कोरोनाच्या प्रतिबंधासाठीच ‘लॉकडाऊन’ गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 05:00 AM2020-03-31T05:00:00+5:302020-03-31T05:00:55+5:30
सार्वजनिक वावर बंद करून जो ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी राहणे म्हणजेच लॉकडाऊन. परंतु, यामध्ये जीवनावश्यक वस्तू अत्यावश्यक सेवेसाठी परवानगी देण्यात येते. आजच्या परिस्थितीत लॉकडाऊनचा प्रमुख उद्देश म्हणजे कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये हाच आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सर्व जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव गर्दीच्या ठिकाणी जास्त प्रमाणात पसरतो. त्यामुळे लोकांनी गर्दी करू नये व सर्वांनी आहे त्याच ठिकाणी राहणे महत्त्वाचे आहे. याच पार्श्वभूमीवर १४ एप्रिलपर्यंत संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. परंतु, सर्वसामान्यांना एक महत्त्वाचा प्रश्न पडत आहे. तो म्हणजे लॉकडाऊन म्हणजे काय, लॉकडाऊन कशासाठी, याची गरज काय, याची उत्तरे नागरिकांनी समजावून घेणे अत्यावश्यक आहे. जबाबदार नागरिक म्हणून घरातच राहावे, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाने केले आहे.
सार्वजनिक वावर बंद करून जो ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी राहणे म्हणजेच लॉकडाऊन. परंतु, यामध्ये जीवनावश्यक वस्तू अत्यावश्यक सेवेसाठी परवानगी देण्यात येते. आजच्या परिस्थितीत लॉकडाऊनचा प्रमुख उद्देश म्हणजे कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये हाच आहे.
लॉकडाऊनची गरज का हे अ आणि ब व्यक्तीच्या उदाहरणावरून समजून घेता येते. अ व्यक्ती कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवरच परदेशातून घरी परत येतो. विमानतळावर सर्व परदेशी प्रवाशांना होम क्वॉरंन्टाईन करण्यासाठी माहिती घेऊन प्रशासन होम क्वॉरंन्टाईनचा शिक्का मारतो. १४ दिवस घरातच राहण्याच्या सूचना दिल्या जातात. या प्रक्रियेतून अ व्यक्ती जातो आणि घरी जाऊन १४ दिवस स्वत:ला वेगळ्या खोलीमध्ये राहण्याचा निर्धार करतो. परंतु, अ व्यक्तीची आई-बाबा, पत्नी, मुले त्याच्यावर रागावून विचारणा करते, खूप दिवसांनी परदेशातून आला आहेस. पण असा वेगळ्या खोलीमध्ये कशाला राहतोस? सर्वांसमवेत का बर राहत नाही? जेवणही आमच्यासोबत करत नाही? तुला काही होणार नाही तू बाहेर ये आणि आमच्या सोबतच राहा. यावर अ व्यक्तीने आपल्या कुटुंबातील सदस्यांना सांगतो की, मी कोरोना बाधित देशातून आलो. १४ दिवस होम क्वॉरंन्टाईन केले आहे. त्यामुळे मी इतर कोणत्याच व्यक्तीसोबत संपर्कात येणार नाही. याची परिपूर्ण दक्षता घेईन, अशी भूमिका घेणे अत्यावश्यक आहे. व्यक्तीच्या निष्काळजीपणामुळेही असाच संसर्ग होण्याचा धोका आहे.
माहिती लपविणे घातक
लॉकडाऊन केले नाही तर जेव्हा हजारो आजारी पडतील त्याच वेळेस ही बाब माहिती होईल. त्यामुळे कोणत्या घरात आजारी कोण पडले आहे, याची माहिती आरोग्य विभाग घेत आहे. त्यामुळे माहिती लपविल्यास व्यक्ती, कुटुंब व समाजासाठी ही बाब घातक ठरू शकते. परिस्थिती गंभीर असून शिस्तीने घरी राहणे हाच सर्वोत्तम उपाय आहे.