नक्षलींना न जुमानता पुलाचे काम सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 05:00 AM2020-04-09T05:00:00+5:302020-04-09T05:01:51+5:30
देचलीपेठा पंचक्रोशीतील १६ गावातील नागरिकांच्या वर्षानुवर्षाच्या मागणीनुसार किष्टापूर नाल्यावरील पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले होते. मंगळवारच्या रात्री नक्षलवाद्यांनी या पुलाच्या बांधकामासाठी कंत्राटदाराकडून उपयोगात आणले जाणारे ट्रॅक्टर, मिक्सर व इतर साहित्य जाळून कामावरील मजुरांनाही मारहाण केली. एवढेच नाही तर कंत्राटदारासाठी धमकीचे पत्रक टाकले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जिमलगट्टा : अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा पोलीस उपविभागाच्या हद्दीतील किष्टापूर नाल्यावरच्या बहुप्रतीक्षित पुलाच्या बांधकामावर असणाऱ्या वाहनांची मंगळवारच्या रात्री नक्षलवाद्यांनी जाळपोळ केली. या घटनेचा परिसरातील अनेक गावातील नागरिकांनी एकत्रित जमून तीव्र निषेध व्यक्त केला. नक्षलवाद्यांनी अशा कामात कितीही अडथळे आणले तरी त्याला न जुमानता या लोकोपयोगी पुलाचे काम पुन्हा सुरू करा, अशी एकमुखी मागणी त्यांनी केली.
देचलीपेठा पंचक्रोशीतील १६ गावातील नागरिकांच्या वर्षानुवर्षाच्या मागणीनुसार किष्टापूर नाल्यावरील पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले होते. मंगळवारच्या रात्री नक्षलवाद्यांनी या पुलाच्या बांधकामासाठी कंत्राटदाराकडून उपयोगात आणले जाणारे ट्रॅक्टर, मिक्सर व इतर साहित्य जाळून कामावरील मजुरांनाही मारहाण केली. एवढेच नाही तर कंत्राटदारासाठी धमकीचे पत्रक टाकले. अशा पद्धतीने कामात अडथळा आणून हे काम बंद पाडण्याचा नक्षलवाद्यांचा उद्देश असला तरी तो यशस्वी होऊ द्यायचा नाही, असा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला. किष्टापूर नाल्यावर पूल नसल्यामुळे पावसाळ्याचे ४ ते ५ महिने १६ गावातील नागरिकांचा संपर्क तुटून मोठे हाल होतात. आजारी व्यक्ती, गर्भवती महिलांना उपचाराअभावी प्राण गमवावे लागतात. ज्या घरातील लोकांना हे दु:ख सहन करावे लागले त्यांनाच या पुलाचे महत्व माहीत आहे. निष्पाप आदिवासी नागरिकांचा खून करणाºया नक्षलवाद्यांना हे कळणार नाही. त्यांना आदिवासी नागरिकांच्या सुख-दु:खाशी काहीही देणे-घेणे नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
पोलीस विभागाच्या जनजागृतीने नागरिक पोलिसांना सहकार्य करीत असल्याचे दिसून येत आहे.
‘कोरोना’च्या नियंत्रणानंतर बांधकामांना सुरूवात
जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची कामे बंद असून सर्व कंत्राटदारांना कामावरील वाहने सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाकडून यापूर्वीच निर्देश दिले आहेत. ही साथ आटोक्यात आल्यानंतर पुन्हा रस्ते व इतर बांधकामे सुरू केली जाणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले. कोरोनाच्या संचारबंदीमुळे दुर्गम भागातील बरीच विकास कामे थांबली आहेत.
मुर्दाबादच्या घोषणा देत पुतळ्याचे दहन
यावेळी पंचक्रोशीतील नागरिकांनी नक्षलवाद्यांच्या या कृतीचा निषेध करण्यासाठी विविध फलक हाती घेऊन ‘नक्षलवाद मुर्दाबाद, नक्षलवाद्यांना नको विकास - जाळपोळ करून गावं केली भकास’ अशा घोषणा दिल्या. तसेच किष्टापूर नाला झालाच पाहीजे, असा निर्धार व्यक्त करून नक्षलवादाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. पंचक्रोशीतील गावकऱ्यांच्या या हिमतीचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी कौतुक करत कोरोनाच्या साथीनंतर पुन्हा हे पुलाचे बांधकाम सुरू केले जाईल, असे आश्वासनही त्यांना दिले. अहेरी तालुक्यात नक्षलवादी विघातक कृत्य करीत असले तरी ग्रामीण व दुर्गम भागातील लोक नक्षल्यांना जुमानत नाही, हे दाखवून दिले आहे.