‘पाणी’दार मुलं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2019 06:03 AM2019-10-06T06:03:00+5:302019-10-06T06:05:06+5:30

शेजारच्या गावात आपल्यापेक्षा कमी पाऊस पडूनही त्यांना टॅँकरची गरज पडत नाही. असं कसं? - मुलांना प्रश्न पाडला. काय करता येईल? त्यांनी त्यावर अभ्यास सुरू केला.  स्वत: कामाला सुरुवात केली. त्यांचं पाहून इतर तरुण मुलं आणि गावातली मोठी माणसंसुद्धा मदतीला आली. आता आपल्याला हंडे-बादल्या घेऊन पाण्यासाठी वणवण करावी लागणार नाही, हे त्यांना माहीत होतं!.

Children's unique efforts to get water and stop drought.. | ‘पाणी’दार मुलं!

‘पाणी’दार मुलं!

Next
ठळक मुद्देधड ना लहान, धड ना मोठे अशा ‘मधल्या’ मुलांसाठी नवी ‘विण्डो’

- गौरी पटवर्धन

‘मंग आता?’ बाळ्याने विचारलं.
‘आता काय? आता ग्येलं समद पानी व्हाऊन..’ संत्या म्हणाला.
‘आरे पन आसं नाही व्हायला पायजेल.’ सीमा म्हणाली, ‘माझ्या आयला सारखा ताप येऊ र्‍हायला. मलाच शाळा बुडवून पान्याला जाय लागतं.’
‘आपण पयलेच कायतरी कराय लागत व्हतं.’ बाळ्या म्हणाला.
‘पन आपन काय करनार?’ संत्या म्हणाला.
‘आरे आसं कसं? यवडा पाऊस पडला तरीबी गावाला टॅँकर लागला तर काय र्‍हायल?’ बाळ्या अजूनही नुसता प्रश्न मांडत होता. मग सीमा चिडली.
‘आरे ते समजलं रे. यावर्षी लै पाऊस झाला नि समदा व्हाऊन गेला. समजलं. मंग आता काय करायचं? हाळी देऊन बगायची का? आरं ये222222 पावसा222222.. आरं ये पान्या222222 हिकडं ये! आसं?’
‘गपे.’ बाळ्या चिडला.
‘तूच गप. कवाची कटकट लावलीये. आणि तेच तेच बोलू र्‍हायला इतिहासाच्या मॅडमसारखा.’ सीमा म्हणाली. इतिहासाच्या मॅडमचं नाव काढल्यावर संत्या हसायला लागल्या. त्यांना शिकवताना असं करायची सवय होती. एकच वाक्य पुन: पुन्हा वेगवेगळ्या पद्धतीने सांगत राहायचं. त्या त्यांना यावर्षी सातवीला पहिल्यांदाच शिकवायला होत्या. पण बाळ्याला त्या माहिती नव्हत्या. तो पहिली सहामाही दुसर्‍या गावाला शिकायला गेला होता. त्याला त्याच्या आत्याकडे सोबतीला ठेवलं होतं. कारण तिच्या मिस्टरांची बदली दुसर्‍या गावी झाली होती आणि आत्याची मुलं छोटी होती. पण आता त्यांची बदली परत आत्याच्या गावी झाल्यामुळे बाळ्या दिवाळीनंतर परत त्याच्या गावी येणार होता.
बाळ्याच्या गावी महामूर पाऊस पडायचा. आत्याच्या गावी मात्न जेमतेम पाऊस पडायचा. पण तरीही, आत्याच्या गावी तिथल्या लोकांनी जेवढं पाणी पडेल तेवढं अडवलं होतं आणि जिरवल होतं. त्यामुळे त्यांच्याकडे वर्षभर पाणी असायचं. आणि बाळ्याच्या गावी मात्न खूप पाऊस पडूनसुद्धा काही उपयोग व्हायचा नाही. पडलेलं सगळं पाणी वाहून जायचं, दिवाळी झाली की मुली आणि बायका हंडे घेऊन पाण्यासाठी लांब लांब जायला लागायच्या आणि जास्तीत जास्त होळीनंतर गावाला टॅँकर लागायचा. इतकी वर्षं बाळ्या लहान होता. पण यावर्षी आत्याच्या गावी एक सहामाही राहिल्यामुळे त्याला दोन गावांमधला फरक नीट दिसला होता. आणि आत्याच्या गावातले लोक जे करू शकतात ते आपल्या गावात का करत नाहीत, असा त्याला प्रश्न पडला होता. तो बिचारा तोच प्रश्न मांडायचा प्रयत्न करत होता आणि त्याचे सगळ्यात जवळचे मित्न त्याची चेष्टा करत होते. पण बाळ्या एवढय़ा-तेवढय़ा चेष्टेला भीक घालणार्‍यातला नव्हता. तो म्हणाला,
