यवतमाळच्या कारागिरांनी घेतला जि.प. शाळेत आश्रय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 05:00 AM2020-03-31T05:00:00+5:302020-03-31T05:00:59+5:30
यवतमाळ जिल्ह्याच्या पिंपळशेंडा व पांढरकवडा येथील चार कुटुंब मागील सहा महिन्यांपासून रोजगारासाठी देलनवाडी परिसरात आले आहेत. गॅस, शेगडी व कुकर दुरूस्तीचे काम करून हे कारागिर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असतात. याच कामासाठी ते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आरमोरी तालुक्यात आले. मात्र कोरोनारूपी संकटामुळे त्यांचा व्यवसाय थांबला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : यवतमाळ जिल्ह्यातून रोजगारासाठी आरमोरी तालुक्यात आलेले चार कुटुंबातील १७ लोक कोरोनाच्या संचारबंदीने अडकून पडले. तालुका प्रशासनाने दखल घेऊन सदर कुटुंबांना निवासासाठी देलनवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या खोल्या उपलब्ध करून दिल्या. या कारागिरांना जीवनाश्यक वस्तू व धान्य उपलब्ध करून देण्यात आले.
यवतमाळ जिल्ह्याच्या पिंपळशेंडा व पांढरकवडा येथील चार कुटुंब मागील सहा महिन्यांपासून रोजगारासाठी देलनवाडी परिसरात आले आहेत. गॅस, शेगडी व कुकर दुरूस्तीचे काम करून हे कारागिर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असतात. याच कामासाठी ते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आरमोरी तालुक्यात आले. मात्र कोरोनारूपी संकटामुळे त्यांचा व्यवसाय थांबला आहे.
संचारबंदीमुळे हे कारागिर फिरू शकत नसल्याने त्यांच्यापुढे आर्थिक समस्या निर्माण झाली आहे. ही बाब माहित होताच तहसीलदार कल्याणकुमार डहाट, गटशिक्षणाधिकारी बी. जी. नरोटे, तलाठी तिम्मा, देलनवाडीचे सरपंच माणिक पेंदाम, जि. प. शाळेचे मुख्याध्यापक रतन बन्सोड, शिक्षक संतोष मने यांनी कारागिर असलेल्या ठिकाणी भेट देऊन वस्तूस्थिती जाणून घेतली.
देलनवाडी जि. प. शाळेतील खोल्या निवासासाठी उपलब्ध करून दिल्या. त्यांच्यासाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी शालेय पोषण आहारातील तांदूळ व धान्यादी माल या कारागिरांच्या कुटुंबीयांना उपलब्ध करून दिला. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष पल्लवी कुमरे, ग्रा. पं. सदस्य अनिल ठवरे, वैशाली किरमिरे, वाल्मिक नन्नावरे आदी उपस्थित होते.