सांडपाण्यामुळे तलावात वाढली दुर्गंधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 05:00 AM2020-05-26T05:00:00+5:302020-05-26T05:00:59+5:30
कुरखेडा शहरातील गांधी वॉर्डातील हनुमान मंदिरालगत असलेल्या तलावात शहरातील सांडपाणी सोडले जात असल्याने पाण्यापासून दुर्गंधी येत आहे. त्यामुळे वॉर्डवासीयांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. मात्र या प्रकाराकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : शहरातील सांडपाण्याचा योग्य प्रकारे निचरा व्हावा, यासाठी स्थानिक प्रशासन जबाबदार असते. सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावली जात नसेल तर आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात. कुरखेडा शहरातील गांधी वॉर्डातील हनुमान मंदिरालगत असलेल्या तलावात शहरातील सांडपाणी सोडले जात असल्याने पाण्यापासून दुर्गंधी येत आहे. त्यामुळे वॉर्डवासीयांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. मात्र या प्रकाराकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
कुरखेडा शहराच्या गांधी वॉर्डातील घाण पाणी नालीवाटे तलावात सोडले जात आहे. दैनंदिन वापरातील दूषित पाणी तलावात मिसळत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस तलावातील पाण्यातून दुर्गंधी येत आहे. विशेष म्हणजे, येथील मंदिरात दर्शनासाठी भाविक येत असतात. त्यांना या दुर्गंधीचा त्रास होतो. परिणामी भाविकांसह गांधी वॉर्डातील नागरिकांना आरोग्यविषयक समस्येचा सामना करावा लागू शकतो. नाली वाटे तलावात जाणारे सांडपाणी रोखण्याकडे नगर पंचायत प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.
सांडपाण्यामुळे परिसरात डासांची पैदास मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने लक्ष घालून सांडपाणी तलावात न सोडता ते इतर ठिकाणी सोडण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी शहरवासीयांनी नगर पंचायत प्रशासनाकडे केली आहे.
सौंदर्यीकरणाचे काम लवकर करा
कुरखेडा शहरातील हनुमान मंदिर परिसरात असलेल्या तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम हाती घेतल्यास नागरिकांसाठी सोयीचे होऊ शकते. तलावाच्या सौंदर्यीकरणाचाच एक भाग म्हणून पाळीवर गट्टू लावून रस्ता तयार करण्याचे काम पूर्ण करण्यात आले. त्यामुळे पाळीवरून आवागमन करणे सोयीचे झाले. येत्या काळात तलावाच्या पाळीवर नागरिकांना बसण्यासाठी बेंच व सभोवताल विद्युत दिवे लावण्याचे काम प्रस्तावित असल्याची माहिती आहे. याशिवाय मंदिर परिसरात असलेल्या खुल्या जागेत गट्टू लावण्यात येणार असल्याने परिसराच्या सौंदर्यात भर पडू शकते. सकाळ व सायंकाळच्या सुमारास नागरिकांना विरंगुळा म्हणून त्या ठिकाणी काही क्षण घालविता येतील. त्यादृष्टीने स्थानिक प्रशासनाने तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम लवकर हाती घ्यावे, अशी मागणी शहरातील नागरिकांकडून केली जात आहे.