शिधापत्रिकाधारकांच्या तुलनेत डाळींचा पुरवठा कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:19 AM2021-05-13T04:19:55+5:302021-05-13T04:19:55+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाने एप्रिल, मे महिन्यांत काही योजनांच्या लाभार्थ्यांना मोफत धान्य देण्याची घोषणा केली. प्रती व्यक्ती तीन ...
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाने एप्रिल, मे महिन्यांत काही योजनांच्या लाभार्थ्यांना मोफत धान्य देण्याची घोषणा केली. प्रती व्यक्ती तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ असे पाच किलो मोफत धान्याचा लाभ नागरिकांना मिळणार आहे. उदगीर तालुक्यातील नागरिकांना मात्र गहू, तांदळाबरोबरच हरभरा डाळ मिळणार आहे. त्यानुसार स्वस्त धान्य दुकानात डाळ पुरविण्यात आली. प्रती कार्ड एक किलो डाळ देण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात येते. मात्र, रेशनकार्डांच्या तुलनेत निम्मी डाळ आल्याने दुकानदारांना वाटप करण्यासाठी अडचण होत आहे. हंडरगुळीतील काही दुकानदारांनी जमेल तसे वाटप केले.
हाळी येथे तीन व हंडरगुळी येथे तीन असे स्वस्त धान्य दुकानदार आहेत. जवळपास दोन हजारांपेक्षा अधिक लाभार्थी आहेत. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाने लाॅकडाऊन जाहीर केले आहे. या काळात सामान्य नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून दोन महिन्यांचे मोफत धान्य शासनाकडून पुरविले जात आहे.
डाळीचा पुरवठा करू...
वितरण केलेल्या धान्याची माहिती घेऊन कमी पडलेल्या डाळीचा लवकरच रेशन दुकानांना पुरवठा करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे उदगीरचे पुरवठा अधिकारी राजेश बेंबळगे यांनी सांगितले.