Maratha Reservation: मराठा उमेदवारांना तात्काळ शासकीय सेवेत सामावून घ्यावे; संभाजीराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 01:02 PM2021-05-08T13:02:12+5:302021-05-08T13:06:08+5:30

Maratha Reservation: छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.

chhatrapati sambhaji raje wrote letter to cm uddhav thackeray about maratha reservation | Maratha Reservation: मराठा उमेदवारांना तात्काळ शासकीय सेवेत सामावून घ्यावे; संभाजीराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Maratha Reservation: मराठा उमेदवारांना तात्काळ शासकीय सेवेत सामावून घ्यावे; संभाजीराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

googlenewsNext

मुंबई: मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द करण्याचा निकाल दिल्यानंतर राज्य सरकारसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. राज्यात या विषयावर चर्चा सुरू असून, छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून, मराठा उमेदवारांना तात्काळ शासकीय सेवेत सामावून घ्यावे, असे म्हटले आहे. (chhatrapati sambhaji raje wrote letter to cm uddhav thackeray about maratha reservation) 

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यानंतर राज्य सरकारकडून विविध पर्यायांची पडताळणी सुरू आहे.  विरोधकांनीही मराठा आरक्षणावरून सरकारवर टीका केली होती. या पार्श्वभूमीवर नव्याने मागासवर्घीय आयोग स्थापन करण्याचा सल्ला प्रशासनाला देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. शासकीय भरती प्रक्रियेत निवड झालेल्या मराठा उमेदवारांना तात्काळ सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी संभाजीराजेंनी केली आहे. आता राज्य सरकार याबाबत काय निर्णय घेणार, याकडे सर्वांच्या लक्ष्य लागले आहे. 

“शरद पवारांची बार मालकांसाठी कळकळ पाहून कंठ दाटून आला, शेतकऱ्यांसाठीही पत्राची अपेक्षा”

छत्रपती संभाजीराजेंचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेलेल पत्र...

मा. उद्धव ठाकरे,
मुख्यमंत्री

महोदय,

महाराष्ट्र विधिमंडळाने पारीत केलेल्या व मुंबई उच्च न्यायालयाने कायम केलेल्या मराठा आरक्षण कायद्यांतर्गत २०१८ सालापासून मराठा समाजातील अनेक उमेदवार विविध शासकीय भरती प्रक्रियांमध्ये नियुक्तीसाठी पात्र ठरले आहेत. महाराष्ट्र शासनाने मागविलेल्या एका अहवालानुसार असे २,१८५ मराठा उमेदवार असून, त्यांना अद्याप नियुक्तीपत्र देणे बाकी आहे. प्रथमतः कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेली टाळेबंदी व नंतर मा. सर्वोच्च न्यायालयाने दि. ९ सप्टेंबर २०२० रोजी मराठा आरक्षण अंमलबजावणीस दिलेली स्थगिती, या कारणांमुळे शासनाकडून या उमेदवारांस सर्व प्रक्रिया पूर्ण असूनही नियुक्तीपत्र देण्यास विलंब झाला.

सध्या मा. सर्वोच्च न्यायालयाने दि. ५ मे २०२१ रोजी मराठा आरक्षण कायदा रद्द करताना हा आदेश पूर्वलक्षी प्रभावाने लागू न करता, दि. ९ सप्टेंबर २०२० पूर्वी निवड प्रक्रिया पूर्ण झालेल्या सर्व मराठा उमेदवारांच्या नियुक्तीस संरक्षण दिले आहे; त्यामुळे शासनाने अतिविलंब न करता या सर्व उमेदवारांना, ते ज्या पदासाठी पात्र ठरले आहेत, त्याच पदाची नियुक्तीपत्रे देऊन त्वरीत शासकीय सेवेत सामावून घ्यावे.

तसेच, दि. ९ सप्टेंबर २०२० पूर्वी व नंतर सुरू झालेल्या व अद्याप पूर्ण न झालेल्या शासकीय भरती प्रक्रियांमध्ये सहभागी झालेल्या मराठा उमेदवारांमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दि. ४ जानेवारी २०२१ रोजी काढलेले प्रसिद्धीपत्रक (एमआयएस-०६१८/सीआर-६१/२०१८/तीन) मधील कलम ३ मधील उपकलमांमुळे प्रवर्ग निवडण्याबाबत संभ्रम होता. यामुळे सदर प्रक्रियेत ज्या मराठा विद्यार्थ्यांनी एस.ई.बी.सी. व ओपन प्रवर्ग निवडला आहे, अशा सर्व मराठा विद्यार्थ्यांना ई.डब्लू.एस. प्रवर्ग निवडण्याचा पर्याय तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावा. वरील सर्व सूचनांचा सकारात्मक विचार करून, कोणताही निर्णय अधांतरी न ठेवता, कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजास न्याय देण्याची ठोस भूमिका शासनाने ठेवावी.

कळावे.

आपला,
संभाजी छत्रपती
 

Web Title: chhatrapati sambhaji raje wrote letter to cm uddhav thackeray about maratha reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.