शेततळे, शोषखड्ड्यांमुळे दावतपुरात १२ महिने पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 04:34 PM2019-05-11T16:34:29+5:302019-05-11T16:38:28+5:30

दोन वर्षांत श्रमदानातून जवळपास ११ ते १२ लाखांची कामे केली़ त्यास शासनाच्या योजनांची जोड मिळाली आणि गाव पाणीदार झाले़

Due to the lake in agriculture land, 12 months water in Davatpur | शेततळे, शोषखड्ड्यांमुळे दावतपुरात १२ महिने पाणी

शेततळे, शोषखड्ड्यांमुळे दावतपुरात १२ महिने पाणी

Next
ठळक मुद्दे दावतपूर हे ४६५ उंबरठ्यांचे आणि २१६६ लोकसंख्येचे गाव़ २०१६- १७ मध्ये प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन श्रमदानाच्या माध्यमातून गाव पाणीदार करण्यासाठी प्रयत्न

- हरी मोकाशे

लातूर : हिवाळा मध्यावर आला की दावतपूर गावात पाण्याचा यक्षप्रश्न उभा राहत असे़ पाणी उपलब्ध नसल्याने रबी हंगामाच्या उत्पन्नावर बहुतांश शेतकऱ्यांना पाणीच सोडावे लागत असे़ दरवर्षीच्या या संकटावर मात करण्यासाठी गावकऱ्यांनीच चंग बांधला आणि दोन वर्षांत श्रमदानातून जवळपास ११ ते १२ लाखांची कामे केली़ त्यास शासनाच्या योजनांची जोड मिळाली आणि गाव पाणीदार झाले़ ही यशकथा आहे दावतपूर (ता़ औसा) गावची़

औसा तालुक्यातील दावतपूर हे ४६५ उंबरठ्यांचे आणि २१६६ लोकसंख्येचे गाव़ १९९३ च्या भूकंपानंतर पुनर्वसन झाले़ परंतु, गावानजीक कुठलाही प्रकल्प नसल्याने गावकऱ्यांची पाण्याची मदार सार्वजनिक विहीर आणि एका बोअरवर आहे़ गावात ९ सदस्यांची ग्रामपंचायत असून नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो़ डिसेंबर महिना उजाडला की, गावास पाणीटंचाईच्या झळा बसत असत़ उन्हाळ्यात तर रानोमाळ भटकंती करावी लागत असे़

गावच डोंगराळ भागात असल्याने खरीप हंगाम वगळला तर ८० टक्के शेतकऱ्यांना रबी हंगाम घेता येत नसे़ त्यामुळे गावातील नागरिक रोजगाराच्या शोधात फिरत असत़ या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी सरपंच विठ्ठल बेडजवळगे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी पुढाकार घेतला़ २०१६- १७ मध्ये प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन श्रमदानाच्या माध्यमातून गाव पाणीदार करण्यासाठी मन परिवर्तन केले़  

लोकसहभागातून नाला खोलीकरण, तलावातील गाळ उपसा करण्यात आला़ मग्रारोहयोअंतर्गत शोषखड्डे खोदण्यात आले़ परिणामी, गावातील पाणीपातळीत वाढ झाली़ त्यामुळे रबीची पिकेही शेतकऱ्यांना घेता येऊ लागली आहेत़ यासाठी शेतकरी स्प्रिंकलर, ठिबकचा वापर करीत असल्याचे ग्रामसेवक प्रवीण पाटील यांनी सांगितले़

नेमके काय केले?
पाणी फाऊंडेशनच्या कामात सहभाग घेऊन श्रमदानातून मातीनाला, कंपार्टमेंट बल्डिंगची जवळपास ११ ते १२ लाखांची कामे करण्यात आली़ तसेच जलयुक्त शिवारअंतर्गत ८० ते ८५ क्युबिक मीटर, पाच किमी नाला खोलीकरणाची कामे करण्यात आली़ गावात ३०० जलशोषक खड्डे, १३ सिमेंट बंधाऱ्यांची दुरुस्ती, २२ शेततळी, सात हजार मीटर समतल चर, १८७५ घनमीटर समतल सखोल चर, प्रत्येक घरासमोर शोषखड्डे व परिसरातील तीन तलावांची दुरुस्ती करण्यात आली़ त्यानंतर पर्जन्यमान चांगले झाले आणि गावातील पाणीपातळीत वाढ झाली़ त्यामुळे आजघडीला ८० टक्के शेतकरी रबीचीही पिके घेऊ लागली आहेत़

बदल काय झाला?
दावतपूर गावास उन्हाळ्यात अधिग्रहण तर काही वेळेस टँकरने पाणीपुरवठा होत असे़ परंतु, यंदा जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ ६४ टक्के पर्जन्यमान झाले असतानाही गावात पुरेसा जलसाठा आहे़ गावकऱ्यांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबली आहे़ गावकऱ्यांच्या पुढाकारामुळे गाव पाणीदार झाले आहे़ 

जुन्या गावात तळे घेण्याचा ठराव 
पर्यावरण संतुलनासाठी प्रत्येक घरासमोर वृक्ष लागवड करण्यात आली असून त्याची जबाबदारी त्या कुटुंबावर सोपविली आहे़ जुन्या गावात तळे घेण्याचा ग्रामपंचायतीने ठराव घेतला असल्याचे सरपंच विठ्ठल बेडजवळगे यांनी सांगितले़

Web Title: Due to the lake in agriculture land, 12 months water in Davatpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.