परीक्षा तोंडावर; दहावी-बारावीचा अभ्यासक्रम पूर्ण कसा होणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:28 AM2021-01-18T04:28:18+5:302021-01-18T04:28:18+5:30
जालना : कोरोनामुळे कोलमडलेली शिक्षण व्यवस्थेचा गाडा रुळावर आणण्यासाठी ऑनलाईन शिक्षण प्रणालीचा अवलंब करण्याता आला. परंतु, अनेक विद्यार्थी विविध ...
जालना : कोरोनामुळे कोलमडलेली शिक्षण व्यवस्थेचा गाडा रुळावर आणण्यासाठी ऑनलाईन शिक्षण प्रणालीचा अवलंब करण्याता आला. परंतु, अनेक विद्यार्थी विविध कारणास्तव ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहिले. त्यात लॉकडाऊननंतर सुरू झालेले वर्ग आणि तोंडावर आलेली दहावी- बारावीची परीक्षा यामुळे शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण होणार कसा? आणि मुलांची परीक्षा जाणार कशी याची चिंता पालकांना लागली आहे.
कोरोनामुळे इतर व्यवस्थेसह शिक्षण व्यवस्थाही कोलमडून गेली आहे. लॉकडाऊनर शिथिलतेनंतर नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. परंतु, दहावी, बारावीची परीक्षा तोंडावर आलेली आहे. शिक्षकांनी मुलांना अधिकाधिक अभ्यासक्रम शिकविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र, प्रत्येक वर्षात शाळा सुरू राहण्याचा कालावधी आणि लॉकडाऊननंतर परीक्षेपूर्वी मोजक्याच कालावधीत सुरू राहणाऱ्या शाळा यामुळे अभ्यासक्रमासह परीक्षेची चिंता पालक, विद्यार्थ्यांना लागली आहे.
दहावीचा अभ्यासक्रम
दहावीचा अभ्यासक्रम गतवर्षी बदलण्यात आला आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र हे विषय दहावीच्या विद्यार्थ्यांना शिकविले जात आहेत. दहावीच्या सर्वच विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम नवीन आहे.
बारावी अभ्यासक्रम
बारावीतील कला, वाणिज्य, विज्ञान शाखांचा अभ्यास चालू वर्षीच बदलण्यात आला आहे. प्रत्येक शाखेतील विद्यार्थ्याला सहा विषय घ्यावे लागतात. या अभ्यासक्रमात २० टक्के अभ्यासक्रम नवीन आहे. ८० टक्के अभ्यासक्रम जुना आहे. विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रमाची अडचण होईल.
शासन निर्देशानुसार आम्ही सर्व प्रक्रिया राबवित आहोत. परीक्षेबाबतही शासन आदेश येईल त्याप्रमाणे कामकाज होईल. परंतु, अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शासनाने पूर्ण विद्यार्थी क्षमतेने महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी देणे गरजेचे आहे. किंवा परीक्षेतील अभ्यासक्रम काही प्रमाणात कमी करावा.
-शिवशंकर घुमरे, प्राचार्य, मत्स्योदरी महाविद्यालय, अंबड
कोरोना काळात शासन निर्देशानुसार विद्यार्थ्यांना शिक्षण दिले आहे. आता शाळा सुरू झाल्या आहेत. परंतु, कोरोनामुळे पूर्ण उपस्थिती नाही. त्यात शासनाने किती अभ्यासक्रम कमी केला हे निश्चित सांगितलेले नाही. शासनाने परीक्षेसाठी अभ्यासक्रम कमी करणे गरजेचे असून, त्याबाबतही स्पष्ट सूचना हव्यात.
- गोविंद जाधव, मुख्याध्यापक जिजामाता विद्यालय निमखेड खु.
ऑनलाईन शिक्षणापासून अनेक विद्यार्थी वंचित राहिले आहेत. आता शाळा सुरू झाल्या असून, आम्ही अभ्यासही करीत आहोत. कोरोनामुळे झालेले नुकसान पाहता परीक्षेचा अभ्यासक्रम कमी करावा.
- वरद फलके, तपोवन गोंदन
आम्हाला ऑनलाईन, ऑफलाईन शिक्षण मिळाले आहे. परंतु, कोरोनाचा परिणाम झाला आहे. त्यामुळे शासनाने परीक्षांचा कालावधी वाढवावा किंवा ५० टक्के अभ्यासक्रम कमी करावा.
- प्रिया शिंगरे, अंबड