वीर शहिदांना पोलीस दलाची मानवंदना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 05:00 AM2020-05-18T05:00:00+5:302020-05-18T05:00:40+5:30
राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल, अपर पोलीस महासंचालक (विशेष अभियान) राजेंदर सिंग, विशेष पोलीस महानिरिक्षक रवींद्र कदम, पोलीस महाउपनिरिक्षक महादेव तांबडे, जिल्हाधिकारी दीपक सिंगला, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे आदी उपस्थित होते. पोलीस महासंचालक हे काही कामानिमित्त चंद्रपूर जिल्ह्यात आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : नक्षलवाद्यांशी लढताना प्राणाची आहुती देणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमाने आणि जवान किशोर आत्राम यांना रविवारी सायंकाळी पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात भावपूर्ण वातावरणात मानवंदना देऊन श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल, अपर पोलीस महासंचालक (विशेष अभियान) राजेंदर सिंग, विशेष पोलीस महानिरिक्षक रवींद्र कदम, पोलीस महाउपनिरिक्षक महादेव तांबडे, जिल्हाधिकारी दीपक सिंगला, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे आदी उपस्थित होते. पोलीस महासंचालक हे काही कामानिमित्त चंद्रपूर जिल्ह्यात आले होते. दोन जवान शहीद झाल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी गडचिरोली गाठून शहीदांना मानवंदना दिली. तसेच किशोर आत्राम यांच्या कुटुंबीयांची विचारपूस केली. दोघांचेही पार्थिव त्यांच्या स्वगावी रवाना करण्यात आले आहेत. किशोर आत्राम हे मूळचे भामरागड तालुक्यातील आरेवाडा येथील रहिवासी आहेत. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
पालकमंत्र्यांनी पाठविला शोकसंदेश
पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त करत शहीदांचे बलिदान व्यर्थ जाऊ दिले जाणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. शहीद जवानांच्या कुटुंबियांची परवड होणार नाही, यासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल. नक्षलवाद संपविण्यासाठी पोलीस लढा देत आहेत. या घटनेमुळे पोलिसांनी खचून न जाता नक्षलवाद्यांचा खात्मा करावा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.