१५३६ शाळा झाल्या तंबाखू मुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 05:00 AM2020-01-28T05:00:00+5:302020-01-28T05:00:15+5:30

धुम्रपान, तंबाखू सेवन व मद्यपान यासारख्या घातक सवयी आरोग्यास बिघडवितात. शाळेत जाणाऱ्या १५ टक्के कुमारवयीन मुलांना तंबाखूचे व्यसन असल्याचे वास्तव पुढे आल्याने शाळाच तंबाखू मुक्त करण्याचा उपक्रम शासनाकडून राबविला जात आहे.

1536 Schools become tobacco free | १५३६ शाळा झाल्या तंबाखू मुक्त

१५३६ शाळा झाल्या तंबाखू मुक्त

googlenewsNext
ठळक मुद्दे५० शाळांची नोंदणी रद्द : १५ टक्के कुमारवयीन मुलांना तंबाखूचे व्यसन

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : व्यक्तीमत्त्व विकासात शारीरिक आरोग्य अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्या शरीरातील विविध इंद्रिय संस्था सुरळीतपणे कार्य करतात तेव्हा आपले आरोग्य चांगले आहे असे आपण म्हणतो. परंतु धुम्रपान, तंबाखू सेवन व मद्यपान यासारख्या घातक सवयी आरोग्यास बिघडवितात. शाळेत जाणाऱ्या १५ टक्के कुमारवयीन मुलांना तंबाखूचे व्यसन असल्याचे वास्तव पुढे आल्याने शाळाच तंबाखू मुक्त करण्याचा उपक्रम शासनाकडून राबविला जात आहे. यांतर्गत, गोंदिया जिल्ह्यातील १६६६ पैकी १५३६ शाळा तंबाखू मुक्त झाल्या आहेत.
गोंदिया जिल्ह्यातील १६६६ शाळा तंबाखू मुक्त करण्याचा माणस शिक्षण विभागाचा आहे.या तंबाखू मुक्त शाळांसाठी शासनाने ११ निकष ठेवले आहेत. त्या निकषांची पुर्तता करून त्याची माहिती अ‍ॅपवर अपलोड करून आपल्या शाळेला तंबाखू मुक्त शाळा घोषीत करण्याच्या स्पर्धेत या सर्व शाळा आहेत. जिल्ह्यातील १६६६ शाळांपैकी १५३६ शाळा तंबाखू मुक्त झाल्या आहेत. आमगाव तालुक्यातील १५४ शाळांपैकी १५० शाळा तंबाखुमुक्त झाल्या आहेत. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील २१० शाळांपैकी १८७ शाळा तंबाखू मुक्त झाल्या आहेत.देवरी तालुक्यातील २०८ शाळांपैकी २०६ शाळा तंबाखू मुक्त झाल्या आहेत.
गोंदिया तालुक्यातील ४१५ शाळांपैकी ३५६ शाळा तंबाखू मुक्त झाल्या आहेत. गोरेगाव तालुक्यातील १५८ शाळांपैकी १४२ शाळा तंबाखू मुक्त झाल्या आहेत. सडक-अर्जुनी तालुक्यातील १६७ शाळांपैकी १६३ शाळा तंबाखू मुक्त झाल्या आहेत. सालेकसा तालुक्यातील १५२ शाळांपैकी १३८ शाळा तंबाखू मुक्त झाल्या आहेत. तिरोडा तालुक्यातील २०२ शाळांपैकी १९४ शाळा तंबाखू मुक्त झाल्या आहेत. गोंदिया जिल्ह्यातील १६६६ शाळांपैकी १५३६ शाळा तंबाखू मुक्त झाल्या आहेत.दरवर्षी जगात जवळ-जवळ ६४ लाख लोक तंबाखू मुळे मरण पावतात.सन २०३० पर्यंत जगात तंबाखूने मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या वर्षाकाठी ८० लाख होणार आहे. भारतात दररोज दोन हजार ५०० लोकांचा तंबाखूने मृत्यू होतो. वर्षाकाठी १० लाखांहून अधिक लोक तंबाखूने एकट्या भारतात मृत्यूमुखी पावतात.
तंबाखूमुळे होणाºया तोंडाच्या कर्करोगाचे सर्वाधीक रूग्ण भारतात आहेत. इंटरनॅशनल एजंसी फॉर रिसर्च आॅन कॅन्सर आणि जागतिक आरोग्य संघटनेनुसार धुम्रपानात चार हजारांहून अधिक रसायन असल्याचे सांगण्यात आले.
धुम्रपानात ८० आणि धुम्ररहित तंबाखू पदार्थात २८ कर्कजन्य रसायने असतात. कोणताही प्राणी तंबाखूची पाने खात नाही. सापही तंबाखूच्या शेतात जात नाही. तरीही सर्वात सुज्ञ समजला जाणारा मनुष्य तंबाखूचे सेवन करून स्वत:चेच जीवन नरकमय बनवित आहे. या तंबाखूच्या व्यसनापासून उद्याची पिढी म्हणजे किशोरवयीन मुले व शिक्षकांना यापासून दूर ठेवण्यासाठी शासनाने शाळेत आता तंबाखू मुक्त शाळा अभियान राबविणे सुरू केले आहे.या अभियानाला यशस्वी करण्यासाठी गोंदिया जिल्ह्याचा संपूर्ण शिक्षण विभाग कामाला लागला आहे.

