“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 13:17 IST2025-06-07T13:14:43+5:302025-06-07T13:17:01+5:30

Sanjay Raut News: महाराष्ट्राच्या निवडणुकीचा विजय चोरलेला आहे, हायजॅक केलेला आहे. राहुल गांधी यांनी हा प्रश्न आंतरराष्ट्रीय मंचावर नेला. त्यामुळे देशाची लोकशाही किती धोकादायक वळणावर आहे हे जगाला कळले.

sanjay raut reaction over rahul gandhi allegations over maharashtra vidhan sabha election 2024 and criticized bjp | “२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?

“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?

Sanjay Raut News: लोकसभेत इंडिया आघाडी आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. परंतु महाराष्ट्र विधानसभेत महाविकास आघाडीला विरोधीपक्ष नेता निवडण्याइतपतही जागा जिंकता आल्या नाहीत. यानंतर महाविकास आघाडीसह काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ईव्हीएम मशीन, निवडणूक आयोग आणि मतदान प्रक्रियेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली? अशी विचारणा करत यावर निशाणा साधला. यावर ठाकरे गटाने प्रतिक्रिया देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसीतील विजयावर प्रश्न उपस्थित केले आहे. 

महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकीच्या प्रक्रियेविषयी मी ३ फेब्रुवारीला संसदेत दिलेल्या भाषणात आणि त्यानंतर पत्रकार परिषदेत चिंता व्यक्त केली होती. देशात झालेल्या निवडणुकांविषयी मी त्याआधीही संशय घेतलेला आहे. प्रत्येक निवडणुकीत प्रत्येक ठिकाणी गडबडी होतात असे मी म्हणत नाही; परंतु जे घडले आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. मी छोट्या-मोठ्या गोंधळाबद्दल बोलत नाही, तर आपल्या राष्ट्रीय स्तरावरील संस्थांवर ताबा मिळवून केल्या जाणाऱ्या गैरप्रकारांबद्दल बोलत आहे. पूर्वी निवडणुकांमध्ये काही विचित्र गोष्टी होत असत; परंतु २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक पूर्णपणे विचित्र आणि अनाकलनीय होती. या निवडणुकीत इतके गैरप्रकार झाले की, सर्व काही लपवण्याचे आटोकाट प्रयत्न करूनही काही गैरप्रकारांचे पुरावे समोर आलेच. अनधिकृत माहिती बाजूला ठेवली तरीही केवळ अधिकृत अशा आकडेवारीवरूनही सगळा खेळ समोर येतो. ‘मॅच फिक्सिंग’ झालेली निवडणूक लोकशाहीसाठी विषसमान  आहे. महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीतल्या गोंधळ-गडबडीचे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ पुरावे दोन आरोपींकडे बोट दाखवतात : निवडणूक आयोग आणि भाजप!, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. यावर संजय राऊत यांनी थेट नरेंद्र मोदी यांच्या वाराणसीतील विजयावर बोट ठेवत मोठे दावे केले आहेत.

मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक ही अमित शाह यांनी त्यांची स्वतःची निवडणूक किंवा प्रत्यक्ष मोदींची निवडणूक आहे, अशा पद्धतीने लढवली. आपल्या लक्षात आले असेल की, वाराणसी लोकसभेच्या निवडणुकीत सुरुवातीचे दोन तास मोदी हे पिछाडीवर होते. त्यानंतर मतमोजणी थांबविण्यात आली आणि मतमोजणी केंद्रावरील वीज घालवण्यात आली. त्याचा परिणाम ईव्हीएम मशीनवर झाला. डेटा उडाला, नवीन मशीन आणण्यात आल्या. दिल्लीतून यंत्रणा हलली. वाराणसीतून मोदींचा जवळजवळ पराभव झाला होता. दोन तास या लोकांनी गोंधळ घातला,  मतमोजणी हायजॅक केली, असा मोठा आरोप संजय राऊतांनी केला आहे. 

दरम्यान, तोच प्रकार महाराष्ट्रात झाला. राहुल गांधी आणि आम्ही सगळे म्हणतो त्याप्रमाणे महाराष्ट्राच्या निवडणुकीचा विजय चोरलेला आहे, हायजॅक केलेला आहे. निवडणूक यंत्रणा ताब्यात घेतली. शेवटच्या दोन तासांत ६० ते ६५ लाख मतदान अचानक वाढविण्यात आले. राहुल गांधी यांनी हा प्रश्न आंतरराष्ट्रीय मंचावर नेला. त्यामुळे देशाची लोकशाही किती धोकादायक वळणावर आहे हे जगाला कळले. जगात नरेंद्र मोदी आणि आपल्या सरकारला अपमान सहन करावा लागत आहे. हे लोक लोकशाही मानत नाहीत, या शब्दांत संजय राऊतांनी निशाणा साधला.

Web Title: sanjay raut reaction over rahul gandhi allegations over maharashtra vidhan sabha election 2024 and criticized bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.