उमेदवारी अर्जाचा दुसरा दिवसही निरंक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2021 05:00 AM2021-12-03T05:00:00+5:302021-12-03T05:00:26+5:30
जिल्हा परिषदेच्या ५३, पंचायत समितीच्या १०६ आणि नगरपंचायतच्या ५१ जागांसाठी येत्या २१ डिसेंबरला निवडणूक होणार आहे. जि.प. व पं.स.क़रिता उमेदवारी अर्ज दाखल करण्याची ६ डिसेंबर तर नगरपंचायतसाठी ७ डिसेंबर ही शेवटची तारीख आहे. बुधवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी गुरुवारी दुसऱ्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या निरंक होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी बुधवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नव्हता तर गुरुवारी (दि. २) दुसऱ्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या निरंक होती. त्यामुळे शेवटच्या दोन दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषदेच्या ५३, पंचायत समितीच्या १०६ आणि नगरपंचायतच्या ५१ जागांसाठी येत्या २१ डिसेंबरला निवडणूक होणार आहे. जि.प. व पं.स.क़रिता उमेदवारी अर्ज दाखल करण्याची ६ डिसेंबर तर नगरपंचायतसाठी ७ डिसेंबर ही शेवटची तारीख आहे. बुधवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी गुरुवारी दुसऱ्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या निरंक होती. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अद्यापही उमेदवार वेट ॲण्ड वॉचच्या भूमिकेत असल्याचे चित्र आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना या प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार निश्चित झालेले नाही. सध्या मुलाखतीचे सत्र सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस गुरुवारी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या तर काँग्रेस मंगळवारी मात्र भाजपने अद्यापही मुलाखतीची तारीख निश्चित केलेली नाही. तर सुरुवातीलाच उमेदवारी जाहीर केली तर बंडखोरीची शक्यता अधिक असते. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी जपून पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. सर्व जण आधी कोण उमेदवारांची यादी जाहीर करतो, त्यानंतर त्या तुलनेत आपल्या पक्षाचा तगडा उमेदवार उतरवायचा या तयारीत आहेत. त्यामुळेच उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यास विलंब केला जात आहे.
निवडणूक पुन्हा लांबणीवरची चर्चा
ओबीसी आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल आहे. या याचिकेवर काय निर्णय येतो त्यावर पुढील भविष्य ठरणार आहे. राज्य निवडणूक आयोगानेसुद्धा त्यासंबंधीची सूचना आधीच केली आहे. मात्र काही जण या विषयाला वेगळा रंग देत निवडणूक लांबणीवर गेल्याची अफवा पसरवीत आहेत.
वरिष्ठ नेते फिरविणार याद्यांवर हात
- सर्वच राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यक्षांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या याद्या तयार केल्या आहेत. यापैकी काही उमेदवारांच्या मुलाखती झाल्या असून काहींना तुमचे नाव फायनल असून तुम्ही तयारीला लागा, असा मेसेज देण्यात आला आहे. पण या याद्यांवर पक्षाचे वरिष्ठ नेते अंतिम हात फिरविणार असून त्यानंतरच या याद्या फायनल केल्या जाणाऱ्या आहेत.
उमेदवारीपूर्वीच लक्ष असू द्या
- अद्यापही जिल्हा परिषद व पंचायत, नगरपंचायतसाठी एकाही उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. मात्र उमेदवारी आपल्यालाच मिळणार अशी आशा बाळगून त्यांनी आपल्या मतदारसंघातील उमेदवारांच्या गाठीभेटी घेणे सुरु केले आहे. त्यामुळे अनेक संभाव्य उमेदवार सध्या भाऊ लक्ष असू द्या म्हणत रामराम घेत असल्याचे चित्र जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषद क्षेत्रात सध्या पाहयला मिळत आहे.