उपाय तंबाखू सोडण्याचे
तंबाखू सोडण्याचा विचार करणाऱ्या व्यक्तींनी तंबाखू सोडण्याच्या तारखेची घोषणा आपल्या कुटुंबीय, नातलग किंवा मित्रांसमोर करावी, तंबाखूसाठी प्रवृत्त करतील अशा लोकांपासून दूर रहावे, तंबाखू सेवनाची इच्छा झाल्यास १ ते १०० अंक मोजावे, धावा किंवा दोरीवरील उड्या घ्याव्या, प्राणायाम, कुरमुरे, चणे, शेंगदाणे, बडीशेप या पदार्थाचे सेवन करावे. तंबाखू सेवनाने शरीरात अस्तीत्वात असणारी विषारी रसायने शरीरातून बाहेर टाकण्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्यावे. तसेच योग्य मित्रांसोबत आपले विचार व भावना शेअर कराव्यात.

तंबाखूमुळे होणारे दुष्परिणाम
तंबाखू सेवनामुळे अनेक दुष्परिणाम होतात. केसांना दुर्गंध येते. तोंडाची दुर्गंधी, दात सडतात, हिरड्यांना इजा होऊन दात निकामी होतात. त्यांची मजबूती नष्ट होते. दातांवर चॉकलेटी-पिवळे डाग पडतात. वास घेण्याची क्षमता कमी होते.चेहºयावर सुरकुत्या पडतात. शरीरात अशक्तपणा जाणवतो.हाडे ठिसूळ होतात. रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ लागते. डोळ्यांमध्ये जळजळ होत डोळ्यातून पाणी येते. निकोटीनच्या प्रभावामुळे मेंदूच्या कार्यावर विपरीत परिणाम होतो. विचार करण्याची क्षमता कमी होते. चित्त एकाग्र करणे कठिण जाते. तंबाखूमुळे तोंड, स्वरयंत्र, फुप्फुस, गळा, अन्ननलीका, मूत्राशय, मूत्रपिंड, नाक, पोट, गर्भाशय व मुखाचा कॅन्सर होतो. गँगरिन, क्षयरोग, दमा, हृदयविकार, उच्च रक्तदाब, लकवा, मधूमेह, मोतीबिंदू होते. पुरूषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी होत जाते व पुरूष नपंूसक बनतो.ज्या स्त्रिया तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करतात त्यांची प्रजनन क्षमता कमी होते व त्यांना वंधत्व येते.
५० शाळांची नोंदणी रद्द
आपली शाळा तंखाखूमुक्त शाळा झाली म्हणून स्वयं माहिती अ‍ॅपमध्ये टाकावी लागते.जिल्ह्यातील १६६६ शाळांमपैकी १६०१ शाळांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी १५३६ शाळा तंबाखुमुक्त झाल्या आहेत. ५० शाळांची नोंदणी रद्द झाली आहे. त्यात अर्जुनी-मोरगावच्या ४ शाळा, गोंदियाच्या २३ शाळा, गोरेगावच्या १३ शाळा, सालेकसाच्या ६ शाळा, तिरोडाच्या ४ शाळांचा समावेश आहे.

Web Title: 1536 Schools become tobacco free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.