चरखा- एकाचवेळी सत्तापालटाचं शस्र आणि तत्त्वज्ञानाचं भावार्थ प्रतीक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 06:02 AM2020-02-23T06:02:00+5:302020-02-23T06:05:04+5:30

डिझाइनची क्रिया माणसाच्या  अस्तित्वाइतकीच जुनी आहे.  सहा हजार वर्षांपूर्वी माणसानं एका वस्तूचं डिझाइन तयार केलं; ती माणसाच्या असंख्य गरजा पुरवून गेली.  त्या वस्तूची निर्मिती मात्र मनुष्याच्या  मूलभूत गरजपूर्तीसाठी झाली होती.

Charkha - the weapon of power and the true symbol of philosophy! | चरखा- एकाचवेळी सत्तापालटाचं शस्र आणि तत्त्वज्ञानाचं भावार्थ प्रतीक!

चरखा- एकाचवेळी सत्तापालटाचं शस्र आणि तत्त्वज्ञानाचं भावार्थ प्रतीक!

Next
ठळक मुद्देघडणार्‍या, मोडणार्‍या, नव्याने घडणार्‍या,  सतत बदलणार्‍या ‘आकारां’च्या दुनियेतला  विचार आणि शास्र

- स्नेहल जोशी 

आजवरच्या लेखांमधून आपण पाहत आलो, माणूस स्वत:च्या गरजांसाठी भौतिक साधनांची जोड-तोड करत, वस्तू बनवत, भोवतालची परिस्थिती स्वत:साठी सुखकर करत असतो. यालाच तर डिझाइन म्हणतात. डिझाइनची क्रि या माणसाच्या अस्तित्वाइतकीच जुनी आहे. पण मनुष्यप्राणी इतका जटिल आहे, की त्याच्या गरजाही तितक्याच क्लिष्ट. आज आपण ज्या वस्तूबद्दल चर्चा करणार आहोत ती माणसाच्या किती गरजा पुरवून गेली ते पहा. त्या वस्तूची निर्मिती मात्र मनुष्याच्या मूलभूत गरजेच्या पूर्ततेसाठी झाली होती. गरज- वस्रांची.
माणसानी जंगल सोडलं आणि अन्नासाठी शेतीचा शोध लावला. अन्नाची भ्रांत मिटल्यावर साहजिकच तो स्थिरावला. पण वस्रासाठी अजूनही तो प्राण्यांवर, झाडांवर अवलंबून होता. वाढत्या लोकसंख्येला वस्र म्हणून जनावराचं कातडं किती काळ पुरणार होतं? वल्कलंसुद्धा फार आरामदायक नाहीतच. याला पर्याय हवा होता, तेव्हा माणसाला निसर्गातला तंतू उमगला. 
कोळिष्टकं, घरटी पाहून विणकामाचं तंत्र माणसाला अवगत झालं होतं. सुमारे सहा ते आठ हजार वर्षांपूर्वी माणसांनी धुर्‍याची फिरकी (स्पिण्डल) तयार केली, जिच्या साहाय्यानं सूत काढलं जाई.
त्याचप्रमाणे झाडाच्या फांद्यांची चौकट तयार करून, प्राथमिक मागही बनवला गेला. सूतकताई आणि विणकामाचं तंत्रज्ञान हळूहळू विकसित होत गेलं. पाच हजार वर्षांपूर्वीही माणसांनी व्यापार सुरू करून आपली उद्यमशीलता सिद्ध केली होतीच. त्यामुळे आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करून, माणूस व्यापारासाठी अतिरिक्त उत्पादन करू लागला. त्याकाळीही सिंधू प्रदेशात सर्वात मोठा व्यापार मसाले आणि सुती कपड्याचा होता. मेंढय़ांच्या तलम लोकरीपासून, उंटांच्या खरड केसांपासून तर कापसाच्या मऊ तंतूपासून धागे तयार केले जात. जाड धागे असतील तर घोंगडीवजा पांघरूण विणलं जाई आणि मऊ धागा असल्यास वस्र. त्याचबरोबर धागे आणि कपडा रंगवण्याचं तंत्रही विकसित होऊ लागलं. 

