गावनिहाय पाण्याचा ताळेबंद ;१३ जिल्ह्यांत पथदर्शी प्रयोग 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 12:38 PM2020-02-11T12:38:51+5:302020-02-11T12:46:49+5:30

गावातील पाण्याचे स्रोत, भूजलपातळी, गावातील पीकपद्धती, पिण्यासाठी व जनावरांसाठी लागणारे पाणी याचा विचार करून पाण्याचा ताळेबंद मांडला जाणार तेराशेहून अधिक ग्रामपंचायतींमध्ये राबविणार उपक्रम

Village-based water report ; experiments in 13 districts | गावनिहाय पाण्याचा ताळेबंद ;१३ जिल्ह्यांत पथदर्शी प्रयोग 

गावनिहाय पाण्याचा ताळेबंद ;१३ जिल्ह्यांत पथदर्शी प्रयोग 

googlenewsNext
ठळक मुद्देतेराशेहून अधिक ग्रामपंचायतींमध्ये राबविणार उपक्रम राज्याच्या एकूण क्षेत्रापैकी ८२ टक्के क्षेत्र बेसॉल्ट खडकाचे लोकसंख्या, लागणारे पाणी, जनावरे, चारा व शेतीसाठी पाण्याचा गावनिहाय ताळेबंद

विशाल शिर्के - 
पुणे : राज्य सातत्याने पाण्याचे दुष्काळाला सामोरे जात आहे. पाणी वाटपावरून राज्या-राज्यामध्येच नव्हे, तर जिल्ह्यांतर्गतदेखील वाद निर्माण होऊ लागले आहेत. त्यामुळे गावातील पाण्याची गरज गावातच भागविली जावी, या उद्देशाने केंद्र सरकारने गावनिहाय पाण्याचा ताळेबंद मांडण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. त्याअंतर्गत गावातील पाण्याचे स्रोत, भूजलपातळी, गावातील पीकपद्धती, पिण्यासाठी व जनावरांसाठी लागणारे पाणी याचा विचार करून पाण्याचा ताळेबंद मांडला जाणार आहे. पथदर्शी प्रकल्पांतर्गत राज्यातील १३३९ ग्रामपंचायतीमधील तब्बल १३७२ गावांची निवड करण्यात आली असून, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविला जाणार आहे.
‘दगडांच्या देशा’ अशीच राज्याची भौगोलिक स्थिती आहे. राज्याच्या एकूण क्षेत्रापैकी ८२ टक्के क्षेत्र बेसॉल्ट खडकाचे आहे. पाणी साठवणक्षमता अवघी १ ते ३ टक्के इतकी आहे. रुपांतरित कठीण खडक १० टक्के असून, याचीही पाणी धारण क्षमता १ ते ३ टक्के आहे. शास्त्रीय पद्धतीने भेगा वाढवून ही क्षमता पाच टक्क्यांपर्यंत वाढविता येते. जवळपास ८ टक्के भूभाग स्तरित खडकांनी बनला असून, त्याची पाणी धारण करण्याची क्षमता साडेपाच टक्के आहे. गाळाचा साडेचार टक्के भाग असून, याची पाणी धारण करण्याची क्षमता सर्वाधिक पाच ते दहा टक्केइतकी आहे. 
राज्याच्या भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर म्हणाले, गावाची लोकसंख्या, लागणारे पाणी, जनावरे, चारा व शेतीसाठी लागणाºया पाण्याचा गावनिहाय ताळेबंद मांडला जाईल. त्यानुसार जलपुनर्भरण कसे करायचे, त्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात हे ठरविण्यात येईल. तसेच, आवश्यकतेनुसार कृषी आणि मृद विभागाच्या सहकार्याने संबंधित गावात कोणते पीक घ्यावे, याची शिफारस केली जाईल.
.......
गावात पडणारा पाऊस, भूजलाचे प्रमाण, भूजलाचा होणारा उपसा, विविध कारणांसाठी होणारा पाण्याचा वापर यावरून गावाचा पाणी ताळेबंद मांडला जाईल. या ताळेबंदानुसार जलपुनर्भरण कामे करण्याबरोबरच व पीकपद्धतीचा सल्ला दिला जाईल. प्रथमच असा ताळेबंद मांडला जाणार असून, त्यासाठी राज्यातील १३३९ ग्रामपंचायतींची निवड केली आहे. त्याबाबत येत्या १२ फेब्रुवारीला दिल्लीत बैठक होणार असून, त्यात तांत्रिक निकष निश्चित होतील. - कौस्तुभ दिवेगावकर, संचालक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा.
.........
भौगोलिक रचनेमुळे भूजलक्षमतेत फारशी वाढ करणे शक्य नसली तरी योग्य व्यवस्थापन, जलपुनर्भरण व जमिनीवरील जलस्रोतांचे व्यवस्थापन याद्वारे गावाची संपूर्ण पाण्याची गरज भागविता येईल. त्यासाठीच अटल भूजल योजनेअंतर्गत पाण्याचा ताळेबंद मांडून त्याचे नियोजन केले जाणार आहे. 
.......
या जिल्ह्यातील गावांमध्ये राबविणार अटल भूजल योजना
जिल्हा      तालुके                               गावांची           ग्रामपंचायतीची 
                संख्या                                संख्या
पुणे          बारामती, पुरंदर                    १२०                         १०१
सातारा    माण, खटाव, वाई                   ११४                        ११३
सांगली    जत, कवठेमहांकाळ,               ८९                           ८९
    खानापूर, तासगाव
सोलापूर    माढा, मोहोळ, पंढरपूर            ५१                          ५०
नाशिक    देवळा, सिन्नर                       १३०                        १२९
अहमदनगर    राहता, संगमनेर              ८६                           ८६
जळगाव    अंमळनेर, पारोळा, यावल     १२१                      १२१
जालना    जालना, घनसांगवी, परतुर     ५०                          ४९
लातूर    चाकूर, लातूर, निलंगा, रेणापूर   १३६                     १३३
उस्मानाबाद    उस्मानाबाद, उमरगा      ५५                          ५५
अमरावती    चांदुर बाजार, मोर्शी, वरुड    २१७                      २१३
बुलढाणा    मोताळा                                  ६८                       ६८
नागपूर    काटोल, नरखेड                     १३५                         १३२
एकूण                                                  १३७२                      १३३९

Web Title: Village-based water report ; experiments in 13 districts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.