दुर्गम भागाच्या विकासाला प्राधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 05:00 AM2020-01-28T05:00:00+5:302020-01-28T05:00:00+5:30
विकासाच्या योजना पोहोचविण्यासाठी प्राधान्य देणार आहे. गडचिरोली जिल्ह्याचा बहुतांश भाग दुर्गम व ग्रामीण असल्याने शासनाचे या जिल्ह्याच्या विकासाकडे विशेष लक्ष आहे, असे प्रतिपादन रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शहरांच्या तुलनेत दुर्गम व ग्रामीण भागात सोयीसुविधांचा अभाव आहे. त्यामुळे शासन दुर्गम भागात विकासाच्या योजना पोहोचविण्यासाठी प्राधान्य देणार आहे. गडचिरोली जिल्ह्याचा बहुतांश भाग दुर्गम व ग्रामीण असल्याने शासनाचे या जिल्ह्याच्या विकासाकडे विशेष लक्ष आहे, असे प्रतिपादन रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी केले.
प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ पोलीस मुख्यालयातील मैदानावर आयोजित करण्यात आला. याप्रसंगी संदीपान भुमरे मार्गदर्शन करीत होते. कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, जिल्हाधिकारी दीपक सिंगला, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, आमदार डॉ. देवराव होळी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड, प्रकल्प अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, उपवनसंरक्षक कुमारस्वामी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोहीतकुमार गर्ग आदी मान्यवर उपस्थित होते.
सरस्वती विद्यालय, शिवाजी हायस्कूल, प्रज्ञा संस्कार कॉन्व्हेंट, जिल्हा परिषद हायस्कूल, प्लॅटिनम ज्युबिली हायस्कूल, कारमेल हायस्कूल, शासकीय आश्रमशाळा खमनचेरू येथील विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. मंत्र्यांनी परेड कमांडर पोलीस उपअधीक्षक भाऊसाहेब ढोले यांच्यासोबत निरिक्षण केले.
संचालन क्रीडाधिकारी मदन टापरे तर आभार निवासी उपजिल्हाधिकारी अनंत वालस्कर यांनी मानले. कार्यक्रमाला मोठी गर्दी उसळली होती.