गडचिरोलीतही प्रतिबंधित क्षेत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2020 05:00 AM2020-06-07T05:00:00+5:302020-06-07T05:00:38+5:30
मुंबईवरून आलेल्या सदर कुटुंबातील पुरूषाला आधीच संस्थात्मक विलगिकरणात ठेवले होते. पण त्यांची पत्नी गरोदर असल्यामुळे त्यांना गृह विलगिकरणात ठेवले होते. संस्थात्मक विलगिकरणातील व्यक्तीचा अहवाल दोन दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आल्यानंतर सदर कुटुंबातील सर्वच व्यक्तींच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यात शनिवारी गृह विलगिकरणातील महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह येताच त्या कुटुंबातील सदस्यांना संस्थात्मक विलगिकरण करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली शहरातील जुनी वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गांधी वॉर्डमध्ये गृह विलगिकरणातील एक महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे तो परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला. इतक्या दिवसात प्रथमच गृह विलगिकरणातील व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून शहराचा काही भाग प्रतिबंधित करण्याचीही पहिलीच वेळ आहे.
मुंबईवरून आलेल्या सदर कुटुंबातील पुरूषाला आधीच संस्थात्मक विलगिकरणात ठेवले होते. पण त्यांची पत्नी गरोदर असल्यामुळे त्यांना गृह विलगिकरणात ठेवले होते. संस्थात्मक विलगिकरणातील व्यक्तीचा अहवाल दोन दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आल्यानंतर सदर कुटुंबातील सर्वच व्यक्तींच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यात शनिवारी गृह विलगिकरणातील महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह येताच त्या कुटुंबातील सदस्यांना संस्थात्मक विलगिकरण करण्यात आले.
सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास नगर परिषदेच्या वाहनाने गांधी वार्डमधील परिसर सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी करून तो परिसर निर्जंतूक करण्यात आला. त्यानंतर तो परिसर प्रतिबंधित करण्यात आला. यावेळी तहसीलदार महेंद्र गणवीर, ठाणेदार प्रदीप चौगावकर, न.प.मुख्याधिकारी संजीव ओहोळ, पं.स.च्या गटविकास अधिकारी सुनिता मरसकोल्हे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुनील मडावी आदी अधिकारीगण हजर होते.
मुख्य बाजारपेठेलगत हा परिसर असल्यामुळे व्यापारी वर्गातही भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुख्य बाजारपेठेत खबरदारीची आवश्यकता
गांधी वार्डाती रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आल्याने मुख्य बाजारपेठेत थोडे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच परिसरात गांधी चौक असून येथे लोकांची नेहमी वर्दळ असते. या परिसरात शेकडो दुचाकी वाहनांचे आवागमन दिवसभर होत असते. सदर वार्डासह शहरात कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासन, नगर पालिकेची यंत्रणा, आरोग्य विभाग तसेच पोलीस विभागाने कठोर उपाययोजना करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.