झारखंडमध्ये भाजपच्या जनविरोधी धोरणांचा पराभव, बाळासाहेब थोरातांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 07:47 PM2019-12-23T19:47:00+5:302019-12-23T19:47:32+5:30

'२०१७ पासून देशामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांत कोणत्याही राज्यात भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळालेले नाही.

jharkhand election 2019 : Balasaheb Thorat attack on BJP | झारखंडमध्ये भाजपच्या जनविरोधी धोरणांचा पराभव, बाळासाहेब थोरातांचा टोला

झारखंडमध्ये भाजपच्या जनविरोधी धोरणांचा पराभव, बाळासाहेब थोरातांचा टोला

Next

मुंबई -  भाजप सरकारच्या पाच वर्षाच्या सत्ताकाळात झारखंडची सर्वच क्षेत्रात पिछेहाट झाली. झारखंडमधील भाजपचे सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरल्याने जनतेचे जीवनमान प्रचंड खालवले असताना स्थानिक जनतेचे मुलभूत प्रश्न सोडून राष्ट्रीय प्रश्न त्यांच्यावर थोपवण्याचे भाजपचे राजकारण झारखंडच्या जनतेने पूर्णपणे नाकारले आहे. खोट्या राष्ट्रवादाची अफूची गोळी, कलम ३७० चे भांडवल आणि नागरिकत्व सुधारणा कायदा, एनआरसी आणि पाकिस्तान या सगळ्या मुद्द्यांवर राजकारण करून निवडणूक जिंकण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शाह यांचा प्रयत्न जनतेने हाणून पाडला आहे. आणि भाजपच्या जनविरोधी राजकारणाचा पराभव केला आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.    

या संदर्भात थोरात म्हणाले की, ''२०१७ पासून देशामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांत कोणत्याही राज्यात भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळालेले नाही. झारखंड राज्याची निर्मिती झाल्यापासून तेथे भाजप आघाडीचे सरकार अस्तित्वात होते. काँग्रेस पक्ष तिथे कधीही सत्तेत आला नाही. प्रथमच भारतीय जनता पक्ष सत्तेबाहेर जाणार आहे आणि काँग्रेस आघाडीचे सरकार येणार आहे. २०१४ च्या निवडणुकीत जवळपास ३७ जागा जिंकून बहुमताच्या जवळपास असणा-या भाजपकडे पाच वर्षात झारखंडचा विकास करण्याची नामी संधी होती. परंतु पाच वर्षात भाजप सरकारने झारखंडला पिछाडीवर नेले.  २०१४ साली ७.३२ टक्के असणारा राज्याच्या सकल उत्पन्न वाढीचा दर हा २०१९ पर्यंत ५.२ टक्क्यांपर्यंत घसरला. बेरोजगारीचा दर हा १५.१ टक्क्यांपर्यंत गेला. दरडोई उत्पन्नामध्ये झारखंडचा क्रमांक २८ वरून ३० वर गेला. गरिबी ८.६ टक्क्यांनी वाढली. उद्योगधंदे बुडाले नविन गुंतवणूक आली नाही. आदिवासींचे प्रश्न अधिक गंभीर झाले. शेतकरी हवालदिल झाला, भूकबळी गेले. हे अपयश झाकण्याकरिता निवडणुकांपूर्वी  महाराष्ट्राप्रमाणेच मेगाभरती हाती घेऊन विरोधी पक्षातून ११ आमदार आयात केले पण झारखंडच्या जनतेने भाजपच्या अनैतिक राजकारणाचा दणदणीत पराभव केला. मोदी शाह यांनी प्रत्येकी ९ सभा घेऊन राज्याच्या मूळ प्रश्नांना बगल देण्याचा प्रयत्न केला, तो ही सपशेल अयशस्वी ठरला आहे.'' 

''देशपातळीवर आणखी एक राज्य भाजपच्या हातून गेल्याने काँग्रेस मुक्त भारताची घोषणा देणाऱ्या भाजपला आता स्वतःच्या अस्तित्वासाठी लढावे लागेल. भाजपच्या जनविरोधी आणि विभाजनवादी धोरणांविरोधात देशात प्रचंड जनआक्रोश आहे. हे देशपातळीवर सुरू असलेल्या आंदोलनातून आणि आजच्या निकालावरून सिद्ध झाले आहे. झारखंडमध्ये येणारे नवे सरकार गरीब, आदिवासी, शेतकरी, कष्टकरी, महिला, तरुण,विद्यार्थी यांचे असेल.महाराष्ट्रातील सरकारप्रमाणे झारखंडमधील काँग्रेस आघाडीचे सरकार जनतेच्या हिताचे निर्णय घेईल,'' असा विश्वास करून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.  

Web Title: jharkhand election 2019 : Balasaheb Thorat attack on BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.