उन्हाळ्यात खिरनी झाडाच्या फांद्या देतात गारवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2020 05:00 AM2020-04-05T05:00:00+5:302020-04-05T05:01:15+5:30
गृहप्रवेश असो की लग्नकार्य, यात खिरनीच्या फांद्यांचा मंडप आवर्जुन ग्रामीण भागात टाकल्या जाते. उन्हाळ्याच्या दिवसात एप्रिल, मे महिन्यात प्रचंड तापमान असल्याने नागरिक हैैराण होतात. त्यातल्या त्यात गृहप्रवेश किंवा लग्नकार्य म्हटले की, आप्तेष्ठांची गर्दी आपसुकच जमते. एकाच ठिकाणी शेकडो नागरिक गोळा होत असल्याने वाढत्या तापमानाचा अधिकच त्रास होतो. अशावेळी नागरिकांच्या अंगातून घामाच्या धारा निघतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : हिंदू धर्मात विविध शुभकार्य तसेच आणि महत्त्वाच्या कार्यात खिरनी वृक्षाचे महत्त्व अनन्य साधारण आहे. खिरनी वृक्षाचे पान उन्हाळ्याच्या दिवसात माणसाला थंडावा देतात. त्यामुळे ही परंपरा सिरोंचा तालुक्यात आजही कायम आहे.
गृहप्रवेश असो की लग्नकार्य, यात खिरनीच्या फांद्यांचा मंडप आवर्जुन ग्रामीण भागात टाकल्या जाते. उन्हाळ्याच्या दिवसात एप्रिल, मे महिन्यात प्रचंड तापमान असल्याने नागरिक हैैराण होतात. त्यातल्या त्यात गृहप्रवेश किंवा लग्नकार्य म्हटले की, आप्तेष्ठांची गर्दी आपसुकच जमते. एकाच ठिकाणी शेकडो नागरिक गोळा होत असल्याने वाढत्या तापमानाचा अधिकच त्रास होतो. अशावेळी नागरिकांच्या अंगातून घामाच्या धारा निघतात. या प्रचंड तापमानापासून दिलास मिळविण्याकरिता खिरनी झाडाच्या फाद्यांपासून टाकलेला मंडप उपयुक्त ठरतो. मंडप टाकण्यापासून लग्नकार्याच्या विधीला सुरूवात होते. मंडपपूजन ते देवपूजापासून विवाहविधी त्यानंतर भोजनावळी असा हा कार्यक्रम असतो. ग्रामीण भागातील लग्नकार्य म्हटले की आप्तेष्ठ व पाहुण्यांची रेलचेल असते. ज्या घरी लग्नकार्य आहे, त्या घरी चार दिवसांपूर्वी मंडप टाकून त्याचे पूजन केले जाते. सिरोंचा तालुकालगतच्या तेलंगणा राज्यातही ही परंपरा कायम आहे.
तेलंगणामध्ये खिरनी झाडाला ‘पालापोरका’ म्हणतात. सदर पालापोरका म्हणजे खिरनी झाडाच्या फांद्या आणण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिक बैलबंडीचा वापर करतात. शेजारच्या नागरिकांना घेऊन जंगलात जाऊन खिरनी झाडाच्या फांद्या जमा केल्या जातात.
कोरोनाने पारंपरिक मंडप दिसेना
ग्रामीण भागात बऱ्याच युवक, युवतींचे विवाह जुळले आहे. मात्र कोरोनाच्या संचारबंदीने नियोजित लग्नकार्य पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे दरवर्षी एप्रिल महिन्यात झाडांच्या फाद्यांपासून टाकल्या जाणारे पारंपरिक मंडप यावर्षी दिसेनासे झाले आहेत. डेकोरेशनाच्या माध्यमातून कापडाचा मंडप टाकल्या जातो. मात्र मुख्य विधी होणाऱ्या जागेवर पारंपरिकच मंडप असतो.
फळ बहुगुणी
खिरनी वृक्षाचे फळ चवीला गोळ असतात. सदर फळ पिकल्यावर पिवळ्या रंगाचे होतात. किसमिससारखा या फळाचा आकार असतो. फळामध्ये दुधाची मात्रा अधिक असते. त्यामुळे या फळाला कॅल्शीयमचा स्त्रोत मानले जाते. हे फळ ग्रिष्म ऋतुत मिळतात. या फळाला मागणी सुद्धा चांगली असते. तालुक्याच्या ग्रामीण भागातील लोक जंगलात जाऊन शहरात हे फळे विकायला आणतात. यातून आदिवासी नागरिकांना रोजगार मिळत असतो. खिरनी वृक्षाचे पान आठ ते दहा दिवस वाळत नाही. त्यामुळेच अधिक थंडावा मिळत असतो.