उपमुख्यमंत्रिपदावरून राष्ट्रवादीत वाद नाही; जयंत पाटलांचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2019 05:56 AM2019-12-16T05:56:14+5:302019-12-16T05:57:17+5:30

महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपदाचा पदभार स्वीकावल्यानंतर जयंत पाटील यांनी ‘लोकमत’ कार्यालयास भेट दिली. यावेळी त्यांनी अजित पवार यांनी केलेले बंड, त्यानंतर शिवसेनेसोबत स्थापन झालेले सरकार, खातेवाटपातील विलंब आणि लांबलेला मंत्रिमंडळ विस्तार यावर सविस्तर भाष्य केले.

There is no debate in NCP from the Deputy Chief Minister; Jayant Patil revealed | उपमुख्यमंत्रिपदावरून राष्ट्रवादीत वाद नाही; जयंत पाटलांचा खुलासा

उपमुख्यमंत्रिपदावरून राष्ट्रवादीत वाद नाही; जयंत पाटलांचा खुलासा

Next

अतुल कुलकर्णी । मुंबई
लोकमत न्यूज नेटवर्क

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व ५४ आमदार अजित पवार यांच्या पाठीशी आहेत. त्यांनी कधीही पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाला चॅलेंज करण्याचा प्रयत्न केलेला नाही, असे सांगत आमच्यात उपमुख्यमंत्रिपदावरून कसलाही वाद नाही, असे वित्त व नियोजन, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

प्रश्न : तुमच्यात आणि अजित पवारांमध्ये उपमुख्यमंत्रिपदावरून वाद असल्याची चर्चा आहे. हे खरे आहे का?
आमच्यात कसलाही वाद नाही. आमचे अंडरस्टँडींग चांगले आहे. आमची एकमेकांशी स्पर्धा होऊ शकत नाही. आमच्या दोघांच्या मनात काय आहे, यापेक्षा शरद पवार यांच्या मनात काय आहे याला आमच्या पक्षात जास्त महत्त्व आहे. त्यानुसारच ते जे ठरवतील तेच होईल.


प्रश्न : अजित पवार हे आमदारांच्या, कार्यकर्त्यांच्या मदतीला धावून जातात, सतत उपलब्ध असतात, त्यामुळे प्रत्येकाला त्यांनी नेतृत्व करावे असे वाटते, असे विधान शरद पवार यांनी केले होते. या विधानाचा अर्थ काय घ्यायचा?
- त्यांची ही प्रतिक्रिया मी चांगल्या अर्थाने घेतो. कारण शरद पवार यांनी त्यांचे यथोचित वर्णन केले आहे. तेच खरे वर्णन आहे. त्यामुळे आमच्यामध्ये एकदा जर शरद पवार यांनी निर्णय घेतला तर त्यांच्यापुढे मीही जात नाही आणि अजित पवारही जात नाहीत.


प्रश्न : अत्यंत अडचणीच्या काळात जयंत पाटील खंबीरपणे पक्षासोबत राहिले, असेही शरद पवार म्हणाले होते. त्याचा अर्थ तुम्ही काय काढता?
- पक्ष संकटात होता. आमचे १५ ते २० आमदार येतील असे वाटत होते. शरद पवारांनी प्रचंड मेहनत घेतली. आमचे ५४ आमदार निवडून आले. त्यानंतरही पक्षावर संकटे आली. अशा अडचणीच्या काळात प्रदेशाध्यक्ष म्हणून मी त्यांना साथ देणे ही माझी नैतिक जबाबदारी होती. अनेकांच्या पाठिंंब्यावर मी ती जबाबदारी नेटनेटकी पेलली. माझ्याबद्दल त्यांनी त्यांची भूमिका जाहीर बोलून दाखवली.


