भुसावळच्या माजी प्रभारी नगराध्यक्षा चेतना फलक यांना दोन वर्षांचा साधा कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2019 10:43 PM2019-10-02T22:43:15+5:302019-10-02T22:44:44+5:30

माजी प्रभारी नगराध्यक्षा तथा विठ्ठल रुक्माई पतसंस्थेच्या तत्कालीन चेअरमन चेतना संजय फलक यांच्यासह तत्कालीन दोन्ही व्यवस्थापकांनी ठेवीदाराच्या ठेवीची रक्कम १७ लाख ७७ हजार ४७ रुपये मुदतीत न दिल्यामुळे दोन वर्षे साधा कारावास व १० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.

Former Bhusawal city chief Chetna Falak faces two years' simple imprisonment | भुसावळच्या माजी प्रभारी नगराध्यक्षा चेतना फलक यांना दोन वर्षांचा साधा कारावास

भुसावळच्या माजी प्रभारी नगराध्यक्षा चेतना फलक यांना दोन वर्षांचा साधा कारावास

Next
ठळक मुद्देजळगाव येथील ग्राहक न्यायमंचचा निकालठेवीदारांचे पैसे परत न देणे भोवले

भुसावळ, जि.जळगाव : येथील माजी प्रभारी नगराध्यक्षा तथा विठ्ठल रुक्माई पतसंस्थेच्या तत्कालीन चेअरमन चेतना संजय फलक यांच्यासह तत्कालीन दोन्ही व्यवस्थापकांनी ठेवीदाराच्या ठेवीची रक्कम १७ लाख ७७ हजार ४७ रुपये मुदतीत न दिल्यामुळे दोन वर्षे साधा कारावास व १० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. हा आदेश जळगाव येथील ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचने सोमवारी दिला आहे. त्यामुळे शहरात पतसंस्था संचालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. अगोदरच संतोषीमाता पतसंस्थेचे चेअरमन वासुदेव इंगळे अद्यापही कारागृहात आहे. त्यात ग्राहक न्यायमंचाने दुसऱ्या संस्थेसंदर्भात दिलेल्या निकालामुळे पतसंस्थाचालकांना चांगलाच धक्का बसला आहे.
अशोक रामचंद्र भोगे (रा.विद्युत कॉलनी, प्लॉट नंबर नऊ, शासकीय इंजिनिअरिंग महाविद्यालय गेटजवळ, जळगाव) यांनी येथील विठ्ठल रुक्माई अर्बन को-आॅप क्रेडिट सोसायटीमध्ये १६ आॅगस्ट २००९ रोजी नऊ लाख ६८ हजार ४५० रुपये मुदत ठेवीसाठी ठेवले होते. त्यांच्या रकमेची मुदत १६ आॅगस्ट २०११ रोजी संपली. त्यावेळी त्यांना पतसंस्थेने ११ लाख ४२ हजार ७७१ रुपये देणे गरजेचे होते. संस्थेकडे मागणी करूनही त्यांना पैसे परत मिळाले नाही. त्यामुळे भोगे यांनी ग्राहक तक्रार निवारण मंचमध्ये तक्रार (अर्ज क्रमांक २८२/१६) १ फेब्रुवारी २०१७ रोजी याचिका दाखल केली. मात्र याचिकेतील सामनेवाले नगरपालिकेच्या माजी प्रभारी नगराध्यक्षा तथा विठ्ठल रुक्माई पतसंस्थेच्या तत्कालीन चेअरमन चेतना फलक, तत्कालीन व्यवस्थापक प्रमोद किसन चौधरी व व्यवस्थापक दिनेश कोलते यांनी २२ डिसेंबर २०१६ रोजी ग्राहक तक्रार आदेशाचे पालन केले नाही. त्यामुळे कलम २७ ग्राहक संरक्षण आदी नियमान्वये चौकशी अर्ज दाखल करण्यात आला. या आधारानुसार आरोपींना १ फेब्रुवारी २०१७ रोजी मंचच्या आदेश पूर्ततेकामी हजर राहण्यासाठी समन्स पाठवण्यात आले. मात्र या आदेशाचेही पालन केले नाही. त्याचप्रमाणे तक्रारदाराचे पैसे परत केल्याचे कुठेही दिसून आले नाही. त्यामुळे मुदतठेव २४ आॅक्टोबर २०१८ पर्यंत १७ लाख ७७ हजार ४६ रुपये त्यांच्या खातेवर दिसून आली, तर आरोपींनी मंचच्या कलम १२ अन्वये आदेशास स्थगिती घेतली नाही.
ग्राहक संरक्षण कायदा १९८६ चे कलम २७ अन्वये या प्रकरणात तीनही आरोपी शिक्षेस पात्र असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले. त्याचप्रमाणे ग्राहक तक्रार मंचमध्ये २२ डिसेंबर २०१६ रोजी अंमलबजावणी करण्यास कसूर केला. त्यामुळे तिन्ही आरोपींना दोन वर्षे साधा तुरुंगवास व १० हजार रुपये दंड ठेवण्यात आला आहे. दंड न भरल्यास आणखी वाढीव सहा महिने साधा तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागणार असल्याचे आदेशात नमूद केले आहे. हा आदेश ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच अध्यक्ष उमेश जावडेकर, पूनम मलिक व सुरेश जाधव यांनी दिला आहे.
दरम्यान, येथे १० वर्षांपूर्वी बहुतांशी पतसंस्थांनी पतसंस्था बंद करून ठेवीदारांच्या रकमा हडप केल्याचे प्रकरण चांगलेच गाजले आहे. अनेक ठेवीदार देशोधडीला लागले आहे. त्यामुळे हा निकाल ठेवीदारांसाठी दिलासादायक असून पतसंस्था चालकांमध्ये खळबळ उडाली आहे. अगोदरच संतोषीमाता पतसंस्थेचे चेअरमन वासुदेव आनंदा इंगळे हे वर्षभरापासून तुरुंगात आहेत. त्यातच विठ्ठल रुक्माई पतसंस्थेचे चेअरमन व दोन व्यवस्थापकांना ग्राहक मंचने जोरदार धक्का दिल्यामुळे ठेवीदारांना दिलासा मिळाला आहे.

वरिष्ठ न्यायालयात अपील करणार-फालक
दरम्यान, पतसंस्थेचे चेअरमन चेतना फलक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे पती संजय फालक यांनी वरिष्ठ न्यायालयात अपील करणार असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे वडिलांची ठेव मात्र मुलाच्या नावावर कर्ज आहे. त्यामुळे मुलाच्या नावावरील कर्जफेड करून देता येणार असल्याने तडजोड झाली असल्याचीही माहिती त्यांनी दिली.

Web Title: Former Bhusawal city chief Chetna Falak faces two years' simple imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.