"करण जोहरच्या पार्टीची चौकशी फडणवीस सरकार असतानाच का केली नाही?"

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2020 05:32 PM2020-12-18T17:32:58+5:302020-12-18T17:33:59+5:30

Sachin Sawant : एके ठिकाणी मुंबई पोलिसांच्या नार्कोटिक्स गुन्हे शाखेतर्फे किलो किलोने ड्रग्सचे साठे पकडले जात असताना, एनसीबीच्या हाती ग्रॅमभर ड्रगही लागत नाही, हे वास्तव आहे, असेही सचिन सावंत यांनी सांगितले.

why Did The Fadnavis Government Not Investigate Karan Johars Party Sachin Sawant | "करण जोहरच्या पार्टीची चौकशी फडणवीस सरकार असतानाच का केली नाही?"

"करण जोहरच्या पार्टीची चौकशी फडणवीस सरकार असतानाच का केली नाही?"

googlenewsNext
ठळक मुद्दे"आता ‘जाना था जापान पहुंच गये चीन’ अशी एनसीबीची अवस्था आहे"

मुंबई : चित्रपट निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या घरच्या पार्टीच्या एका व्हिडिओवरून एनसीबीने त्यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. हा व्हिडिओ २०१९ साली व्हायरल झाला, त्यावेळी फडणवीस सरकार होते. त्यावेळीच या पार्टीची चौकशी करावी, असे फडणवीस सरकारला किंवा एनसीबीला का वाटले नाही? पार्टीच्या व्हिडिओवरून करणला चौकशीस बोलणारी एनसीबी कंगना राणावतला चौकशीसाठी बोलवण्यास का घाबरते? ड्रग संदर्भात तिचाही एक व्हिडिओ वायरल झालेला आहे. तिच्याबद्दल एनसीबीला एवढी आपुलकी का आणि कशासाठी ? असे प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी विचारले आहेत.

सावंत म्हणाले, "राष्ट्रीय तपास यंत्रणा ह्या भारतीय जनता पार्टी सरकारच्या हातच्या बाहुल्या झाल्या आहेत. त्यांच्या इशाऱ्यावर त्या नाचत आहेत, हे वारंवार स्पष्ट होत आहे. एनसीबी, ईडी, सीबीआय, आयकर विभाग या राष्ट्रीय तपास यंत्रणा सिलेक्टिव्ह चौकशी करताना दिसत आहेत. एका पार्टीच्या व्हिडिओवरून करण जोहरची चौकशी होऊ शकते तर मग कंगनाच्या चौकशीची हिम्मत एनसीबी का दाखवत नाही. त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात एनसीबीचा काय स्वार्थ असावा. करण जोहरच्या पार्टीचा व्हिडिओ २०१९ चा आहे, त्यावेळी गृहमंत्री फडणवीस होते त्यांनी यावर खुलासा करावा."

एनसीबीला ईडीतर्फे सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील ड्रग अँगल शोधण्यासाठी बोलवण्यात आले होते. ‌अभिनेता सुशांतसिंह प्रकरणातील ड्रग अँगलची चौकशी करण्यात एनसीबी सपशेल फेल गेली आहे. आता ‘जाना था जापान पहुंच गये चीन’ अशी एनसीबीची अवस्था आहे. सीबीआयसुद्धा सुशांतसिंह प्रकरणात काहीच निष्पन्न करु शकली नाही. आज सीबीआय चिडीचूप बसली आहे. सुशांतसिंहच्या आत्महत्येचा वापर भाजपाने आपल्या गलिच्छ राजकीय स्वार्थासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन घेतला. आजही तेच होत आहे. ड्रगच्या चौकशीच्या नावाखाली बॉलिवूडला, महाराष्ट्राला, मुंबई पोलिसांना बदनाम करण्याची पद्धतशीर मोहिम राबविली जात असून उत्तर प्रदेशमध्ये बॉलिवूड घेऊन जाण्याच्या मोहिमेचा हा एक भाग आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी फिल्मसिटी उभी करण्याची घोषणा केल्यानंतर अशा कारवाया करुन बॉलिवूडवर दबाव टाकण्याचे प्रकार होत आहेत, असे सचिन सावंत म्हणाले.

याचबरोबर, एके ठिकाणी मुंबई पोलिसांच्या नार्कोटिक्स गुन्हे शाखेतर्फे किलो किलोने ड्रग्सचे साठे पकडले जात असताना, एनसीबीच्या हाती ग्रॅमभर ड्रगही लागत नाही, हे वास्तव आहे, असेही सचिन सावंत यांनी सांगितले.

Web Title: why Did The Fadnavis Government Not Investigate Karan Johars Party Sachin Sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.