४० हजार लोकांना शिक्षा करणार का..?
By Admin | Updated: August 29, 2015 00:09 IST2015-08-29T00:09:50+5:302015-08-29T00:09:50+5:30
पी. एन. यांची विचारणा : जिल्हा बँक बदली वाद

४० हजार लोकांना शिक्षा करणार का..?
कोल्हापूर : राधानगरी-भुदरगड विधानसभा मतदारसंघातील ४० हजार लोकांनी के. पी. पाटील यांचा पराभव केला. मग त्या सगळ््यांना तुम्ही शिक्षा करणार का, अशी विचारणा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी बँकेचे संचालक ए. वाय. पाटील यांना केली. निमित्त होते जिल्हा बँकेतील बदली प्रकरणाचे. एखाद्याच्या बदलीवरून कसे राजकारण रंगते, याचेही प्रत्यंतर त्यातून आले. घडले ते असे : चेतन पोकर्णेकर हा मूळचा राधानगरीचा लिपिक जिल्हा बँकेच्या कसबा तारळे शाखेत नोकरीत आहे. गेल्या आॅक्टोबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्याने शिवसेनेचे उमेदवार प्रकाश आबिटकर यांचा प्रचार केल्याची तक्रार आहे. त्याचा राग माजी आमदार के. पी. पाटील यांना आला होता; परंतु त्यावेळी बँकेत प्रशासक मंडळ असल्याने त्यांना काहीच करता आले नाही. आता बँकेत संचालक मंडळ अस्तित्वात आल्याने त्यांची बदली हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथे करण्यात आली. त्यांनी बदलीचा आदेश स्वीकारण्यास नकार दिल्यावर तो आदेश पोस्टाने घरी धाडण्यात आला. शेवटी कारवाईच्या भीतीने ते हलकर्णी येथे रुजू झाले. तोपर्यंत हा विषय पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यापर्यंतही गेला. त्यांनी आपण लक्ष घालू, असे आश्वासन दिले. जिल्हा बँकेत काँग्रेसच्या गटाचे माजी आमदार पी. एन. पाटील हे नेते आहेत. आमदार आबिटकर यांना विजयी करण्यात त्यांचाही हातभार लागला होता. त्यामुळे आबिटकर यांनी ही बाब पी. एन. यांच्या कानावर घातली. त्यांनी मग राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व बँकेचे संचालक ए. वाय. पाटील यांना फोन केला व निवडणुकीत पराभव झाला म्हणून बदली करून त्रास देणे योग्य नसल्याचे सांगितले. पराभव काय त्याने एकट्याने विरोधात काम केले म्हणून झालेला नाही. ४० हजार लोकांनी विरोधात मते दिली मग त्या सगळ््यांना शिक्षा देणार का, अशी विचारणाही पाटील यांनी ए. वाय. यांच्याकडे केली. संबंधित लिपिकाने दरम्यान बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्याकडेही दाद मागितली आहे. त्यांनी ‘हजर हो, बघूया काय करायचे ते,’ असे आश्वासन दिले आहे; परंतु हा विषय बँकेत चर्चेत आहे.