पावसाने पिकांना जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 05:00 AM2020-07-06T05:00:00+5:302020-07-06T05:01:21+5:30
१ जून ते ३० सप्टेंबर या चार महिन्याच्या कालावधीत गडचिरोली जिल्ह्यात सरासरी १२५४ मिमी पाऊस पडते. १ जून ते ५ जुलैपर्यंत सरासरी २७९.९ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात २५४.४ मिमी पाऊस झाला आहे. अपेक्षित पावसाच्या ९०.९ टक्के पाऊस पडला आहे. म्हणजेच अपेक्षित सरासरीच्या ९ टक्के पावसाची घट झाली आहे. शनिवारपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शनिवारपासून पावसाने जिल्हाभरात हजेरी लावली आहे. त्यामुळे करपणाऱ्या पिकांना जीवदान मिळाले आहे. तसेच रोवणीच्या कामांनाही गती येणार आहे.
जून महिन्यात अगदी वेळेवर पाऊस दाखल झाल्याने जिल्हाभरात धान, कापूस, सोयाबिन व इतर पिकांची लागवड वेळेवर झाली. त्यानंतर मात्र गडचिरोली तालुक्यासह काही तालुक्यांमध्ये पावसाने दडी मारली होती. त्यामुळे खरीपातील पिके करपायला सुरूवात झाली होती. शेतकरी चिंतेत पडला असतानाच मागील पाच दिवसांपासून जिल्ह्याच्या काही भागात अधूनमधून पाऊस कोसळत आहे. त्यामुळे करपणाऱ्या पिकांना जीवदान मिळाले आहे.
१ जून ते ३० सप्टेंबर या चार महिन्याच्या कालावधीत गडचिरोली जिल्ह्यात सरासरी १२५४ मिमी पाऊस पडते. १ जून ते ५ जुलैपर्यंत सरासरी २७९.९ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात २५४.४ मिमी पाऊस झाला आहे. अपेक्षित पावसाच्या ९०.९ टक्के पाऊस पडला आहे. म्हणजेच अपेक्षित सरासरीच्या ९ टक्के पावसाची घट झाली आहे. शनिवारपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. काही ठिकाणी शनिवारी रात्री व रविवारी सुध्दा पाऊस झाला. त्यामुळे यानंतर पाऊस होऊन घट भरून निघेल, अशी अपेक्षा आहे.
वार्षिक सरासरीच्या २० टक्के पाऊस
गडचिरोली जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत सरासरी १२५४ मिमी पाऊस पडते. त्यापैकी २५४.४ मिमी पाऊस झाला आहे. वार्षिक सरासरीच्या २०.३ मिमी पाऊस पडला आहे. जुलै व आॅगस्ट हे पावसाचे दिवस म्हणून ओळखले जातात. याच कालावधीत सर्वाधिक पाऊस पडते. हे दोन्ही महिने शिल्लक आहेत. त्यामुळे पावसात असलेली घट भरून निघेल, अशी अपेक्षा आहे.
मोठ्या पावसाची प्रतीक्षा
गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने धानाचे उत्पादन घेतले जाते. सुमारे २ लाख हेक्टर क्षेत्रावर धानाची लागवड केली जाते. बहुतांश शेतकरी धानाची रोवणी करतात. धानाचे पऱ्हे रोवण्याजोगे झाले आहेत. मात्र पाऊस नसल्याने अजूनपर्यंत शेतकऱ्यांनी रोवणीला सुरूवात केली नाही. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, अशाच शेतकऱ्यांनी रोवणीला सुरूवात केली आहे. शेतकरी वर्ग मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. केवळ मोठ्या पावसाअभावी रोवणीची कामे थांबली आहेत.
मुलचेरा व भामरागडात अतिवृष्टी
शनिवारी भामरागड व मुलचेरा तालुक्यात अतिवृष्टी झाली. मुलचेरा तालुक्यात सुमारे १०७ मिमी तर भामरागड तालुक्यात ७० मिमी पावसाची नोंद झाली. रविवारीही चांगला पाऊस झाला. काही तालुक्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.