अखेर पाकिस्तान नरमला, भारताकडे विनवणी; प्रादेशिक सुरक्षेचा हवाला देत केली सर्वात मोठी मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 16:09 IST2026-03-03T16:09:01+5:302026-03-03T16:09:55+5:30
सीमेपलीकडून घुसखोरी अथवा दहशतवादी कृत्यांना खतपाणी द्यायचे ही पाकिस्तानची जुनी सवय आहे.

अखेर पाकिस्तान नरमला, भारताकडे विनवणी; प्रादेशिक सुरक्षेचा हवाला देत केली सर्वात मोठी मागणी
इस्लामाबाद - मध्य पूर्वेतील वाढता तणावात पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी भारताकडे विनवणी केली आहे. संघर्ष आणि सैन्य कारवाईपासून दूर होऊन प्रादेशिक सुरक्षेसाठी चर्चा करण्याच्या दिशेने पाऊल टाकणे हा एकमेव मार्ग आहे असं त्यांनी म्हटलं आहे. पाकिस्तानातील संसदेला संबोधित करताना झरदारी यांनी हे विधान केले. झरदारी यांच्या भाषणाचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मागील वर्षी काश्मीरच्या पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढून या दोन्ही देशांमधील अविश्वास आणखी वाढला. पाकिस्तानसोबत कुठल्याही नात्यावर भारताने स्पष्ट भूमिका घेतली आहे. दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही. प्रत्येकवेळी हल्ल्यानंतर शांततेचे आवाहन करायचे आणि त्यानंतर सीमेपलीकडून घुसखोरी अथवा दहशतवादी कृत्यांना खतपाणी द्यायचे ही पाकिस्तानची जुनी सवय आहे. पाकच्या या सवयीचा भारत कायम विरोध करत आला आहे.
खेळाच्या मैदानावरही मैत्री नाही...
इतकेच नाही तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील नात्यात कटुता केवळ युद्धाच्या मैदानावर मर्यादित नाही तर त्याचे पडसाद क्रिकेटच्या मैदानावरही जाणवतात. या दोन्ही देशात स्पर्धा समोरासमोर असो वा आंतरराष्ट्रीय टूर्नामेंट असेल, खेळाडूंच्या देहबोलीवरून प्रेक्षकांच्या घोषणाबाजीपर्यंत प्रत्येक ठिकाणी तणाव दिसतो. आशिया कपमध्ये भारताने पाकिस्तानी खेळाडूंसोबत हात मिळवला नाही आणि वर्ल्ड कपमध्येही पाक खेळाडूंनी भारतात येण्यास नकार दिला. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील नाते किती खराब आहे हे यावरून स्पष्ट दिसते.
झरदारी यांच्या विधानाच्या टायमिंगवर प्रश्न
झरदारी यांचं विधान राजनैतिकदृष्ट्या असले तरी त्याच्या टायमिंगवर अनेक प्रश्नचिन्ह आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर इतक्या दिवसांनीही भारतातील जनतेच्या भावना तीव्र आहेत. सुरक्षा यंत्रणा सीमापार दहशतवादी नेटवर्कच्या भूमिकेची चौकशी करत आहेत. जर पाकिस्तानला खरोखरच चर्चा हवी असेल तर त्याने त्याच्या भूमीवर वाढणाऱ्या दहशतवादी पायाभूत सुविधांविरुद्ध ठोस आणि अचूक कारवाई केली पाहिजे असं भारताने यापूर्वी असे म्हटले आहे. त्याशिवाय झरदारी यांच्या विधानाचा आणखी एक पैलू आहे.
Pakistani President Asif Ali Zardari says they are ready for negotiations with India.
— OsintTV 📺 (@OsintTV) March 2, 2026
Zardari says:
My message to them (India) is to move away from the war theater to meaningful negotiation tables, because that is the only path for regional security. pic.twitter.com/Kfh0aDSCy7
पाकिस्तानला अनेक आघाड्यांनी घेरले
झरदारी यांचे विधान आणखी एका दृष्टीने पाहिले जाते. ज्यात पाकिस्तान सध्या अनेक मोर्च्यावर युद्ध करत आहे. एकीकडे अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध सुरू आहे. दुसरीकडे बलूच बंडखोरही पाकिस्तानी सैन्याला टार्गेट करत आहेत. त्यात इराण युद्धाने पाकिस्तानची चिंता वाढवली आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सचे कमांडर हुसैन नेतान यांनी जो दावा केला आहे त्यामुळे पाकिस्तानची झोप उडाली आहे. अमेरिकेने इराणवरील हल्ल्यासाठी पाकिस्तानी एअरबेसचा वापर केला असा दावा त्यांनी केला. त्याशिवाय हा दावा जर खरा सिद्ध झाला तर पाकिस्तानला त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल असा इशाराही इराणी कमांडरने दिला आहे. या स्थितीत भारताला चर्चेसाठी विनवणी करणे पाकिस्तानची मजबुरी झाली आहे. एकाच वेळी इतक्या आघाड्यांवर लढण्याची पाकिस्तानची क्षमता नाही हे यातून स्पष्ट होते.