संक्रांत महिला उमेदवारांना ठरणार गोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:00 AM2021-01-13T05:00:05+5:302021-01-13T05:00:05+5:30
कुरुंदवाड : ग्रामपंचायत निवडणुकीच्या आदल्या दिवशीच मकरसंक्रांत आहे. संक्रांतीदिवशी महिला एकमेकांना वस्तू स्वरूपात भेट देऊन प्रेम व्यक्त करत असतात. ...
कुरुंदवाड : ग्रामपंचायत निवडणुकीच्या आदल्या दिवशीच मकरसंक्रांत आहे. संक्रांतीदिवशी महिला एकमेकांना वस्तू स्वरूपात भेट देऊन प्रेम व्यक्त करत असतात. संक्रांतीच्या निमित्ताने हे प्रेम अधिक दि्वगुणित होणार आहे. त्यामुळे महिला मतदारांना ही संक्रांत अधिक गोड होणार असली तरी, उमेदवारांवर मात्र आर्थिक संक्रांतच कोसळणार आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीमुळे ग्रामीण भागातील वातावरण ढवळून निघत आहे. या निवडणुकीतच प्रत्येक मतांची किंमत उमेदवारांना कळत असते. त्यामुळे एक-एक मत मिळविण्यासाठी उमेदवार अखेरपर्यंत प्रयत्न करीत असतो. निवडणुकीत प्रचार पदयात्रा, रॅली हे केवळ औपचारिक राहिले असून विजयासाठी मिळणारे मताधिक्य मतदानाच्या आदल्यादिवशी राबविल्या जाणाऱ्या यंत्रणेवरच अवलंबून असते. सामान्य कुटुंबातील मतदारांना वस्तू विशेषत: रोख स्वरूपात भेट देऊन मत विकत घेण्याचा सर्रास प्रकार घडत असतो. त्यामुळे अनेकवेळा लायक नसतानाही आर्थिकदृष्टया सक्षम उमेदवार निवडणुकीत सरस ठरतो.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान होत आहे. १४ जानेवारीला संक्रांत असल्याने तिळगुळ वाटून एकमेकांतील प्रेम अधिक दृढ केले जाते. नेमकी हीच संधी साधण्यासाठी उमेदवारांकडून स्पर्धक उमेदवारावर मात करण्यासाठी रणनीती आखली जात आहे.
उमेदवारांना कपबशी, कुकर, घागर, छत्री, सिलेंडर, शिलाई मशीन अशा गृहोपयोगी वस्तूंचे चिन्ह मिळाले आहे. मतदानाच्या आदल्या रात्री संक्रांतीची भेट देण्यासाठी काही उमेदवारांनी नियोजन केले आहे. त्यामुळे यंदाची संक्रांत महिला मतदारांसाठी गोड ठरणार आहे.