हातात हात दिल्याने काँग्रेसला गुलाल--पायात पाय घातल्याने युती तोंडावर आपटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 12:29 PM2019-10-25T12:29:28+5:302019-10-25T12:33:25+5:30

सतेज पाटील यांनी राष्ट्रवादीसाठी प्रचारसभा घेतल्या, तर राष्ट्रवादीनेही करवीरमध्ये काँग्रेसला मनापासून मदत केली. हे दोन्ही पक्ष दुफळी टाळून एकत्र आले तर चांगले यश मिळते हे २००४ मध्ये घडले होते, त्याची पुनरावृत्ती १५ वर्षांनंतर यंदा झाली.

Gulal gives Congress a hand | हातात हात दिल्याने काँग्रेसला गुलाल--पायात पाय घातल्याने युती तोंडावर आपटली

हातात हात दिल्याने काँग्रेसला गुलाल--पायात पाय घातल्याने युती तोंडावर आपटली

googlenewsNext
ठळक मुद्देगोकुळपासून जिल्हा बँक व अन्य संस्थात्मक राजकारणाची सूत्रे या गटाकडे राहतील, असे दिसत आहे.

विश्र्वास पाटील

कोल्हापूर : दोन्ही काँग्रेसच्या जिल्ह्यातील नेत्यांनी अंतर्गत गटबाजीला तिलांजली देऊन हातात हात दिल्यानेच त्यांना कोल्हापूर जिल्ह्यात दोन्ही काँग्रेसला घवघवीत यश मिळाले. काँग्रेसला गेल्या निवडणुकीत भोपळाही फोडता आला नव्हता. या निवडणुकीत जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली तब्बल चार आमदार निवडून आले. पश्चिम महाराष्ट्रात फक्त कोल्हापूरमध्येच काँग्रेसचे चार आमदार निवडून आले. पुणे व सांगलीत प्रत्येकी दोन आणि सातारा जिल्ह्यात एकच आमदार निवडून आला. भाजप-शिवसेनेने मात्र एकमेकांच्या पायात पाय घातल्याने त्यांचा जिल्ह्यात पराभव झाला.

राज्यस्तरीय एकही नेता प्रचाराला आला नसताना उमेदवारांनी स्वत:च्या ताकदीवरच हे यश मिळविले. या निवडणुकीत प्रथमच दोन्ही काँग्रेसमधील नेते विश्वासाने एकमेकांना विजयी करण्यासाठी धडपडत आहेत, असे चित्र दिसले. सतेज पाटील यांच्यामुळे चंद्रकांत जाधव यांना कसबा बावड्यात चांगली मते मिळाली. करवीर मतदारसंघात त्यांची गगनबावड्यातील मदत पी. एन. पाटील यांना झाली. पी. एन. पाटील यांच्या जुन्या सांगरूळमधील गटाची मदत कोल्हापूर दक्षिणमध्ये ऋतुराज पाटील यांना झाली. सतेज पाटील यांनी राष्ट्रवादीसाठी प्रचारसभा घेतल्या, तर राष्ट्रवादीनेही करवीरमध्ये काँग्रेसला मनापासून मदत केली. हे दोन्ही पक्ष दुफळी टाळून एकत्र आले तर चांगले यश मिळते हे २००४ मध्ये घडले होते, त्याची पुनरावृत्ती १५ वर्षांनंतर यंदा झाली.

मागच्या निवडणुकीत शिवसेनेला सहा व भाजपला दोन जागा मिळाल्या. त्यांचाच पक्ष सत्तेत असतानाही कोल्हापूरच्या प्रश्नांना फार न्याय मिळाल्याचे चित्र नाही. पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे नुसत्या बढाया मारत सुटले. निकालाच्या आदल्यादिवशी ते सर्व १0 जागा आम्हीच जिंकू, असे सांगत होते; परंतु जनमानस काय आहे याचा अंदाज त्यांना आला नाही. भाजपच्या दोन जागाही ते वाचवू शकले नाहीत. मी चुटकी वाजवली की लोक त्याप्रमाणे वागतात, असा भ्रम जनतेने मोडून काढला. शिवसेनेलाही लोकांनी स्पष्टपणे नाकारले. त्यासाठी त्या त्या मतदारसंघातील स्थानिक कारणेही कारणीभूत आहेत. कोल्हापूर हा कधीच शिवसेनेचा बालेकिल्ला नव्हता. भाजपही हरला; परंतु त्याचवेळेला बंडखोरांना ताकद दिल्याने शिवसेनाही नेस्तनाबूत झाली.

