स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा यांचे कार्य बहुआयामी; देशासाठी सर्वस्व वाहून घेण्यास हृदयही विशाल असावे लागते - राज्यपाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 06:29 AM2021-11-26T06:29:06+5:302021-11-26T06:34:51+5:30

मातोश्री दर्डा सभागृहाच्या लॉनमध्ये गुरुवारी जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूलच्या नव्या इमारतीचे उद्घाटन आणि डॉ. गोवर्धनलाल पाराशर (राजस्थान) यांच्या ऑस्टिओपॅथी शिबिराचे उद्घाटन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते झाले.

The work of freedom fighter Jawaharlal Darda is multifaceted; You have to have a big heart to carry everything for the country says Governor Bhagat Singh Koshyari | स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा यांचे कार्य बहुआयामी; देशासाठी सर्वस्व वाहून घेण्यास हृदयही विशाल असावे लागते - राज्यपाल

स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा यांचे कार्य बहुआयामी; देशासाठी सर्वस्व वाहून घेण्यास हृदयही विशाल असावे लागते - राज्यपाल

googlenewsNext


यवतमाळ : स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा हे तळागाळातील शेवटच्या घटकाचा निरपेक्ष भावनेने विचार करीत असत. शिक्षण, पत्रकारितेबरोबरच समाजसेवेत सदैव सक्रिय राहिलेले बाबूजी खऱ्या अर्थाने बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गुरुवारी येथे केले केले. आज त्यांच्या स्मृतिदिनी देशाला आत्मनिर्भर करून जगतगुरू बनविण्याचा संकल्प करू या, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

मातोश्री दर्डा सभागृहाच्या लॉनमध्ये गुरुवारी जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूलच्या नव्या इमारतीचे उद्घाटन आणि डॉ. गोवर्धनलाल पाराशर (राजस्थान) यांच्या ऑस्टिओपॅथी शिबिराचे उद्घाटन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. मंचावर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, पालकमंत्री संदीपान भुमरे, जगविख्यात ऑस्टिओपॅथी तज्ज्ञ डॉ. पाराशर, लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा, लोकमतचे एडिटर-एन-चीफ तथा राज्याचे माजी शिक्षण व उद्योगमंत्री राजेंद्र दर्डा, शाळेचे सचिव तथा माजी आमदार कीर्ती गांधी यांची प्रमुख उपस्थिती होती. बाबूजींनी नेहमी व्यापक विचार केला. पारतंत्र्यात असताना देशाला स्वातंत्र्य कसे मिळेल, यासाठी तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशातील प्रत्येकाला न्यायाचा, विकासाचा मार्ग कसा दाखविता येईल, यासाठी त्यांनी परिश्रम घेतले. देशासाठी सर्वस्व वाहून घेण्यासाठी माणसाचे हृदयही तेवढेच विशाल असावे लागते. तरच तो दुसऱ्याच्या भल्याचा विचार करू शकतो. बाबूजींनी स्वातंत्र्यासाठी तुरुंगवास भोगला. आज बाबूजींसह सर्वच क्रांतिकारकांना श्रद्धांजली अर्पण करताना देशाला नव्या उंचीवर कसे घेऊन जाता येईल, याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. समाजातील दरी मिटवून सर्वांना एका स्तरावर आणण्यासाठी व्यापक प्रयत्न करण्याची गरजही राज्यपाल कोश्यारी यांनी व्यक्त केली.

पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा केवळ यवतमाळचे नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचे असल्याचे सांगितले. बाबूजींचे औरंगाबादच्या विकासातही मोठे योगदान आहे. मोठ्या बाबूजींनी उद्योगमंत्री असताना औरंगाबादेत वाळूज एमआयडीसी, तर राजेंद्र बाबू उद्योगमंत्री झाल्यानंतर त्यांनी औरंगाबादेत दुसरी एमआयडीसी म्हणजेच दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (डीएमआयसी) उभारल्याची आठवण करून दिली. यावेळी डॉ. पाराशर यांनीही मनोगत व्यक्त केले. 

बाबूजींचा रचनात्मक कार्यावर विश्वास होता. मानवी मूल्याप्रती आस्था असलेल्या बाबूजींनी आरोग्य, शिक्षणाच्या क्षेत्रात अमूल्य योगदान दिले. समाजातील शेवटच्या घटकावर त्यांचे नेहमी लक्ष होते, असे विजय दर्डा यांनी सांगितले. इंग्रजांविरोधात त्यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला. स्वातंत्र्यानंतर ‘लोकमत’च्या माध्यमातून लोकप्रबोधनासाठी त्यांनी आयुष्य खर्ची घातल्याचेही ते म्हणाले.