प्रश्न : शरद पवारांना विचारूनच अजित पवारांनी बंडखोरी करत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. खरेच असे घडले होते का?
- फडणवीस यांनी अजित पवारांना सोबत घेऊन सकाळी ७ वाजता शपथ घेतली, यातच सर्वकाही आहे. भाजपकडे १०५ आमदार असताना शिवाजी पार्क सोडून द्या, पण राजभवनावर सायंकाळी ६ वाजता सगळ््यांना बोलावून शपथ घेतली असती तर महाराष्टÑाला त्यांनी काय केले हे कळाले असते. पण तसे न केल्यामुळे फडणवीस यांची प्रतिमा डागाळली. अजित पवार यांच्यावर ज्यांनी आरोप केले. त्यांनीच सोबत घेऊन सरकार स्थापन केले, त्यामुळे त्यांच्यावरचे सगळे आरोप आपोआपच खारिज झाले आहेत. फडणवीस यांनी शपथ घेताना काय काय चुका केल्या त्याची यादी खूप मोठी आहे.


प्रश्न : अजित पवार आणि शरद पवार एकच आहेत असे तुम्ही म्हणता, यामुळेच त्यांचे भाजपसोबत जाणे ठरवून केले होते या आक्षेपाला बळ मिळते त्याचे काय..?
- मला नाही वाटत असे बळ मिळते म्हणून. या चर्चेत काही अर्थ नाही. तो एक अपघात होता. मी जेव्हा अजित पवार यांच्याशी बोललो त्यावेळी ते ठाम होते. नंतर शरद पवार त्यांना बोलले म्हणून त्यांनी त्यांची भूमिका बदलली. त्यामुळे जे झाले ते चुकीचेच होते पण ते दुरुस्त झाले. त्याचा आम्हाला जास्त आनंद आहे.


प्रश्न : अजित पवार यांनी राजीनामा दिला होता. तुम्ही सतत त्यांच्या संपर्कात होतात, ते परत पक्षात आले, त्या काळात तुम्ही त्यांना भेटून नेमके काय सांगितले? कशा पद्धतीने तो सगळा प्रसंग तुम्ही, दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे यांनी हाताळला..?
- झाली ती घटना दुर्दैवी होती. आम्ही सर्वजण शरद पवार यांच्या पाठीशी उभे होतो. अजित पवार यांचा राजीनामा आला त्यावेळी सगळ्यात आधी मी एकटाच त्यांना भेटलो. नंतर अनेकदा आम्ही त्यांना भेटलो. त्यांना शरद पवार यांची भूमिका समजावून सांगितली. ती त्यांना पटली आणि ते परत आले.


प्रश्न : असे काय सांगितले तुम्ही, की ते त्यांना पटले व ते परत आले?
- आम्ही दोघांनी एकमेकांना काय सांगितले त्याची कारणे तुम्ही त्यांच्याच तोंडून ऐकलेली बरी. त्यांची माझी झालेली चर्चा ही खाजगी होती. ती मी उघड करुन सांगणे योग्य नाही. पण जे काही झाले त्याचा त्रास पक्षात सगळ््यांना झाला. संकट आले, पण आमचा पक्ष त्यातून तावून सुलाखून बाहेर पडला.


प्रश्न : अजित पवार असे रागावून जाण्याची ही पहिलीच घटना नाही, याआधी अनेकदा असे घडले आहे. त्यांच्याबाबतीत हे असे का होते?
- एखादी गोष्ट नाही पसंत पडली, म्हणून ते बाहेर पडल्याचे घडले आहे. एकदा तर ते मंत्रिपदाचा राजीनामा देऊन निघून गेले. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीवर जाऊन त्यांनी प्रायश्चितही घेतले. अनेक वेळा काम करताना काही पावलं समाजाला मान्य होत नाहीत. एखादी गोष्ट चुकली तर ती दुरुस्त करण्याची मानसिकता जोपर्यंत तुमच्याकडे असते तोपर्यंत समाज तुम्हाला स्वीकारतो.


प्रश्न : गृह, नगरविकास आणि महसूल महत्त्वाची खाती तीन पक्षांनी घ्यावी अशी चर्चा होती. प्रत्यक्षात गृह आणि नगरविकास दोन्ही खाती शिवसेनेकडे गेली, हे कसे झाले?
- कोणती खाती कोणाला द्यायची हा पूर्णपणे मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. आम्ही सांस्कृतिक कार्य खात्याबद्दलही आग्रही राहू. पण जे वाटप झाले आहे ते अंतिम नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार जेव्हा होईल तेव्हा जे खातेवाटप होईल ते अंतिम असेल.


