू अशी पत गमावतो हा श्रीलंकन क्रिकेटला बट्टा आहेच. 
असे अनेक बट्टे लागलेल्या या संघाकडून श्रीलंकन माणसाला काहीच अपेक्षा नव्हती, ते जगण्याची उमेद शोधत आहेत. दुर्दैवानं संघानं ती काही दिली नाही.

बांगलादेश

लिंबूटिंबूंचा कोमट खेळ


बांगलादेशचा संघ या स्पर्धेत उत्तम खेळला म्हणून त्यांचं क्रिकेट जगात प्रचंड कौतुक झालं. मात्र तरीही संघ उपांत्य फेरी गाठू शकला नाही म्हणून बांगलादेशी प्रेक्षकच नाही, तर सरकारही नाराज आहे. माध्यमं, समाजमाध्यमं आणि क्रिकेट धुरीणांनी खेळाडूंनाच नाही तर बोर्डाला आणि सरकारला धारेवर धरलं जात आहे.
गेली 19 वर्षे बांगलादेशला टेस्ट क्रिकेटचा दर्जा आहे. हा त्यांचा सहावा वर्ल्डकप होता. मात्र आजही बांगलादेश संघाची गणना लिंबूटिंबू म्हणूनच होते. त्याचा परिणाम असा की, बांगलादेश क्रिकेटकडे ना स्पॉन्सर्स आहेत, ना पैसा. अलीकडेच ऑस्ट्रेलिया बोर्डानं बांगलादेशचा दौरा आर्थिकदृष्टय़ा परवडणार नाही म्हणत रद्द केला. एवढंच कशाला 1998 नंतर म्हणजे गेल्या 21 वर्षात भारतानं एकटय़ा बांगलादेशला कधीही दौर्‍यावर आपल्या देशात बोलावलेलं नाही. तिरंगी-चौरंगी मालिकांचा अपवाद. कारण बांगलादेशला भारत हरवणारच, म्हणून प्रेक्षकच फिरकत नाहीत. 
हे चित्र बदलायचं ठरवून पंतप्रधान शेख हसीना यांनी बोर्डाला आणि संघाला सुविधांसह आर्थिक मदत केली. भरपूर पैसा ओतला. बोर्डाला फ्री हॅण्ड दिला. मात्र उपयोग शून्य. आता अनेक खासदारही सरकारला विचारत आहेत की या संघाच्या कामगिरीचं उत्तरदायित्व कुणाचं? सबीर हुसेन चौधरी हे खासदार आहेत आणि बांगलादेश बोर्डाचे माजी अध्यक्ष त्यांनी तर लेख लिहून उघड सरकारला आणि बोर्डाला धारेवर धरलं आहे. सध्या पाकिस्तानी जनतेपेक्षा बांगलादेशी जनता जास्त चिडलेली आहे.

अफगाणिस्तान

कोरडं कौतुक फक्त..

अफगाणिस्तान संघानं भारत-पाक संघांना जेरीस आणलेलं असलं तरी त्या संघाचंच मुळात काही खरं नाही. प्रशिक्षक फिल सिमन्स आणि सीलेक्टर दावलत अहमझाई यांच्यातलं युद्ध जगजाहीर झालं. कप्ताननिवडीवरूनची भांडणं तर संघ सहकारी इंग्लंडमध्ये एका हॉटेलात उघड करताना दिसले. कप्तान आणि खेळाडू यांच्यातून विस्तव जात नाही अशी परिस्थिती आहे. 
म्हणजे एकीकडे अफगाण लोकांच्या उमेदीचं, नव्या जगण्याचं आणि ओळखीचं प्रतीक म्हणून अफगाण क्रिकेटकडे पाहिलं जात आहे, दुसरीकडे संघातील खेळाडूंची मोट सुटलेली आहे. त्यात अफगाण सरकार उच्चस्तरीय अधिकार्‍यांच्या सेक्स स्कॅण्डलमुळे हादरलेलं आहे. तालिबान कधीही सत्तेत परतेल असं भय आहे. आणि दुसरीकडे क्रिकेटमध्ये पैसा ओतणं सुरू आहे. मोठी स्टेडिअम्स बांधणं ते भारतात क्रिकेट प्रशिक्षण असा सारा आर्थिक आघाडीवर न परवडणारा मामला आहे. संघाला मात्र त्या सार्‍याची जाण नाही, असं एक चित्र आहे. त्यामुळे तूर्तास कोरडय़ा कौतुकापलीकडे या संघाच्या आणि अफगाण माणसांच्या हाती काहीही लागलेलं नाही.

( लेखिका लोकमत वृत्तपत्र समूहात मुख्य उपसंपादक आहेत.)
meghana.dhoke@lokmat.com

Web Title: cricket & Indian sub continent, whats exactly wrong with cricket & fans emotional outburst?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.