स्थानिक स्वराज्य संस्था व पोलिसांकडून होणार संयुक्त कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:25 AM2021-02-23T04:25:22+5:302021-02-23T04:25:22+5:30
जळगाव : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस खात्याने संयुक्त कारवाई करावी ...
जळगाव : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस खात्याने संयुक्त कारवाई करावी व पोलिसांचे मनोधैय वाढविण्यासाठी दंडाच्या ५० टक्के रक्कम पोलीस खात्याकडे जमा करावी, असे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आळा बसण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, गर्दी टाळणे, उपाहारगृहे, बार, हॉटेल, रेस्टाॅरंट व तत्सम ठिकाणे, खासगी कोचिंग क्लासेस्, स्पर्धा परीक्षा केंद्र, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे व इतर तरतुदींचा भंग झाल्यास दंडात्मक कारवाई करण्यासाठी मनपा, नपा हद्दीमध्ये प्रभागनिहाय व ग्रामीण भागात गावनिहाय एक अधिकारी व दोन कर्मचारी यांचा समावेश असलेल्या स्वतंत्र पथकाची स्थापना करण्याचे आदेश १८ फेब्रुवारी रोजी देण्यात आले होते. यात पोलिसांनी सहकार्य करीत महत्त्वाची भूमिका बजावली असल्याने त्यांचे मनोधैर्य वाढविणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी राऊत यांनी म्हटले आहे.
त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावणे, थुंकणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे अशा प्रकारच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर स्थानिक स्वराज्य संस्था व संबंधित पोलीस विभागाने संयुक्तरीत्या कारवाई करावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात म्हटले आहे. या कारवाईत जमा होणाऱ्या दंडात्मक रकमेपैकी ५० टक्के रक्कम स्थानिक स्वराज्य संस्थांनी संबंधित पोलीस विभागास द्यावी व उर्वरित रक्कम स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या लेखाशीर्षाखाली जमा करावी, असे आदेशात म्हटले आहे.
यासोबतच पोलिसांनी स्वतंत्ररीत्या केलेल्या कारवाईत वसूल केलेल्या दंडाच्या रकमेपैकी ५० टक्के रक्कम संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेकडे जमा करावी व उर्वरित ५० टक्के रक्कम पोलीस विभागाच्या शासकीय लेखाशीर्षाखाली जमा करावी, असे आदेशात म्हटले आहे. यासाठी पावती पुस्तक स्थानिक स्वराज्य संस्थांनी उपलब्ध करून द्यावयाचे आहे.