गेल्या २५ दिवसांत सात हजार कोटींची गृहखरेदीे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2020 06:05 AM2020-09-26T06:05:39+5:302020-09-26T06:10:02+5:30

मागील सप्टेंबरपेक्षा या वर्षी जास्त खरेदी-विक्री; मुद्रांक शुल्क कपातीची मात्रा पडली लागू

Home buys worth Rs 7,000 crore in last 25 days | गेल्या २५ दिवसांत सात हजार कोटींची गृहखरेदीे

गेल्या २५ दिवसांत सात हजार कोटींची गृहखरेदीे

Next

संदीप शिंदे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक मंदीचा प्रचंड मोठा फटका गृहनिर्माण क्षेत्राला बसला होता. मात्र, राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात दिलेली घसघशीत सवलत आणि विकासकांनी विविध सवलतींच्या माध्यमातून कमी केलेल्या किमतींमुळे मालमत्तांच्या खरेदी - विक्रीने आश्चर्यकारक भरारी घेतल्याचे दिसते.


मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात मुंबईत ४०३२ मालमत्तांचे व्यवहार नोंदविले गेले होते. यंदा कोरोनाचे संकट गडद होत असतानाही २५ सप्टेंबरपर्यंत या व्यवहारांनी ४४०० चा पल्ला गाठला आहे. त्यातून मिळालेल्या मुद्रांक शुल्काचा ताळेबंद मांडल्यास सुमारे ७ हजार कोटींपेक्षा जास्त किमतीच्या मालमत्तांचे व्यवहार शहरांत झाल्याचे स्पष्ट होते.


कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर एप्रिल महिन्यात एकाही घर, जमीन किंवा व्यावसायिक मालमत्तेचा व्यवहार झाला नव्हता. मे महिन्यात ती संख्या २०७ पर्यंत गेली. जून, जुलै आणि आॅगस्टमध्ये मजल दरमजल करत अनुक्रमे १८३९, २६६२ आणि २६४२ असे व्यवहार नोंदविले गेले होते. त्यात आता अनपेक्षित वाढ होताना दिसत असून, यंदा महिनाअखेरीपर्यंत ती संख्या ५००० पर्यंत जाईल अशी चिन्हे आहेत.


कोसळलेल्या बांधकाम व्यवसायाला सावरण्यासाठी राज्य सरकारने डिसेंबर, २०२० पर्यंत मुद्रांक शुल्कात तीन टक्के तर त्यानंतर मार्च, २०२१ पर्यंत दोन टक्के सवलत जाहीर केली आहे. त्यानंतर विकासकांनीसुद्धा उर्वरित मुद्रांक शुल्क माफी, जीएसटी माफी, विनामूल्य पार्किंग, आकर्षक पेमेंट योजना दाखल करून ग्राहकांना आकर्षित करण्यास सुरुवात केली आहे. सरकार आणि विकासकांनी दिलेल्या सवलतींमुळे अनेक ठिकाणी घरांच्या किमती ८ ते १५ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. घरांच्या खरेदी - विक्रीचे वाढलेले आकडे त्याचे परिणाम दर्शवितात. मुद्रांक शुल्कात कपात होणार याची कुणकुण आॅगस्ट महिन्याच लागली होती. त्यामुळे अनेकांनी मालमत्तांच्या खरेदी - विक्रीबाबतची बोलणी पूर्ण केली असली तरी ते व्यवहार नोंदणीकृत केले नव्हते. सरकारने सवलत जाहीर केल्यानंतर ही नोंदणी झाली. त्यामुळे आकडे वाढल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

सवलतीमुळे सरकारी महसुलात घट
गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात ४०३२ मालमत्तांचे व्यवहार नोंदणीकृत झाल्यानंतर मुद्रांक शुल्कापोटी सरकारी तिजोरीत ३४७ कोटी रुपये जमा झाले होते. यंदा पहिल्या २५ दिवसांत त्यापेक्षा जास्त व्यवहारांची नोंद झाल्यानंतरही तिजोरीतील आवक १४८ कोटींपर्यंतच पोहचू शकली आहे. विशेष म्हणजे गेल्या महिन्यात २६४२ मालमत्तांच्या व्यवहारांपोटी १७६ कोटी रुपये सरकारला मिळाले होते. आता व्यवहार जास्त झाले असले तरी मुद्रांक शुल्कातील सवलतीमुळे महसूल घटला आहे.

Web Title: Home buys worth Rs 7,000 crore in last 25 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Homeघर