विजयी सलामीनंतर भारतापुढे बेल्जियमचे कडवे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 04:23 AM2018-12-02T04:23:31+5:302018-12-02T04:23:35+5:30

हॉकी विश्वचषकात शानदार सुरुवात करणाऱ्या भारताला उद्या रविवारी (दि. २) जगात तिस-या स्थानी असलेल्या बेल्जियमकडून कडवे आव्हान मिळणार आहे.

Belgian challenge for India after victory | विजयी सलामीनंतर भारतापुढे बेल्जियमचे कडवे आव्हान

विजयी सलामीनंतर भारतापुढे बेल्जियमचे कडवे आव्हान

googlenewsNext

भुवनेश्वर : हॉकी विश्वचषकात शानदार सुरुवात करणाऱ्या भारताला उद्या रविवारी (दि. २) जगात तिस-या स्थानी असलेल्या बेल्जियमकडून कडवे आव्हान मिळणार आहे. भारताने हा सामना जिंकल्यास स्पर्धेची उपांत्य फेरी निश्चित होणार आहे.
गेल्या ४३ वर्षांत पहिल्यांदा विश्वचषकात पदक विजयाचा प्रबळ दावेदार असलेल्या भारताने १६ संघांच्या विश्वचषकात शानदार सुरुवात करीत द. आफ्रिकेला ५-० ने धूळ चारली होती. रिओ आॅलिम्पिकचा रौप्यविजेता बेल्जियमने कॅनडाचा २-१ ने पराभव केला खरा, पण त्यांचा खेळ लौकिकाला साजेसा नव्हता.
आठ वेळेचा आॅलिम्पिक चॅम्पियन भारत केवळ १९७५ मध्ये विश्वचषकाचा विजेता ठरला होता. भारताने द. आफ्रिकेविरुद्ध आक्रमक खेळ केला. हीच लय कायम राखावी लागेल. खरे तर सातत्याचा अभाव भारतीय हॉकीची मूळ समस्या आहे. बेल्जियमवर विजय नोंदविण्यासाठी प्रत्येक आघाडीवर सरस कामगिरी करावी लागणार आहे. द. आफ्रिकेविरुद्ध मनदीपसिंग, सिमरनजितसिंग, आकाशदीप आणि ललित उपाध्याय यांच्या आक्रमक फळीने चोख कामगिरी बजावली. मनप्रीतच्या नेतृत्वात मधल्या आणि बचावफळीने स्वत:ची जबाबदारी पार पाडली, तर गोलकीपर श्रीजेशने प्रभावी कामगिरीसह हल्ले शिताफीने परतवून लावले.
भारत आणि बेल्जियम गेल्या पाच वर्षांत १९ वेळा परस्परांविरुद्ध खेळले. त्यातील १३ सामने बेल्जियमने जिंकले, तर एक सामना अनिर्णीत राहिला. उभय संघांत नेदरलॅन्डमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीत झालेला सामनादेखील अनिर्णीत राहिला होता. उभय संघांसाठी पेनल्टी कॉर्नर मोठी डोकेदुखी आहे. द. आफ्रिकेविरुद्ध भारताने पाचपैकी एक पेनल्टीवर गोल केला. बेल्जियमने कॅनडाविरुद्ध दोन कॉर्नर गमाविले होते.
मुख्य कोच हरेंद्रसिंग पेनल्टीवर थेट गोल होऊ न शकल्याबद्दल नाराज नाहीत, ते म्हणाले, ‘आमच्या खेळाडूंनी फिल्ड गोल केले. पेनल्टीवर गोल झाले असते तर अधिक आनंद झाला असता.’ मागील एका दशकात बेल्जियमने एकही मोठे जेतेपद पटकाविले नाही, तरीही हा संघ अव्वल संघांच्या पंक्तीत कायम आहे. यावर कोच शेन मॅकलियॉड म्हणाले, ‘भारताविरुद्धचा सामना कुठल्याही स्थितीत जिंकायचा आहे.
याशिवाय गोलसरासरीदेखील वाढवायची आहे.’ (वृत्तसंस्था)
>बेल्जियमविरुद्धची लढत महत्त्वाची : हरेंद्र
पुरुष हॉकी विश्वकप स्पर्धेत रविवारी बेल्जियमविरुद्ध खेळली जाणारी लढत यजमान संघासाठी जवळजवळ उपउपांत्यपूर्व फेरीप्रमाणे आहे, असे मत भारतीय हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांनी व्यक्त केले. भारताचा समावेश असलेल्या ‘क’गटात विद्यमान आॅलिम्पिक रौप्यपदकविजेता बेल्जियम, दक्षिण आफ्रिका आणि कॅनडा हे संघ आहेत. साखळी फेरीअखेर गुणतालिकेतील अव्वल संघ थेट बाद फेरीसाठी पात्र ठरेल.
भारताने सलामी लढतीत दक्षिण आफ्रिकेचा ५-० ने पराभव केला आणि बेल्जियमने कॅनडाविरुद्ध २-१ ने सरशी साधली. यजमान संघाला उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी आणि क्रॉस-ओव्हर टाळण्यासाठी बेल्जियमविरुद्ध विजयाची आवश्यकता आहे.
स्पर्धेचे स्वरुप बघता चारही गटांत अव्वल स्थान पटकावणारे संघ थेट उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरतील, तर दुसºया व तिसºया स्थानावरील संघांना अंतिम ८ मध्ये स्थान मिळवण्यासाठी क्रॉस-ओव्हरच्या लढती खेळाव्या लागतील.
शनिवारी सामन्याच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना हरेंद्र म्हणाले, ‘मला कुठले दडपण जाणवत नाही. जर तुम्ही या दबावाचा आनंद घेतला तर तुम्हाला यश मिळवता येईल. रविवारी आमची प्री-क्वार्टर फायनलची लढत आहे. जर आम्हाला थेट उपांत्यपूर्व फेरी गाठायची असेल तर आजच्या लढतीत विजय मिळवावाच लागेल.’
वर्ष २०१३ नंतर भारताची बेल्जियमविरुद्ध कामगिरी चांगली झालेली नाही. भारताने पाच सामने जिंकले आहेत, तर १३ सामन्यांत भारताला पराभव स्वीकारावा लागला आहे. एक सामना बरोबरीत संपला होता. बेल्जियमकडून मिळणाºया आव्हानाबाबत विचारले असता हरेंद्र म्हणाले, ‘भारताला विजय मिळवण्यासाठी पूर्ण ताकदीने खेळ करावा लागेल.’

Web Title: Belgian challenge for India after victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.