पदे, ठेक्यांवरून मनपात सत्ताधारी भाजपमध्ये नाराजीनाट्य सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 11:57 AM2020-07-07T11:57:20+5:302020-07-07T12:01:21+5:30

गिरीश महाजन यांच्याकडे करणार तक्रार : ठराविक पदाधिकारी कारभार चालवित असल्याचा आरोप

Dissatisfaction started in the ruling BJP over posts and contracts | पदे, ठेक्यांवरून मनपात सत्ताधारी भाजपमध्ये नाराजीनाट्य सुरु

पदे, ठेक्यांवरून मनपात सत्ताधारी भाजपमध्ये नाराजीनाट्य सुरु

Next

जळगाव : मनपातील सत्ताधारी भाजपात अनेक गट-तट आहेत. मात्र, विविध मक्ते व प्रमुख पदांवरून सत्ताधाऱ्यांमधील नाराजीनाट्य आता चव्हाट्यावर आले आहे. काही नगरसेवक याबाबतीत आमदार गिरीश महाजन यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडणार आहेत.
ठराविक पदाधिकारीच मनपाचा कारभार चालवित असून, इतरांना मनपाच्या सर्व प्रक्रियेपासून डावलत असल्याने आता त्यांचा राजीनामा घ्यावा, अशीही तक्रार येत्या दोन दिवसात पक्षश्रेष्ठींकडे केली जाणार असल्याची माहिती भाजपच्या काही नगरसेवकांनी ‘लोकमत’ला दिली आहे.
दोन वर्षात मनपातील सत्ताधारी जितके चर्चेत राहिले, तितके अंतर्गत गटबाजी व नाराजी नाट्यासाठी चर्चेत राहिले आहेत. आता कोरोनाचे संकट उभे असतानाच पद व विविध मक्त्यांतील हिस्सेदारीवरून सत्ताधारी भाजप नगरसेवकांमुळे नाराजी वाढली आहे.
मनपातील पदांबाबत खदखद कायम
महापालिकेतील महापौर व स्थायी समिती सभापतीचे पद निश्चित केलेल्या वेळेप्रमाणे बदलण्यात आले असले तरी उपमहापौर, गटनेते, मनपा सभागृह नेते व चार स्वीकृत सदस्यांची पदे अद्याप कायम आहेत. त्यामुळे या पदांसाठी जे नगरसेवक इच्छुक होते, त्यांची नाराजी अजूनही कायम आहे. याबाबत आमदार सुरेश भोळे यांच्याकडेही काही नगरसेवकांनी तक्रार केली होती तर काहींनी याबाबत गिरीश महाजनांकडेही तक्रार केली होती. मात्र, पक्षश्रेष्ठींकडून कोणताही निर्णय न झाल्याने इच्छुकांमध्ये खदखद वाढली आहे.
विरोधकांना पुरविली जातेय माहिती
भाजपातील अंतर्गत वाढत जाणारी खदखद पाहता, नाराज गटाकडून विरोधकांना माहिती पुरविली जात आहे. तसेच अनेक बैठकांनादेखील काही नगरसेवकांकडून दांडी मारली जात आहे. यासह आधीच चार ते पाच गट भाजपात असताना आता नव्याने नाराज गट तयार होत आहे.

कामे न होत नसल्याने वाढली नाराजी
महापालिकेत भाजपाची सत्ता येवून आता दोन वर्षांचा काळ झाला आहे. मात्र, सत्ताधाऱ्यांनी आतापर्यंत शहराच्या दृष्टीने एकही मोठे काम न केल्याने अनेक नगरसेवकांना नागरिकांच्या नाराजीचा सामना करावा लागत आहे. त्यातच १०० कोटींचा निधी मिळूनही तो सत्ताधाºयांचा अंतर्गत गटबाजीमुळे खर्चदेखील करता आला नाही, त्यामुळे काहींनी थेट राजीनामा देण्याचा प्रस्ताव ठेवण्याची तयारी दर्शविली आहे. निधी असूनही काही पदाधिकाºयांचा फायद्यासाठी या निधीतून होणाºया कामांचे नियोजन करण्यात आले नाही. त्यामुळे सर्व कारभार आमदार गिरीश महाजनांनीच स्वत: वैयक्तिकरित्या मनपाच्या कारभाराकडे लक्ष घालावे, अशीही मागणी नगरसेवकांकडून केली जात आहे.

मक्त्यांमधील एकाधिकारशाही विरोधात नगरसेवक एकटवले
महापालिकेव्दारे होणारे विविध विकासकामे व विविध मक्ते याबाबत सत्ताधाºयांमधील ठराविक नगरसेवकांचीच एकाधिकारीशाही वाढत असल्याची माहिती एका ज्येष्ठ नगरसेवकाने ‘लोकमत’ ला दिली. मक्ते घेताना काही पदाधिकारीच आपला मनमानी कारभार चालवित असूून इतर नगरसेवकांना कोणत्याही मक्त्यात लाभ मिळत नसल्याने गटबाजी वाढली आहे.

सफाईचा मक्ता असो वा इतर मक्ता यामध्ये ठराविक पदाधिकाºयांचा हिस्सा आहे. त्यामुळे इतर कामांमध्ये इतरांना संधी मिळावी, अशी इच्छा काही नगरसेवकांची होती. मात्र ती मिळत नसल्याने आता थेट पक्षश्रेष्ठींकडे याबाबतची लेखी तक्रार नगरसेवकांकडून केली जाणार आहे. सफाईच्या ठेक्यावरुन अधिक खदखद वाढली असून, आता काही नगरसेवकांनी वॉटरग्रेस कंपनी पुन्हा आणण्यासाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.

Web Title: Dissatisfaction started in the ruling BJP over posts and contracts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.