प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी प्रसारक मंडळ बेरारचे सचिव माजी आमदार कीर्ती गांधी यांनी केले. आभार जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्य मिनी थॉमस यांनी मानले. कार्यक्रमाला खासदार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार प्राचार्य डॉ. अशोक उईके, नगराध्यक्ष कांचनताई चौधरी, लोकमतचे माजी संपादक ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, माजी मंत्री ॲड. शिवाजीराव मोघे, प्रा. वसंत पुरके, माजी आमदार वामनराव कासावार, विजयाताई धोटे, लक्ष्मणराव तायडे, बबनराव चौधरी, जिल्हा बँकेचे अध्यक्ष टीकाराम कोंगरे आदी मान्यवर उपस्थित होते.

इंग्रजीचे गुलाम होऊ नका, इंग्रजी शिकून राज्य करा 
विजय दर्डा यांनी आपल्या भाषणात मराठी ही केवळ भाषा नाही, तर संस्कृती असल्याचे सांगत, मराठी जिवंत राहिली तर राज्यभाषा वाढेल, त्यामुळे महाराष्ट्रात मराठी भाषा बंधनकारक करायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त केली. हाच धागा पकडत राज्यपाल म्हणाले की, मी संगीत, संस्कृत आणि संस्कृतीमध्ये रुची बाळगणारा आहे. माँ, मातृभाषा आणि मातृभूमी यांच्या उद्धारासाठी कायम प्रयत्नशील राहिले पाहिजे. केंद्र शासनाने नव्या शैक्षणिक धोरणात प्राथमिक शिक्षणात मातृभाषेचा आग्रह धरल्याचे सांगतानाच, इंग्रजी शिकून जगावर राज्य करा; मात्र तिचे गुलाम होऊ नका, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

प्रदेश काँग्रेसकडून अभिवादन
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने गुरुवारी बाबूजींना स्मृतिदिनी अभिवादन करण्यात आले. ‘लोकमतचे संस्थापक, संपादक, माजी मंत्री व स्वातंत्र्य सेनानी जवाहरलालजी दर्डा यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन’ अशा शब्दांत बाबूजींना आदरांजली वाहणारे ट्विट प्रदेश काँग्रेसने केले आहे.

चाहत्यांच्या अभिवादनाने गहिवरले प्रेरणास्थळ 
यवतमाळ : स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांना गुरुवारी त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध संस्था, संघटनांचे प्रतिनिधी, शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी, लोकप्रतिनिधी आदींनी बाबूजींची समाधी असलेल्या प्रेरणास्थळावर पुष्प अर्पण करून अभिवादन केले. 

राज्यपाल कोश्यारी, सुशीलकुमार शिंदे, विजय दर्डा, संदीपान भुमरे, राजेंद्र दर्डा, डॉ. गोवर्धनलाल पाराशर यांनी एकाच वेळी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी लोकमत सूरज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार विजेते प्रथमेश लघाटे, हरगुन कौर (पंजाब) यांनी संगीतमय भावांजली वाहिली. 

बाबूजींच्या दोन्ही कन्या जयश्री भल्ला व स्नेहल जालान, बाबूजींची नात पूर्वा कोठारी, त्यांचे यजमान सुनीत कोठारी, किशोर दर्डा, सीमा दर्डा यांची उपस्थिती होती. मातोश्री वीणादेवी दर्डा यांचे स्मृतिस्थळ तुळशी वृंदावन तसेच लोकमत सखी मंचच्या संस्थापिका ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृती प्रित्यर्थ उभारलेल्या शक्तिस्थळाचे मान्यवरांनी दर्शन घेतले.

बाबूजींनी सामाजिक, समतेचा विचार मांडला - शिंदे
बाबूजींनी समाजाला कायम प्रेरणा दिल्याचे सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले. आदिवासींच्या प्रश्नांबाबत मी प्रथम त्यांना भेटलो होतो. त्यांनी तत्काळ प्रश्न सोडवित वंचित, दलित कष्टकऱ्यांप्रतीची संवेदना दाखविली होती. 

तेव्हापासून त्यांच्यावर निष्ठा आहे. बाबूजींनी कायम सामाजिक आणि आर्थिक समतेचा विचार मांडला. बाबूजी विचारांचे पक्के होते. त्यांची स्वत:ची वैचारिक भूमिका होती. ती घेऊनच ते पुढे जात. वर्तमानपत्राच्या माध्यमातून सातत्याने ते सर्वसामान्यांचा आवाज झाले. हीच भूमिका आज विजय दर्डा आणि राजेंद्र दर्डा पुढे घेऊन जात असल्याचेही शिंदे यांनी नमूद केले.
 

Web Title: The work of freedom fighter Jawaharlal Darda is multifaceted; You have to have a big heart to carry everything for the country says Governor Bhagat Singh Koshyari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.