‘वॉटर ग्रीड’सह प्रकल्पांची कामे पूर्ण करा : तज्ज्ञांचा सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 12:44 AM2019-08-12T00:44:55+5:302019-08-12T00:45:39+5:30

शासनाने मराठवाड्यातील रखडलेल्या प्रकल्पांची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, असा सूर जालना येथे रविवारी आयोजित वॉटर ग्रीड परिषदेत सहभागी तज्ज्ञांनी काढला.

Complete project tasks with 'water grid': expert tone | ‘वॉटर ग्रीड’सह प्रकल्पांची कामे पूर्ण करा : तज्ज्ञांचा सूर

‘वॉटर ग्रीड’सह प्रकल्पांची कामे पूर्ण करा : तज्ज्ञांचा सूर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : हजारो कोटी रूपयांचा वॉटर ग्रीड प्रकल्प राबविण्यात येत आहे. तत्पूर्वी शासनाने मराठवाड्यातील रखडलेल्या प्रकल्पांची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, असा सूर जालना येथे रविवारी आयोजित वॉटर ग्रीड परिषदेत सहभागी तज्ज्ञांनी काढला. मराठवाड्यातील सिंचनाचा अनुशेष शिल्लक असून, सिंचनाच्या प्रश्नावर तालुकानिहाय चर्चा व्हावी. वॉटर ग्रीडबाबतचे समज-गैरसमज दूर करावेत, अशी अपेक्षा कृषिभूषण विजय बोराडे यांनी अध्यक्षीय समारोपात व्यक्त केली.
मराठवाडा वॉटर ग्रीड परिषदेतर्फे जालना येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात रविवारी मराठवाडा पातळीवरील मराठवाडा वॉटर ग्रीड परिषद घेण्यात आली. कृषिभूषण विजय बोराडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित परिषदेस महाराष्ट्र सिंचन सहयोगाचे उपाध्यक्ष प्रा. बापू अडकिणे, वाल्मीचे माजी सहसंचालक डॉ. एस. बी. वराडे, पाणी प्रश्नाचे अभ्यासक राजेंद्र दाते-पाटील, राजन क्षीरसागर, मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे सदस्य शंकर नागरे, जलतज्ज्ञ प्रा. प्रदीप पुरंदरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना प्रा. पुरंदरे म्हणाले, मराठवाड्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी इस्त्राईलच्या मदतीने मराठवाडा वॉटर ग्रीड हा तब्बल २५ हजार कोटी रुपये किंमतीचा महत्वाकांक्षी प्रकल्प महाराष्ट्र शासनाने हाती घेतला आहे. वॉटर ग्रीडची देखभाल, दुरुस्ती व संरक्षण आणि जलशयातून होणारा अमर्याद उपसा हे कळीचे मुद्दे आहेत. जलयुक्तमुळे दुष्काळमुक्ती झाली असेल तर ग्रीड योजनेची गरज काय? असा सवाल उपस्थित करीत ग्रीडमुळे पाणी पुरवठा योजनांमध्ये होणारे बदल, पाणी पट्टीतील बदल लक्षात घेता महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची भूमिका कळीची ठरणार आहे. या ग्रीडबाबत शासनाने गांभीर्याने पुर्नविचार करणे गरजेचे आहे. टाटाबरोबर झालेले ब्रिटीशकालीन करार रद्द करुन वीज निर्मितीसाठी वापरले जाणारे पाणी भिमा खोऱ्यात आणि तेथून मराठवाड्यात आणण्याची गरज प्रा. पुरंदरे यांनी व्यक्त केली.
अध्यक्षीय समारोपात कृषीभूषण विजय बोराडे म्हणाले, मराठवाड्यातील सिंचनाचा अनुशेष शिल्लक आहे. सिंचनाच्या प्रश्नावर तालुकावार चर्चा होणे गरजेचे आहे. वॉटर ग्रीड विषयी समज, गैरसमज दूर करण्याची गरज आहे. शेतीचे, पिण्याचे पाणी उद्योगांकडे वळविले जात असून, सिंचन प्रश्नी शेतकऱ्यांनी संघटीत होणे काळाची गरज आहे. यावेळी मराठवाडा वॉटर ग्रीड परिषदेच्या स्मरणिकेचे प्रा. पुरंदरे यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.
प्रारंभी परिषदेचे संयोजक बी.वाय. कुलकर्णी, प्राचार्य डॉ. सुनंदा तिडके, प्राचार्य डॉ. राजकुमार म्हस्के, गोविंद आर्दड, अ‍ॅड. किशोर राऊत, सुधीर शिंदे, अनिल मिसाळ आदींनी मान्यवरांचे स्वागत केले. प्रास्ताविकात मुख्य संयोजक कॉ. अण्णा सावंत यांनी वॉटर ग्रीड परिषदेची भूमिका मांडली. सूत्रसंचालन शिवकुमार सोळंके यांनी तर अ‍ॅड. कैलास रत्नपारखे यांनी आभार मानले.
यावेळी द्वारकाभाऊ पाथ्रीकर, ज्ञानदेव पायगव्हाणे, भगवान काळे, डॉ. रमेश अग्रवाल, प्रा. नारायण बोराडे, देविदास जीगे, शिवाजी लकडे, दत्ता कदम, डॉ. आप्पासाहेब कदम, प्रा. बसवराज कोरे, डॉ. विजयकुमार कुमठेकर, डॉ. यशवंत सोनवणे, आर.आर. खडके, डॉ. रावसाहेब ढवळे, राम गायकवाड यांच्यासह शेतकरी तसेच अभ्यासक उपस्थित होते. या योजनेवर मराठवाड्यात प्रथम अशी जाहीर खुलीचर्चा झाल्याने नागरिकांना योजना कळणार आहे.
योजनेबाबत सकारात्मकता ठेवावी
मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे सदस्य शंकरराव नागरे म्हणाले, मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाबाबत सकारात्मक दृष्टीकोण ठेवावा. ही एक महत्वाकांक्षी योजना असून, शासनाने ही महत्वाकांक्षी योजना कार्यान्वीत करतांना लोकसहभागास प्राधान्य देऊन पुढील कार्यवाही करणे अपेक्षीत आहे.
तरच ही योजना फलदायी होण्याचे श्रेय शासनाला मिळेल. ही वॉटर ग्रीड योजना म्हणजे मराठवाड्यातील जनतेसाठी सुवर्णसंधी असल्याचे ते म्हणाले. तर वाल्मीचे माजी सहसंचालक डॉ. एस. बी. वराडे यांनी वॉटर ग्रीड प्रकल्प सकारात्मक दृष्टीने राबवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Web Title: Complete project tasks with 'water grid': expert tone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.