भारतात गुप्त साम्राज्याचा काळ सर्वार्थानी सुवर्णकाळ ठरला. या काळात कला, विज्ञान आणि व्यापार सगळंच उत्तम प्रगतिपथावर होतं. व्यापारात वस्तूंबरोबरच तंत्रांची, कल्पनांची, भाषेचीही देवाण-घेवाण होती. आजपर्यंतचा भारताचा इतिहास घडवणारी, बदलणारी वस्तू या काळात जन्माला आली, ती म्हणजे चरखा. ‘चरखा’ या शब्दाचं मूळ पर्शियन भाषेत असून, त्याचा अर्थ चक्र  किंवा चाक असा होतो. मुख्य गरज, मानवी र्शम कमी करून, कापसापासून अखंड, तलम सूत कातण्याची होती. एका बाजूला पूर्वीप्रमाणेच फिरकी (स्पिण्डल) आहे, जिच्या आधारे सूत काढलं जातं. ही फिरकी पट्टय़ाच्या साहाय्यानं मोठय़ा चाकाला जोडली आहे. हे चाक फिरवून, आधी काढलेल्या सुताला पीळ दिला जातो, जेणेकरून धागा मजबूत होतो. हा धागा मग त्याच फिरकीवर गुंडाळून साठवला जातो.
1500 वर्षांपूर्वीचा चरखा त्या काळच्या औद्योगिक क्र ांतीची गाथा तर सांगतोच; पण त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाची भूमिका त्यांनी आपल्या स्वातंत्र्यसंग्रामात बजावली आहे.
दादाभाई नवरोजी, लोकमान्य टिळक, गो.कृ. गोखले, म.गो. रानडे यासारख्यांनी स्वदेशी विचारांची पायाभरणी केली. या विचारांची चळवळ मात्न गांधीजींच्या नेतृत्वाखाली 1905 साली, बंगालच्या फाळणीप्रसंगी उभी राहिली. विदेशी वस्रांची होळी करून ‘इंग्रजी’ वस्तू, विचार आणि सत्तेवर भारतीयांनी सार्वजनिक बहिष्कार नोंदवला. या चळवळीमुळे भारताच्या राजकारण, अर्थकारण, समाजकारण आणि संस्कृती या सगळ्यांमध्ये आमूलाग्र बदल घडणार होता. राजकीय स्वातंत्र्य मिळवण्याची दिशा तर ठरलीच; पण त्याहीपेक्षा सगळ्या पातळ्यांवरून व्यक्तिस्वातंत्र्याच्या कल्पनांना चालना मिळाली. या चळवळीतून गांधीजींनी आत्मनिर्भरता आणि स्वावलंबनाच्या कल्पना समाजात जागृत केल्या. खादीची वस्रं, टोपी आणि चपला हा स्वदेशी मतवादी असलेल्यांचा गणवेशच झाला. नवीन विचारांना, तत्त्वांना नवीन रूपकांची, प्रतीकांची गरज असते. ज्यावेळी स्वदेशी चळवळ समाज सुधारणेचं शस्र ठरली, त्यावेळी तिची स्वत:ची सांस्कृतिक ओळख निर्माण करण्याचीही नितांत गरज होती. आणि लवकरच ‘चरखा’ हे आत्मनिर्भरतेचं, आत्मविश्वासाचं आणि स्वाभिमानाचं म्हणजेच स्वदेशी तत्त्वाचं प्रतीक झालं.
प्रत्येकानं स्वत:च्या कपड्यासाठी सूत स्वत: कातावं यासाठी चरखा प्रत्येक घरात पोहोचला पाहिजे आणि प्रत्येकाला तो वापरताही आला पाहिजे या हेतूनं 1929 साली गांधीजींनी भारतातली पहिली डिझाइनची स्पर्धा जाहीर केली; ती हा चरखा आधुनिक करण्यासाठी होती. स्पर्धेच्या शर्ती बघा. चरखा हलका, कुठेही सोबत नेता येईल असा हवा. कोणालाही डाव्या किंवा उजव्या हातानं किंवा पायानंही सहज वापरता यायला हवा. स्रियांनाही त्यावर आठ तास न थकता काम करता यावं. आठ तास काम केलं तर सोळा हजार फूट सुताच्या बारा ते वीस लडी तयार व्हाव्यात. चरखा स्वस्त आणि मजबूत असावा. व्यवस्थित काळजी घेतल्यास किमान वीस वर्ष टिकावा, आणि अर्थातच त्याचं उत्पादन भारतात व्हावं. नव्वद वर्षांपूर्वी या स्पर्धेच्या विजेत्याला एक लाख रु पये बक्षीसही जाहीर केलं होतं.
मॉरीस फ्रीडमन या गांधीजींच्या र्जमन मित्रानं आठ स्पिण्डल वापरून अतिशय कार्यक्षम असा चरखा बनवला होता. पण तो गांधीजींनी नापसंत केला- कारण, तो बघून अतिशय क्लिष्ट भासतो आणि लोकांना आपलासा वाटत नाही! चरखा दिसायला कसा असावा, त्याचा दृश्यानुभव कसा हवा यावरही गांधीजींचा कटाक्ष होता. पारंपरिक चरखा दिसायला, समजायला गुंतागुंतीचा नसून सोपा आहे. शिवाय त्याचं चक्र  हे आपल्या मनात खोलवर रु जलेल्या ऐतिहासिक धर्मचक्र ाची प्रचिती देतं. या जाणिवेतून चरखा भारतीय झेंड्यावर वापरणं औचित्यपूर्णच होतं. 1921मध्ये लाला हंसराज आणि गांधीजींच्या सांगण्यावरून पिंगली वेंकय्या यांनी चरख्याची प्रतिमा असलेला पहिला झेंडा डिझाइन केला. 
वस्तू म्हणून पाहायला गेलं तर पारंपरिक चरख्याचं डिझाइन माफक आहे. कमीत कमी साधन वापरून तयार करता येतो आणि वापरायलाही सोपा आहे. अतिशय नम्रपणे हीच वस्तू सत्तापालट करण्यासाठी शस्रही ठरू शकते आणि मोठय़ा तत्त्वज्ञानाचं भावार्थ प्रतीक म्हणूनदेखील रुजते. 

snehal@designnonstop.in
(लेखिका वास्तुरचनाकार आणि प्रॉडक्ट डिझायनर आहेत)

Web Title: Charkha - the weapon of power and the true symbol of philosophy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.