MLA Chandrakant Jadhav : गोरगरिबांचा आधार, जनतेचा आमदार गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2021 12:27 PM2021-12-03T12:27:53+5:302021-12-03T12:37:06+5:30

आमदार झाल्यानंतर अण्णांनी कोल्हापूर शहराचा विकास आणि उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठी स्वत:ला झोकून दिले. निरीक्षणातून वस्तुस्थितीचा अभ्यास करणं हे त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यामुळेच जीवनात त्यांनी कधी अपयश पाहिलेले नाही.

MLA Chandrakant Jadhav The support of the poor the people MLA has gone | MLA Chandrakant Jadhav : गोरगरिबांचा आधार, जनतेचा आमदार गेला

MLA Chandrakant Jadhav : गोरगरिबांचा आधार, जनतेचा आमदार गेला

Next

भारत चव्हाण

सकाळी बातमी कानावर आली आणि धक्काच बसला. आयुष्यभर संघर्ष, संकटांशी लढताना दाखविलेले धैर्य, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर यश मिळविण्याची महत्त्वाकांक्षा असलेले आमदार चंद्रकांत जाधव गेले हेच मुळात पटत नव्हते. झपझप व्हाॅटस्ॲप ग्रुप चाळले तर सर्वत्रच ते गेल्याची प्राथमिक माहिती मिळत गेली. क्षणभर काहीच सूचत नव्हते. तरीही एक-दोन फोनवर बातमी खरी असल्याचे स्पष्ट झाले. शांत, निगर्वी, मिभाषी, यशस्वी उद्योजक-राजकारणी झाल्यानंतरही पाय जमिनीवर ठेवून सर्वसामान्यांशी जवळीक असलेले चंद्रकांत जाधव यांचा प्रसन्न चेहरा, त्यांचे गोड शब्द कानावर पडत असल्याचा भास व्हायला लागला.

चंद्रकांत ‘अण्णा’ या टोपण नावाने ओळखले जात होते. नशिबाने सर्व गोष्टी त्यांना मिळाल्या; परंतु नशीब घडविण्याचे कसब त्यांच्या हिमतीत होते. आधी फुटबॉल खेळाडू म्हणून ते यशस्वी झाले, नंतर उद्योजक म्हणून नावलौकिक मिळविला. २०१९ मध्ये अचूक वेळ साधत राजकारणासारख्या नव्या क्षेत्रांत यश मिळविले. त्यांच्या आयुष्यातील पहिल्याच आणि तेही आमदारकीच्या निवडणुकीत उडी घेतली आणि यशस्वीही झाले. अण्णा वृत्तीने प्रचंड कष्टाळू होते. एखादी गोष्ट मनात आली म्हणून त्यांनी कधीच केली नाही. निरीक्षणातून वस्तुस्थितीचा अभ्यास करणं हे त्यांचे वैशिष्ट्य होते. अभ्यासाअंती ते स्वत:चे मत बनवायचे आणि मगच ती गोष्ट करायची की नाही ठरवीत होते. त्यामुळेच जीवनात त्यांनी कधी अपयश पाहिलेले नाही.

सन १९८१ मध्ये तरुणवयातील अण्णांनी वडिलोपार्जित उद्योगात पहिले पाऊल टाकले. त्यांना लेथ मशीनवर काम करण्याचे कसलेही ज्ञान नव्हते; परंतु त्यांनी वडिलांच्या हाताखाली पडेल ती कामे करण्याचा प्रयत्न केला. कारखान्यात कामगार म्हणून काम करीत असतानाच ‘आयटीआय’मध्ये प्रवेश घेऊन आपल्या व्यवसायाशी निगडित तांत्रिक शिक्षण पूर्ण केले. त्यातून त्यांच्यात लपलेल्या एक नव्या उद्योजकाची पाळेमुळे रुजली. १९९६ मध्ये वडील पंडितराव यांचे निधन झाले. सगळी जबाबदारी अण्णांच्या खांद्यावर आली. ही जबाबदारी त्यांनी खंबीरपणे सांभाळलीच नाही तर उद्योगाला भरभराटी प्राप्त करून दिली. जाधव इंडस्ट्रीजला संपूर्ण देशभरात नावलौकिक प्राप्त करून दिला.

आमदार झाल्यानंतर अण्णांनी कोल्हापूर शहराचा विकास आणि उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठी स्वत:ला झोकून दिले. शहरातील अनेक प्रश्नांचा त्यांनी अभ्यास केला. एकेक प्रश्न सोडविण्यास त्यांनी प्राधान्य दिले होते. व्यापारी, उद्योजकांच्या जकात, एलबीटीविरोधी आंदोलनाचे त्यांनी नेतृत्व केले. नियमित विमान सेवा, रस्ते, आरोग्याच्या समस्या, पाणीपुरवठ्यातील सुधारणा याविषयी त्यांनी काम सुरू केले होते. प्रत्येक आठवड्याला ते महापालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मार्गदर्शन करीत होते. त्यामागे जनतेच्या समस्या सुटाव्यात, त्यांची कामे व्हावीत हाच हेतू होता.

समाजातील उच्चभ्रू लोकांशी त्यांचे जसे संबंध होते तसेच गोरगरीब, उपेक्षित घटकांशीसुद्धा त्यांची नाळ जोडली गेली होती. दातृत्व हा त्यांचा स्थायिभाव होता. मोठा उद्योजक, आमदार, घरात दोन नगरसेवक, अनेक मोठ्या संस्थांशी संबंध असूनही त्यांनी गर्व कधी बाळगला नाही. समाजातील सर्व घटकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. कोणीही त्यांना सहजपणे भेटत होते. दोन वेळा आलेला महापूर आणि कोरोनासारख्या महामारीवेळी अण्णांनी सर्वसामान्यांसाठी अन्नधान्याची किट, औषधींचे वाटप केले. त्यांच्यासाठी वैद्यकीय शिबिरे घेतली. कोरोना प्रतिबंधात्मक आयुर्वेदिक औषधी, तर त्यांनी घराघरात जाऊन वाटली. लॉकडाऊन असताना ते स्वत: रस्त्यावर उतरून लोकांना मार्गदर्शन करीत होते. जनतेचा कोरोनापासून बचाव व्हावा यासाठी प्रयत्नशील होते.

दुर्दैवाने त्यांनाच कोरोना झाला. त्यातूनही ते उठले. परत कामाला लागले होते. दुर्दैवाने अन्ननलिकेचे इन्फेक्शन झाले. त्यातून ते बाहेर आले नाहीत. जीवनात कधीही हार न माणणाऱ्या अण्णांना या आजारात मात्र हार मानावी लागली.

Web Title: MLA Chandrakant Jadhav The support of the poor the people MLA has gone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.