डिझेलचे वाढल्याने ट्रॅक्टर मशागतीचे दरही वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:30 AM2021-05-12T04:30:50+5:302021-05-12T04:30:50+5:30
हिंगोली : पेट्रोल, डिझेलचे दर कमी होण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र असून, डिझेलवाढीमुळे ट्रॅक्टर मशागतीचे दरही वाढले आहेत. खरीप ...
हिंगोली : पेट्रोल, डिझेलचे दर कमी होण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र असून, डिझेलवाढीमुळे ट्रॅक्टर मशागतीचे दरही वाढले आहेत. खरीप हंगाम जवळ आल्याने मशागतीच्या कामाला वेग आला आहे. दरवाढीचा फटका मात्र शेतकऱ्यांना बसत आहे.
मागील सहा महिन्यांपासून पेट्रोल, डिझेलचे दर सतत वाढत आहेत. पेट्रोल शतकाच्या जवळ पोहचले असून, डिझेलची ही वाटचाल शतकाकडे चालू आहे. सततच्या पेट्रोल, डिझेल दरवाढीचा फटका मात्र सर्वसामान्यांना बसत आहे. आता खरीप हंगाम जवळ आला असून, शेतकरी खरीपपूर्व मशागतीच्या कामात व्यस्त आहे. अनेक शेतकरी ट्रॅक्टरच्या साहाय्याने मशागत करण्याला पसंती देत असले तरी ट्रॅक्टरमालकाने मशागतीचे दर वाढविल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. सध्या पेट्रोल ९९.३९ रुपये प्रति लिटर, तर डिझेल ८९.३७ रुपये प्रतिलिटर झाले आहे. डिझेल दरवाढीमुळे पूर्वीच्या दरात ट्रॅक्टर मशागत करणे परवडत नसल्याचे ट्रॅक्टरमालक पांडूरंग करंडे यांनी सांगितले. त्यामुळे नांगरणी, रोटावेटर, पंजी, नऊ फणी, पेरणीचे दरही गतवर्षीपेक्षा वाढविले आहेत. गतवर्षी नांगरणीचे प्रति एकरी दर १२०० रुपये घेतले जात होते. आता १८०० ते १९०० रुपये घेतले जात आहेत. रोटावेटर ६०० रुपये होते. ते आता १००० हजार रुपये घेतले जात असल्याचे ट्रॅक्टरमालक चंद्रमुनी पाईकराव यांनी सांगितले. ट्रॅक्टर मशागतीचे दर परवडत नसल्याने अनेक शेतकरी बैलजोडीच्या साहाय्याने मशागत करणे पसंत करीत आहेत. ऐनवेळी पेरणी तेवढी ट्रॅक्टरच्या सहाय्याने करण्याचे नियोजन केले आहे.
ट्रॅक्टर मशागतीचे दर (प्रति एकरी)
वर्ष २०२० २०२१
नांगरणी १२०० १९००
रोटावेटर ६०० १२००
पंजी ८०० १२००
फणकटी ७०० ९००
पेरणी ७०० १००० (प्रति बॅग)
खत, बियाणे नंतर मशागतीच्या दराने कंबरडे मोडले
मागील काही वर्षांपासून शेतकऱ्यांवरील संकटाची मालिका कमी होत नसल्याचे दिसत आहे. यावर्षी सोयाबीन, तूर, मूग, उडीद आदी पिके हातची गेली आहेत. यातून पेरणीचा खर्चही निघाला नाही. त्यात पेरणीपूर्व मशागतीचे दर वाढल्याने खर्चही वाढला आहे. पेरणीपर्यंतचा खर्च पाच हजारांच्या घरात जात होता. आता यामध्ये वाढ होणार असल्याने पेरणीचे आर्थिक नियोजन कोलमडणार असल्याचे शेतकरी गणेश साखरे यांनी सांगितले.