  • 1. प्रकाश आवाडे यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला व अपक्ष म्हणून निवडणूक लढवून भाजपचे राज्य सरचिटणीस आमदार सुरेश हाळवणकर यांचा ५० हजार मतांनी पराभव केला. इचलकरंजीत हिंदुत्ववादी मतांचे धुव्रीकरण करण्यात ते यशस्वी झाले. तिथे ‘आवाडे’ घराण्याची ताकद पुन्हा दिसून आली.
  • कागल विधानसभा मतदार संघात शिवसेनेच्या उमेदवारीचा घोळ झाला नसता तर तिथे वेगळे चित्र दिसले असते. हसन मुश्रीफ यांनी तिरंगी लढत होईल असे प्रयत्न केले व तेच त्यांच्या विजयासाठी कारणीभूत झाले.
  • भाजपची हवा, ३७० चे राजकारण, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभाही भाजपला पराभवापासून वाचवू शकली नाही
  • स्वाभिमानी शेतकरी संघटनेला लोकसभेपाठोपाठ शिरोळ विधानसभा मतदारसंघातही पराभवाची नामुष्की
  •  जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे यांनी चार उमेदवार उभे केले; परंतु ते स्वत:च विजयी झाले व त्यांचा उमेदवार मात्र शिवसेनेच्या डॉ. सुजित मिणचेकर यांच्या पराभवास कारणीभूत ठरला.
  •  शिवसेना गेल्या निवडणुकीत स्थानिक परिस्थितीचा फायदा घेऊन सहा ठिकाणी विजयी झाली व यावेळेलाही मतदारसंघातील प्रश्नांनीच त्यांचा पराभव केला.
  • राष्ट्रवादीने तीन जागा लढवून दोन जिंकल्या. हसन मुश्रीफ यांनी लोकसंपर्काच्या आधारे सलग पाचवा विजय साकारला. समरजित घाटगे यांनी त्यांना झुंजवले.


त्रिमूर्तींचा डाव यशस्वी
जिल्ह्याचे राजकारण यापुढे आमदार सतेज पाटील, आमदार हसन मुश्रीफ आणि शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक हेच एकत्र करतील, असे स्पष्टपणे दिसत आहे. त्यांच्या जोडीला आमदार राजेश पाटील, जनसुराज्यचे विनय कोरे, आमदार राजेंद्र यड्रावकर यांचेही बळ असू शकते. भाजप व महाडिक विरोधातील गटाचे नेतृत्व यांच्याकडे राहील. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील सहापैकी पाच जागांवर दोन्ही काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. राधानगरीचे आमदार प्रकाश आबिटकर हे मंडलिक गटाशी संबंधितच आहेत. गोकुळपासून जिल्हा बँक व अन्य संस्थात्मक राजकारणाची सूत्रे या गटाकडे राहतील, असे दिसत आहे.

आजच्या घडामोडी...
१. कोल्हापूर दक्षिणमध्ये अटीतटीची लढत होईल, असे म्हटले जाई; परंतु पहिल्या फेरीपासूनच काँग्रेसच्या ऋतुराज पाटील यांना आघाडी मिळाली. काही झाले तरी निवडणूक जिंकायचीच यासाठी केलेले सुक्ष्म नियोजन त्यांच्या कामी आले.
२.चंदगड मतदारसंघात वंचित आघाडीच्या अप्पी पाटील यांनी जोरदार मुसंडी मारली. गडहिंग्लज तालुक्यातील मतमोजणी होईपर्यंत तेच आघाडीवर होते. ही जागा वंचित आघाडीला जाईल असेच चित्र होते; परंतु चंदगड तालुक्याने राजेश पाटील यांना हात दिला.
३. हातकणंगलेमध्येही आमदार सुजित मिणचेकर, राजूबाबा आवळे व जनसुराज्य शक्ती पक्षाचे अशोकराव माने यांच्यात लढत झाली. एकवेळ अशोकराव माने विजयी होतील, असे चित्र होते; परंतु काँग्रेसच्या राजूबाबा आवळे यांनी १५ वर्षांचा बॅकलॉग भरून काढला. येथे जातीचा फॅक्टरही महत्त्वाचा ठरला.
४. शाहूवाडीमध्ये शिवसेनेचे सत्यजित पाटील यांना सुरुवातीला चांगले मताधिक्य होते; परंतु कोरे यांनी त्यांचे शाहूवाडीतील मताधिक्क्य कमी केले व तिथेच निवडणूक टर्न झाली.
५. करवीरमध्ये चंद्रदीप नरके यांचा पराभव पन्हाळ््यात कमी मताधिक्य मिळाल्यानेच झाला. हे मताधिक्य गगनबावड्याने फेडले. महापुरात देवदूत बनून काम केले, चांगला संपर्क या गोष्टी ‘यावेळेला पी. एन..’ या जनभावनेने धुवून गेल्या.

  • महत्वाचे :

दोन्ही खासदारांना धोक्याचा इशारा
लोकसभा निवडणूकीत शिवसेनेचे दोन्ही खासदार निवडून आले. ते विजयी व्हावेत यासाठी ज्या आमदारांनी प्रयत्न केले, त्या आमदारांनाही खासदार पराभवापासून वाचवू शकले नाहीत. खासदार संजय मंडलिक यांची तर कोल्हापूर दक्षिणेत, कागलमध्ये व चंदगडमध्ये तीन वेगवेगळ््या भूमिका निभावल्या. ज्या इचलकरंजीने खासदार धैर्यशील माने यांना खासदार केले, त्याच शहराने भाजपच्या सुरेश हाळवणकर यांचा पराभव केला. पाच महिन्यांत हे परिवर्तन झाले. दोन्ही खासदारांनाही अवघ्या पाच महिन्यांत जनतेने दिलेला धोक्याचा इशाराच आहे.

Web Title: Gulal gives Congress a hand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.