येडसिलीला विकासाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 05:00 AM2020-02-18T05:00:00+5:302020-02-18T05:00:57+5:30
हे गाव विकासापासून वंचित आहे. वीज, पक्के रस्ते व पिण्याच्या पाण्याच्या सोयीपासून वंचित आहे. झिंगानूर परिसरात असलेले येडसिली गाव घनदाट जंगलात आहे. या गावाच्या बाजूंनी डोंगर आहे. येथील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. २०० च्या आसपास गावातील लोकसंख्या आहे. शेती व्यवसाय केवळ पावसाळ्यात केला जातो. त्यानंतर वर्षभर नागरिक रोजगाराच्या शोधात तेलंगणा राज्यात जातात.
कौसर खान ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : तालुक्यातील अतिदुर्गम झिंगानूर ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या येडसिली गावात अद्यापही मूलभूत सोयीसुविधा पोहोचल्या नाही. हे गाव विकासापासून वंचित आहे. वीज, पक्के रस्ते व पिण्याच्या पाण्याच्या सोयीपासून वंचित आहे.
झिंगानूर परिसरात असलेले येडसिली गाव घनदाट जंगलात आहे. या गावाच्या बाजूंनी डोंगर आहे. येथील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. २०० च्या आसपास गावातील लोकसंख्या आहे. शेती व्यवसाय केवळ पावसाळ्यात केला जातो. त्यानंतर वर्षभर नागरिक रोजगाराच्या शोधात तेलंगणा राज्यात जातात. गावात नागरिकांसाठी तीन बोअरवेल आहेत. मोजक्याच घरांमध्ये विहिरी आहेत. येथे वीज पुरवठा करण्यात आला आहे. परंतु वीज पुरवठा वारंवार खंडित होतो. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. गावातील नागरिकांना आरोग्यविषयक उपचार करण्याकरिता झिंगानूर प्राथमिक आरोग्य केंद्रात जावे लागते. पावसाळ्यात आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचणे कठीण होते. या काळात तब्बेत बिघडल्यानंतर नागरिकांना बैलबंडीवर अथवा कावड करून आरोग्य केंद्रात न्यावे लागते. दळणवळणांच्या साधनांचा अभाव असल्याने नागरिकांना नेहमीच पायपीट करावी लागते.
मोजक्याच लोकांकडे दुचाकी वाहने आहेत. त्यामुळे नागरिकांना आवागमन करण्यासाठी दुसºयावरच अवलंबून राहावे लागते. या गावातील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती असतानाही सिंचनाच्या सोयीअभावी पावसाच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागते. विशेष म्हणजे सिंचनाच्या सोयीसाठी गावात एक तलाव खोदण्यात आला होता. परंतु येथील पाणी साठवणूक क्षमता अत्यंत कमी असल्याने तलाव कुचकामी ठरत आहे. येथील नागरिकांना गरजा पूर्ण करण्याकरिता झिंगानूर गावावर अवलंबून राहावे लागत आहे. परंतु झिंगानूर ते येडसिलीपर्यंतचे अंतर ८ किमी असल्याने व सदर मार्ग अत्यंत दूरवस्थेत असल्याने नागरिकांना येथून आवागमन करताना कसरत करावी लागत आहे. विशेष म्हणजे ३० ते ४० वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या या रस्त्याचे पक्के बांधकाम अद्यापही झाले नाही. कच्च्या रस्त्यानेच नागरिकांना ये-जा करावी लागत आहे.
बसफेरी सुरू करा
येडसिली भागात ३० ते ३५ वर्षांपूर्वी राज्य परिवहन महामंडळाची बससेवा होती. परंतु या दरम्यान रस्त्याची दुरवस्था झाल्याने बसफेरी बंद करण्यात आली. तेव्हापासून या मार्गावरील बसफेरी बंदच आहे. नागरिकांना झिंगानूर तसेच जिमलगट्टा येथे विविध कामानिमित्त सायकल तसेच बैलगाडीने ये-जा करावी लागते. पावसाळ्यात या मार्गाने वाहने जाऊ शकत नाही.