‘आगं माझे बाय.. माझं ऐकून तरी घे. माझ्या आत्याच्या गावी आपल्यापेक्षा कमी पाऊस पडतो; पन त्यांच्या गावाला टॅँकर लागत न्हाई. कारण त्यांचं पानी असं व्हाऊन जात न्हाई.’
‘बरं मंग? आपण काय करायचं? तुझ्या आत्याच्या गावी र्‍हायला जायचं का?’ 
- संत्या अजून टाइमपास करायच्याच मूडमध्ये होता.
‘किंवा आपण आपलं गाव आत्याच्या गावासारखं करूया.’ बाळ्या म्हणाला.
‘काय?’ संत्याने अविश्वासाने विचारलं, ‘डोस्कं फिरलंय तुझं.’
‘का?’
‘का म्हणजे? आपण कसं गाव बदलणार? कायबी बोलतोस तू.’ सीमा म्हणाली.
‘का? त्यांनी पन कवातरी सुरु वात केली आसल न्हवं? आपण आता करू.’
‘आरे पन आपलं कोन ऐकेल?’ संत्याला प्रामाणिक प्रश्न पडला होता.
‘पन आपन कशाला कोणाला सांगायला जायचं?’ बाळ्याला पण प्रामाणिक प्रश्न पडला होता.
‘अय भाऊ.. तू जरा नीट सांगशील का?’ सीमा वैतागली. मग बाळ्याने त्या दोघांना त्याचा प्लॅन सांगितला. त्याचं म्हणणं असं होतं, की आत्याच्या गावी सगळ्या छोट्या छोट्या ओढय़ांवर छोटे छोटे बांध घातले आहेत. त्यामुळे तिथलं पाणी सुसाट वाहून जात नाही. ते तिथे थांबतं आणि जमिनीत मुरतं. त्यामुळे भूजलपातळी उंचावते आणि गावातल्या सगळ्या विहिरींना पाणी येतं आणि ते वर्षभर राहातं. आणि ते छोटे बंधारे बांधायला अगदीच सोपे असतात. ते छोटे छोटे बंधारे थोड्या थोड्या अंतराने बांधायचे. म्हणजे ओढय़ात छोटी तळी तयार झाल्यासारखी होतात. हे तो सांगत होता तोवर सीमा आणि संत्याने ऐकून घेतलं; पण जेव्हा बाळ्या असं म्हणाला, की हे बंधारे बांधायला मोठय़ा माणसांना सांगायची काहीच गरज नाही, कारण हे बंधारे आपणपण बांधू शकतो, तेव्हा मात्न संत्याने असं डिक्लेअर केलं की बाळ्या नक्की डोक्यावर पडलाय.
पण मग बाळ्याने त्यांना सांगितलं की आत्याच्या गावीपण पहिला बंधारा ज्याने बांधला, तो त्यावेळी सातवीतच होता. त्याने आणि त्याच्या मित्न-मैत्रिणींनी मिळून पहिला बंधारा बांधला. मग बाकीच्या गावकर्‍यांना त्याचं महत्त्व पटलं. तो करू शकतो तर आपण का नाही? हे ऐकल्यावर सीमा आणि संत्याने त्या आयडियाचा सिरीयसली विचार करायला सुरु वात केली.
आणि एकदा सातवीतल्या मुलांनी जर ठरवलं, तर ते ती गोष्ट केल्याशिवाय कसे राहातील? त्यांनीसुद्धा त्यांच्या गावात एक बंधारा बांधला. त्यांनी त्यासाठी इतकी मेहनत घेतली की त्यांच्या गावातले कॉलेजला जाणारे ताई-दादा त्यांच्या मदतीला आले आणि शेवटी मोठी माणसंसुद्धा कुदळ, फावडी घेऊन आली. आता बाळ्या जरी आत्याकडून त्याच्या स्वत:च्या गावी परत आला तरी पाण्याच्या दृष्टीने दोन्ही गावं पुढच्या वर्षी सारखीच असतील हे त्याला माहिती आहे.
lpf.internal@gmail.com
(गौरी ‘लिट्ल प्लॅनेट फाउण्डेशन’ची समन्वयक आहे.)

Web Title: Children's unique efforts to get water and stop drought..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.