ईश्वर चिठ्ठीची हॅट्ट्रिक; तिघांचा विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:19 AM2021-01-19T04:19:41+5:302021-01-19T04:19:41+5:30
जळगाव : तालुक्यात ४० ग्रामपंचायतींच्या मतमोजणीदरम्यान तीन ठिकाणी तेथील प्रत्येकी प्रतिस्पर्धी उमेदवारांना सारखीच मते मिळाल्याने काढण्यात आलेल्या ईश्वर चिठ्ठीने ...
जळगाव : तालुक्यात ४० ग्रामपंचायतींच्या मतमोजणीदरम्यान तीन ठिकाणी तेथील प्रत्येकी प्रतिस्पर्धी उमेदवारांना सारखीच मते मिळाल्याने काढण्यात आलेल्या ईश्वर चिठ्ठीने तीन जण ‘लकी’, तर तीन जण ‘अनलकी’ ठरले. या नशीबवान उमेदवारांमध्ये कुसुंबा खु. येथील अश्विनी वाल्मीक पाटील, वावडदे येथील कमलाकर आत्माराम पाटील व जवखेडा येथील राहुल शालिक पाटील यांचा समावेश आहे.
तालुक्यातील ४० ग्रामपंचायतींच्या मतमोजणीस सुरुवात झाल्यानंतर तीन ठिकाणी उमेदवारांना सारखे मते मिळाली. यामध्ये कुसुंबा खु. ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक एकमध्ये नामाप्र स्री राखीव या प्रवर्गातून उमेदवार असलेल्या अश्विनी वाल्मीक पाटील व स्वाती प्रवीण पाटील यांना प्रत्येकी १९० मते मिळाली. त्यावेळी ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली व त्यात अश्विनी या विजयी ठरल्या.
वावडदे ग्रामपंचायतच्या प्रभाग क्रमांक तीनमधील नामप्र प्रवर्गासाठी राखीव असलेल्या प्रभागातून कमलाकर आत्माराम पाटील व सागर विजय पाटील यांना प्रत्येकी १८६ अशी सारखी मते मिळाली. यात काढण्यात आलेल्या ईश्वर चिठ्ठीत कमलाकर आत्माराम पाटील हे विजयी ठरले.
जवखेडे ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक एकमध्ये सर्वसाधारण जागेवरील उमेदवार राहुल शालिक पाटील व शेखर चंदसिंह पाटील यांना प्रत्येकी १०३ मते मिळाली. त्यावेळी काढण्यात आलेल्या ईश्वर चिठ्ठीत राहुल शालिक पाटील हे विजयी ठरले.
बिनविरोध उमेदवारांचीही मतमोजणीनंतर घोषणा
तालुक्यात माघारीच्या दिवशी मोहाडी, डिकसाई या दोन्ही ग्रामपंचायती बिनविरोध ठरल्या होत्या. तसेच नशिराबाद येथे नगरपंचायतीच्या मागणीसाठी उमेदवारी दाखल केलेल्या उमेदवारांनी सामूहिक माघार घेतली होती. तेथे एकच उमेदवार रिंगणात होते. तेदेखील बिनविरोध ठरले. त्यांच्यासह इतर ठिकाणच्या बिनविरोध उमेदवारांना मतमोजणीनंतर विजयी म्हणून घोषित करण्यात आले.