नेत्यांची माघार; एसटी कर्मचारी मात्र विलीनीकरणावर ठाम, आणखी कर्मचारी कामावर रुजू होण्याची शक्यता 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 11:22 AM2021-11-26T11:22:15+5:302021-11-26T11:23:03+5:30

राज्याची जीवनवाहिनी म्हणून एसटी ओळखली जाते. ग्रामीण भागातील विशेषतः गावखेड्यातील प्रवासी वर्ग प्रवासासाठी एसटीवरच अवलंबून आहे. देशव्यापी लॉकडाऊननंतर अनलॉक काळात एसटी गाड्यांची वाहतूक पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा संपाची झळ बसली आहे.

Retreat of leaders; ST employees insisted on the merger, more employees likely to return to work | नेत्यांची माघार; एसटी कर्मचारी मात्र विलीनीकरणावर ठाम, आणखी कर्मचारी कामावर रुजू होण्याची शक्यता 

नेत्यांची माघार; एसटी कर्मचारी मात्र विलीनीकरणावर ठाम, आणखी कर्मचारी कामावर रुजू होण्याची शक्यता 

Next

मुंबई  : विलीनीकरणाच्या मागणीवरून गेल्या १६ दिवसांपासून आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. पण राज्य सरकारने दिलेली वेतनवाढ व इतर मागण्यांवर घेतलेली भूमिका स्वागतार्ह असल्याचे  सांगून  आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केली. यावेळी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित होते. दरम्यान, या नेत्यांनी जरी माघार घेतली असली, तरी आम्ही माघार घेणार नाही अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.

राज्याची जीवनवाहिनी म्हणून एसटी ओळखली जाते. ग्रामीण भागातील विशेषतः गावखेड्यातील प्रवासी वर्ग प्रवासासाठी एसटीवरच अवलंबून आहे. देशव्यापी लॉकडाऊननंतर अनलॉक काळात एसटी गाड्यांची वाहतूक पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा संपाची झळ बसली आहे. एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी सुरू असलेल्या एसटी कामगारांच्या संपामुळे एसटीची राज्यभरातील वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान, खोत आणि पडळकर यांनी माघार घेतल्याने आणखी कर्मचारी कामावर रुजू होण्याची शक्यता आहे. 

सदाभाऊ खोत म्हणाले की,  एसटी कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनात आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी उतरलो. राज्य सरकारने बुधवारी एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ जाहीर केली. मात्र एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याची महत्त्वाची मागणी अद्यापही प्रलंबित आहे. सध्या विलीनीकरणाचा मुद्दा न्यायालयात  आहे. एसटी कामगारांनी उभारलेल्या लढ्याला मोठे यश आले आहे. आता पुढील निर्णय कामगारांनी घ्यावा, असेही ते म्हणाले. तर  एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी आंदोलनात उतरलो होतो, एसटी संप आम्ही चिघळवला असल्याचा आरोप निराधार आहे, असे  आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितले. 

...तर कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई - परब
एसटी कर्मचाऱ्यांबाबत आम्ही पगारवाढीची मागणी मान्य केली आहे. त्यांच्या इतरही काही मागण्या असतील, तर त्यांनी समितीसमोर मांडव्यात. विलीनीकरणाबाबत उच्च न्यायालय जो निर्णय देईल, तो आम्हाला मान्य असणार आहे. आता कर्मचाऱ्यांनी संप करून जनतेला वेठीस धरू नये.  मागण्या मान्य झाल्यावर लढाई थांबवायची असते, पण काही कारणास्तव ते कामावर येत नाही. आम्ही आता उद्या सकाळपर्यंत वाट पाहू, त्यानंतर जे कर्मचारी संपात राहतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिला आहे. 

एसटी कर्मचारी आंदोलनाचा चालक कोण?
- विलीनीकरणाच्या मागणीवरून एसटी कर्मचाऱ्यांचे आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. त्याचे नेतृत्व माजी मंत्री सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर करत होते. मात्र त्यांनी आंदोलनातून माघार घेतल्याने या आंदोलनाचा चालक कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

- गेल्या तीन आठवड्याहून अधिक काळापासून एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीसाठी संपावर आहेत. सुरुवात एसटी कर्मचारी कृती समितीने केली होती. मात्र काही मागण्या मान्य झाल्याने आंदोलन मागे घेतले. परंतु विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून भाजपने संप हायजॅक केला. पण विलीनीकरण शक्य नाही हे भाजपच्या लक्षात आले. मात्र आता कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीसाठी अडून बसले आहेत. त्यामुळे  भाजपला माघारही घेता येत नव्हती. मात्र राज्य सरकारने वेतनवाढ दिल्याच्या निर्णयाचे स्वागत करत गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी आंदोलनातून माघार घेतली आहे.
- एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनातून दोन नेत्यांनी माघार मात्र ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही, संप सुरू ठेवा अशी भूमिका घेतली. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवून कर्मचाऱ्यांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. 
- दुसरीकडे संघर्ष एसटी कामगार युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी यामध्ये उडी घेतली आहे. आपण ७ नोव्हेंबरला या आंदोलनाला पाठिंबा दिला होता; मात्र आझाद मैदानात दोन नेते नेतृत्व करत होते त्यामुळे आपण इथे आलो नाही. मात्र ते गेल्याने कर्मचाऱ्यांनी मला बोलावले आहे. 
- कर्मचाऱ्यांना तुटपुंजे वेतन आहे, ते वेळेत मिळत नाही. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारचा कर्मचारी घोषित करावे. एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन केले जावे, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. त्यामुळे आंदोलनाचे नेतृत्व कोण करणार, असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडला आहे.

पडळकर, खोत समर्थकांनी धरली परतीची वाट -
एसटी कर्मचाऱ्यांच्या आझाद मैदानात सुरू असलेल्या आंदोलनाला आता वेगळे वळण लागले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे केंद्र सांगलीतील आटपाडी होते. येथूनच खरी आंदोलनाची सुरुवात झाली.  मात्र सांगलीतील खोत आणि पडळकर यांनी आंदोलनातून माघार घेतल्याने त्यांच्या समर्थकांनी परतीची वाट धरली आहे.
आंदोलक जेवणाविना 
गेल्या पंधरा दिवसांपासून सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी आझाद मैदानात ठाण मांडून बसले होते. ते उपस्थित असताना आंदोलक कर्मचाऱ्यांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात येत होती. मात्र  या नेत्यांनी आंदोलनातून माघार  घेतल्याने कर्मचाऱ्यांना जेवण मिळाले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना  खाण्याची व्यवस्था स्वतः करावी लागली. दरम्यान, आमचे जेवण बंद केले तर आंदोलन बंद करणार नाही, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले.
दिवसभरात धावल्या
४५७ एसटी रस्त्यावर
राज्यभरात गुरुवारी संध्याकाळपर्यंत राज्यात ४५७ एसटी धावल्या. त्यातून १११८८ प्रवाशांनी प्रवास केला. यामध्ये ६० शिवनेरी, १३६ शिवशाही, तर २६१ साध्या बसचा समावेश आहे. तर, एसटी महामंडळात
एकूण ९२,२६६ कर्मचाऱ्यांपैकी ९७०५ कर्मचारी मंगळवारी कामावर हजर झाले आहेत. तर, ८२ हजार ५६१ कर्मचारी संपात सहभागी आहेत.
 

Web Title: Retreat of leaders; ST employees insisted on the merger, more employees likely to return to work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.