प्रश्न : दोनच दिवसांत खातेवाटप बदलले आणि जलसंपदा तुमच्याकडे आले. तुम्हाला हे खाते हवे म्हणून हा बदल झाला का?
- अल्पसंख्याक व वक्फ या दोन खात्याविषयी छगन भुजबळ यांचा आग्रह होता. त्या खात्यांचा त्यांना आढावा घ्यायचा होता. म्हणून ती खाती त्यांच्याकडे देण्यात आली.


- प्रश्न : नवा नागरिकत्व कायदा लागू करण्यास पंजाब, केरळ, पश्चिम बंगाल या राज्यांनी नकार दिला आहे. महाराष्ट्राची भूमिका काय आहे?
- महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसून त्यावर निर्णय घेतील. या कायद्याबाबत राज्यसभेत शिवसेनेने काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याची उत्तरे त्यांना मिळालेली नाहीत. वेगवेगळ््या विचारसरणीचे पक्ष एकत्र येऊन काही भूमिका घेतात. त्यावेळी लगेच त्या पक्षांनी त्यांच्या भूमिका सोडल्या, असे समजण्याची गरज नाही. त्यामुळे राज्यात फार मोठा फरक पडणार नाही.


प्रश्न : तुम्ही अर्थमंत्री म्हणून सगळ्यात जास्त वेळा अर्थसंकल्प मांडला आहे. यावेळीही तुम्हीच अर्थसंकल्प मांडणार का?
- तो अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. ते ज्यांना कोणाला अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प सादर करण्याचा आदेश देतील ती व्यक्ती राज्याचा अर्थसंकल्प मांडेल.


प्रश्न : एकनाथ खडसे तुमच्या पक्षात आले तर त्यांना मंत्रिपद देणार का?
- मध्यंतरी त्यांची माझी चर्चा झाली होती. भेटायचेही ठरले होते. पण भेट झाली नाही. आम्ही अनेक नेत्यांची चर्चा करत आहोत. अनेक ओबीसी नेत्यांना जाणीवपूर्वक बाजूला ठेवण्याचे काम भाजपने केले. ओबीसींचे प्रश्न सोडवण्यातही या सरकारने टाळाटाळ केली. ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीही वेळेवर दिली नाही. त्यामुळे भाजपमध्ये मोठा असंतोष आहे. या असंतोषाचे जनक खडसे आहेत. त्यांची इच्छा असेल तर ते आमच्याकडे येऊ शकतात.


प्रश्न : विरोधकांकडे मुद्दे नसल्याने ते माझी जात काढतात, असा आरोप फडणवीस यांनी केला आहे. त्याचे काय?
कोणाच्या जातीच्या उल्लेखावरुन बोलण्याची महाराष्ट्राची संस्कृती नाही. ‘पेशवाई घालवा’ असा टोला कोणी मारला असेल तर फडणवीस यांनी वाईट वाटून घ्यायचे कारण नाही. पेशवाईत जशा चांगल्या गोष्टी होत्या तशा काही वाईटही होत्या.

प्रश्न : तुम्हाला मुख्यमंत्री व्हावे असे वाटते का?
होय, मलाही मुख्यमंत्री व्हावे वाटते ना... पण त्यासाठी विशेष काही करायचे नसते. वेळ येते त्यावेळी योग्य ते होते. राज्याच्या राजकारणात प्रत्येक कार्यकर्त्याला सर्वाेच्च पदावर जाण्याची इच्छा असते, पण ती इच्छा घिसाडघाईने, घोटाळा करुन, गडबड करुन करणे योग्य नसते. महाराष्टÑाच्या मनात असेल आणि आमचे नेते शरद पवार यांना वाटत असेल तर ते होईल. आमचे पहिले प्राधान्य पक्ष वाढीचे आहे. आज आम्ही ५४ वर आहोत. ज्यावेळी आम्ही ९० ते १०० जागांवर जाऊ त्यावेळी मुख्यमंत्री कोण व्हायचे याचा निर्णय आमचे नेते घेतील.

 

Web Title: There is no debate in NCP from the Deputy Chief Minister; Jayant Patil revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.