टाळेबंदीमुळे हातावर पोट असणाऱ्यांचे होताहेत हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:57 AM2021-03-04T04:57:15+5:302021-03-04T04:57:15+5:30
हिंगोली: जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सात दिवसांची टाळेबंदी लागू केली आहे. परंतु, या ...
हिंगोली: जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सात दिवसांची टाळेबंदी लागू केली आहे. परंतु, या टाळेबंदीचा हातावर पोट असणाऱ्या मजुरांना चांगलाच फटका बसला असून अर्धपोटी निद्रा घेण्याची वेळ त्यांच्यावर पाच महिन्यांनंतर पुन्हा आली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने सुरुवातीला २४ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सायंकाळी सात ते सकाळी सात अशी संचारबंदी घोषित केली. तरीही काही नागरिकांचे विनामास्क फिरणे बंद झाले नाही. कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी जयवंशी यांनी १ मार्चपासून सात दिवसांची टाळेबंदी जाहीर केली. याचा फटका मात्र हातावर पोट असणाऱ्या हातगाडे, सायकल रिक्षाचालकांना बसल्याचे पहायला मिळत आहे. शहरातील गांधी चौक, इंदिरा चौक, महावीर चौक ही तीन ठिकाणे मजुरांना मजुरी देणारे आहेत. परंतु, गत तीन दिवसांपासून टाळेबंदी असल्यामुळे मजुरांचे गाडे हे लोकांना अटक करण्यासाठी उपयोगात आणले गेले आहेत.
गतवर्षी पाच महिने लॉकडाऊनमुळे हाताला काम मिळाले नाही. उपासमार होऊ नये म्हणून शासनाने मोफत धान्य दिले. परंतु, ते धान्य काही दिवसांतच संपले. पुन्हा उपासमार सुरू झाली.
नोव्हेंबर २०२० पासून लाॅकडाऊन उठले. सर्वत्र व्यवहार सुरू झाला. कसातरी कुटुंबाच्या पोटापुरता रोजगार मिळू लागला. परंतु, आजमितीस काही लोकांच्या चुकांमुळे परत अर्धपोटी निद्रा घेण्याची वेळ आली आहे.
टाळेबंदीला आमचा विरोध नाही
कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाने सात दिवसांची टाळेबंदी केली आहे. जिल्हा प्रशासनाने केलेल्या टाळेबंदीला आम्हा गरिबांचा विरोध नाही, पण आमचे पोट हातगाड्यावर, सायकलरिक्षावर, बैलगाडीवर आहे. रोजमजुरी केली तरच आम्हाला कुटुंबाचा गाडा हाकता येईल. सद्य:स्थितीत दोन दिवसांपासून आम्ही अर्धपोटी निद्रा घेत आहोत. जिल्हा प्रशासनाने परिस्थिती लक्षात घेऊन हातावर पोट असणाऱ्या मजुरांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी बबन शेवाळे, फिरोज पठाण, राहुल शेळके, सुभाष शेळके, शेख शम्मू, रोहित सोनाळे, शेख इस्माईल, कन्हैया यादव या मजुरांनी केली आहे.