Tauktae Cyclone: 'तौक्ते' वादळाची तीव्रता वाढली, मुंबईला आज ऑरेंज अलर्ट; नागरिकांना सतर्कतेचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 07:06 AM2021-05-17T07:06:26+5:302021-05-17T07:06:40+5:30

कोकणाला तडाखा; रायगड, पालघर, ठाण्याला इशारा, शनिवारी रात्रीपासून मुंबईसह आसपासच्या जिल्ह्यांत मुसळधार पावसाने हजेरी लावली.

Tauktae Cyclone: storm intensifies, Orange alert to Mumbai today; Vigilance orders to citizens | Tauktae Cyclone: 'तौक्ते' वादळाची तीव्रता वाढली, मुंबईला आज ऑरेंज अलर्ट; नागरिकांना सतर्कतेचे आदेश

Tauktae Cyclone: 'तौक्ते' वादळाची तीव्रता वाढली, मुंबईला आज ऑरेंज अलर्ट; नागरिकांना सतर्कतेचे आदेश

googlenewsNext

मुंबई/पणजी : अरबी समुद्रात उठलेले ‘तौक्ते’ चक्रीवादळ गोव्यासह कोकणपट्टीत प्रचंड धुमाकूळ घालत मोठी पडझड करून वायव्येला गुजरातच्या दिशेने पुढे सरकले आहे. सोमवारी मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात शनिवार रात्रीपासूनच वादळी वाऱ्यासह सुरू झालेल्या मुसळधार पावसाने प्रामुख्याने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना जोरदार तडाखा दिला असून जळगाव जिल्ह्यात झोपडीवर झाड कोसळून दोन बहिणी ठार झाल्याची घटना घडली. ठिकठिकाणी झाडे कोसळून पडली, तर घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

शनिवारी रात्रीपासून मुंबईसह आसपासच्या जिल्ह्यांत मुसळधार पावसाने हजेरी लावली. सोमवारी हे चक्रीवादळ मुंबईच्या समुद्रातून गुजरातकडे वळणार असून, याचा प्रभाव लक्षात घेऊन सोमवारी मुंबई, ठाणे, पालघर या तीन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, तर रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट दिला आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांनादेखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात बहुतेक ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. अनेक ठिकाणी वीज खंडित झाली. 

वादळामुळे चिंचेचे झाड झोपडीवर कोसळून दोन बहिणी ठार झाल्याची घटना अंचलवाडी (जि. जळगाव) येथे रविवारी घडली. ज्योती (१६) व रोशनी बल्लू बारेला (१०) अशी त्यांची नावे आहेत. सिंधुदुर्गमध्ये शनिवारी मध्यरात्रीपासून वादळाने मुसळधार पावसासह धुमाकूळ घातला असून समुद्र खवळला आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी झाडे कोसळली, तर घरांचेही नुकसान वादळाची तीव्रता वाढली, आज वळणार गुजरातकडे झाले. नागरिकांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.

रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील किनारपट्टीला वादळाचा जोरदार तडाखा बसला. ताशी १२० ते १३० किलाेमीटर वेगाने वारे वाहात होते. अनेक भागातील कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले. रत्नागिरी तालुक्यात पडझडीच्या घटना घडल्या. रविवारी सकाळी ६ ते साेमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यातील वीज पुरवठा पूर्णपणे बंद करण्यात आला.

मुंबईसह कोकणाला धोका नाही
चक्रीवादळाचे मार्गक्रमण वायव्येच्या दिशेने होत असल्यामुळे कोकणसह मुंबई किनारपट्टीला ते धडकणार नाही. परंतु गुजरातच्या पोरबंदरसह इतर किनारी भागाला ताशी १७५ किलोमीटर वेगाने धडक देणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास चक्रीवादळाचा केंद्रबिंदू हा गोवा किनारपट्टी भागातून वायव्येच्या दिशेने पुढे पोहोचला होता. त्यामुळे गोव्यातील प्रभाव ओसरत चालला होता, तर कोकणसह महाराष्ट्रातील किनारपट्टी भागात त्याचा प्रभाव अधिक वाढला होता.

गोव्यात झाडे उन्मळून पडली, बोटी भरकटल्या

  • ताशी १४५ ते १७० गतीने धावणाऱ्या या वादळाने झाडे उन्मळून पडली. घरांची छपरे उडाली. वीज खांब पाडून वीजपुरवठा खंडित झाला. समुद्रातील मालवाहू बार्जीही भरकटवून टाकल्या. 
  • पहाटे ४ वाजल्यापासून चक्रीवादळाचा प्रभाव वाढला होता. विशेषत: दक्षिण गोव्यात मोठी पडझड झाली. उंच लाटा किनाऱ्याला आदळून काही भागात लोकांच्या घरांपर्यंत पाणी शिरले. नंतर त्याचा प्रभाव आणखी वाढला. 
  • १०.३० च्या सुमारास पणजीपासून अवघ्या १०६ किलोमीटर अंतरावर हे चक्रीवादळ पोहोचले होते. महाराष्ट्रातून गोव्याला वीज पुरवणारी २२० केव्ही वीजवाहिनी निकामी झाली. अनेक ठिकाणी ३३ केव्ही फीडर बंद झाले त्यामुळे बहुतांश भागात वीजपुरवठा खंडित झाला.

Web Title: Tauktae Cyclone: storm intensifies, Orange alert to Mumbai today; Vigilance orders to citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.