जुन्या-नव्या गाण्यांच्या तालावर रोवणीला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 05:00 AM2021-07-28T05:00:00+5:302021-07-28T05:00:27+5:30
प्रौढ आणि म्हाताऱ्या महिला पारंपरिक गाणी आपल्या ताला-सुरात गातात. त्यांच्या गाण्यांमध्ये अर्थ व बोध असतो. गीताच्या स्वरूपात दंतकथा लपलेली असते. पारंपरिक जुन्या गाण्यांमध्ये गोडवा असून, मुलीच्या माहेरची व सासरची रुढी परंपरांचा उल्लेख असतो. मुलीला दिलेली शिकवण लपलेली असते. पहाटे उठून स्वयंपाक करणे, शिदोरी घेऊन जाणे व रोवणा संपला की माहेरी जाते. या गोष्टी त्यांच्या पारंपरिक गीतात समाविष्ट असतात.
विजय मानकर
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : यंदा पावसाने मधात दडी मारल्याने भात रोवणीला उशिरा सुरुवात झाली असून, मागील तीन-चार दिवसांपासून येत असलेल्या पावसामुळे जवळपास सर्वत्र ठिकाणी भात रोवणीला वेेग आला आहे. रोवणीच्या कामात वाटू नये म्हणून मनोरंजन म्हणून जुन्या-नव्या गाण्यांच्या तालावर रोवणी करताना मजूर (महिला शेतकरी) प्रत्येक शेतावर दिसून येत आहेत.
पूर्व विदर्भात गोंदिया, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये संपूर्ण क्षेत्र भात लागवडीचे असून, या भागातील शेतकऱ्यांना वेळेवर भात रोवणी व्हावी, यासाठी नियोजन करावे लागते. वर्षभराची कमाई भात रोवणीमध्ये दडलेली असून, शेतकरी कुटुंब महिनाभरापूर्वीपासून तयारीला लागत असतो. ८ जूनला मृग नक्षत्र लागताच धान पेरणीची तयारी, त्यानंतर पऱ्हे टाकून झाल्यानंतर एकीकडे नर्सरीची देखभाल तर दुसरीकडे शेतीला नांगरणी करण्याची कामे करतात. आधी सर्वत्र बैल नांगराने शेती वाहण्याचे कार्य केले जात असायचे; पण आता ट्रॅक्टरने नांगरणी व चिखलणी केली जाते. आजही अनेक छोटे शेतकरी बैल नांगराचा उपयोग करीत आहेत.
यंदा मृग नक्षत्रात थोडाफार पाऊस आला; परंतु ऐन रोवणीची वेळ येताच पावसाने दडी मारली. जुलै महिन्यात वेळेवर पाऊस पडला तर सर्वत्र शेतीमध्ये रोवणीचे काम सुरू होते. एकीकडे नांगरणी तर दुसरीकडे पऱ्हे काढणे आणि सोबतच गाण्यांच्या तालावर रोवणी करताना प्रौढ महिला व युवा तरुणी सहभागी होतात.
प्रौढ आणि म्हाताऱ्या महिला पारंपरिक गाणी आपल्या ताला-सुरात गातात. त्यांच्या गाण्यांमध्ये अर्थ व बोध असतो. गीताच्या स्वरूपात दंतकथा लपलेली असते. पारंपरिक जुन्या गाण्यांमध्ये गोडवा असून, मुलीच्या माहेरची व सासरची रुढी परंपरांचा उल्लेख असतो.
मुलीला दिलेली शिकवण लपलेली असते. पहाटे उठून स्वयंपाक करणे, शिदोरी घेऊन जाणे व रोवणा संपला की माहेरी जाते. या गोष्टी त्यांच्या पारंपरिक गीतात समाविष्ट असतात.
मोऱ्या झाला कालबाह्य
- शेतात काम करीत असताना शेतकऱ्यांच्या कुटुंबाला पावसापासून सुरक्षित राहण्यासाठी आधी मोऱ्या पांघरुन कामे करावी लागत असत. रोवण्या रोवणाऱ्या महिलांना दिवसभर चिखलात खपून राहावे लागत असून, पावसापासून वाचून राहण्यासाठी माहूर पानाच्या आच्छादान असलेल्या मोऱ्या उबदार वाटायच्या; परंतु आता उबदार माहुरपानाचा मोऱ्या कालबाह्य झाला असून, कमरेला प्लास्टिक बांधून रोवणी करतात. पाऊस आला की प्लास्टिकची पांघरून रोवणी करायची नाही तर मोकळे होऊन उत्साहात भात लागवड करायची. दरम्यान म्हाताऱ्या महिलांची गाणी संपली की तरुण मुली नव्या युगाची गीते गातांना रोवणी करताना दिसतात.