सिरोंचा तालुक्यात दमदार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 05:00 AM2020-02-10T05:00:00+5:302020-02-10T05:00:35+5:30
आदिवासी विकास महामंडळामार्फत तालुक्यातील अमरादी येथे धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. यावर्षी शासनाने अधिकचा भाव दिल्याने धानाची खरेदी वाढली. गोदाम फुल्ल झाल्याने काही धान ताडपत्री झाकून उघड्यावरच ठेवण्यात आले होते. तसेच काही शेतकºयांचे काटे झाले नसल्याने त्यांचेही धान केंद्राच्या परिसरात ठेवले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : शनिवारी रात्री जवळपास ११ वाजताच्या सुमारास सिरोंचा तालुक्यात दमदार पाऊस झाला. या पावसामुळे तालुक्यातील अमरादी येथील धान खरेदी केंद्रावरील शेकडो क्विंटल धान भिजले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
आदिवासी विकास महामंडळामार्फत तालुक्यातील अमरादी येथे धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. यावर्षी शासनाने अधिकचा भाव दिल्याने धानाची खरेदी वाढली. गोदाम फुल्ल झाल्याने काही धान ताडपत्री झाकून उघड्यावरच ठेवण्यात आले होते. तसेच काही शेतकºयांचे काटे झाले नसल्याने त्यांचेही धान केंद्राच्या परिसरात ठेवले होते. मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्याने शेतकरी व केंद्र संचालकांनी धानावर ताडपत्री झाकल्या. मात्र शनिवारी रात्री सिरोंचा तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. हवेमुळे काही धानाच्या ढिगांवरील ताडपत्री उडून गेल्या. परिणामी पावसाचे पाणी धानामध्ये शिरले आहे.
धान केंद्राच्या परिसरात पाणी जमा झाले आहे. या पाण्यामुळे खालच्या बाजूस असलेले धानाचे पोते पूर्णपणे ओले झाले आहेत. जमिनीवर लाकडी बल्ल्या ठेवून त्यावर पोत्यांची थप्पी ठेवण्यात आली होती. मात्र पावसाचे पाणी साचल्याने खालचे धान ओले झाले आहेत. काही ठिकाणी तर अगदी जमिनीवरच धानाचे पोते ठेवले आहेत. या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण झाले आहे. त्यामुळे काम करताना अडचण होत आहे.
धान सडण्याचा धोका
एकदा भिजलेले धान वाळवले तरी या धानातील तांदूळ काळा पडतो. तसेच तांदळाचा उग्र वास येते. मागील चार दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम असल्याने धान वाळू घालणे सुध्दा शक्य नाही. त्यामुळे सदर धान पूर्णपणे कुजण्याचा धोका निर्माण झाला आहे. शेकडो क्विंटल धानाची थप्पी लावली आहे. एवढी थप्पी काढून पुन्हा धान वाळू टाकणे, अशक्य आहे. त्यामुळे जेवढे धान भिजले आहे, ते धान पूर्णपणे कुजण्याची शक्यता आहे. यामध्ये शेतकरी व आदिवासी विकास महामंडळाच्याही धानाचा समावेश आहे. त्यामुळे याचा फटका शासन व शेतकºयांना बसणार आहे.
अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणाने कापूस काळवंडला
गडचिरोली जिल्ह्यात कापसाचा पेरा वाढत आहे. सिंचनाची सुविधा नसल्याने बहुतांश शेतकरी कोरडवाहू कापसाची लागवड करतात. या कापसाचा जवळपास दुसरा तोडा सुरू झाला होता. मात्र चार दिवसांपासून अधूनमधून पडत असलेल्या पावसामुळे कापूस काढणीचे काम जवळपास ठप्प पडले आहे. पावसामुळे कापसाचे बोंड ओले झाले आहेत. ढगाळ वातावरणाने कापूस वाळत नसल्याने ते काळे पडत आहेत. तसेच काही कापसाचे बोंड जमिनीवर पडल्याने ते मातीमोल झाले आहेत. मुसळधार पावसाने ज्वारी, मका पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे. या कापसाला कमी भाव मिळणार आहे.